सातारा ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने हाती आलेली पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आली असून, गहू व रब्बी ज्वारी काढणी, मळणीच्या कामास वेग आला आहे.
जिल्ह्यात परतीचा पाऊस दमदार झाल्याने रब्बी हंगामात पोषक वातावरण होते. सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा या हंगामात जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी रब्बी ज्वारीची आहे. पोषक वातावरण तसेच पाणीटंचाई फारशी न जाणवल्याने रब्बीतील बहुतांशी पिकांची वाढ चांगली झाली होती. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांच्या काढणीची कामे उरकली आहेत.
सध्या दुसऱ्या टप्प्यातील काढणीची कामे सुरू झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी व गहू पिकांचा समावेश आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान आहे. पाऊस झाल्यास रब्बीतील प्रमुख पिकांचे नुकसान होणार आहे. यामुळे काढणीला आलेली पिके तसेच थोडे दिवस कालवधी बाकी असणारी पिके काढण्यास वेग आला आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात रब्बी ज्वारी व गहू पिकांच्या काढणी व मळणीच्या कामांना गती आली आहे. काही ठिकाणी गहू काढणी व मळणीसाठी हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. पाऊस आल्यास ज्वारी व कडब्याचे नुकसान होण्याच्या भीतीने कणसाची वरूनच खुडणीही केली जात आहे. ढगाळ हवामानामुळे आंबा मोहर गळण्याचा धोका आहे.