जळगाव : पूर्वहंगामी कपाशीमध्ये सध्या भाद्रपदातील कडक उन्हामुळे जोमात बोंडे उमलत आहेत. एका वेचणीनंतर लागलीच चार-पाच दिवसांनी दुसरी वेचणी करावी लागत आहे. परंतु सध्या कापूस वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असून, वेचणीसाठी शहरांमधून किंवा मोठ्या गावांमधून मजुरांना आणावे लागत असल्याचे चित्र आहेत.
जळगाव, चोपडा, यावल, पाचोरा भागांत पूर्वहंगामी कपाशीची शेतं पांढरीशुभ्र दिसत आहेत. अधिक वेळ कापूस बोंडांमध्येच राहिला तर त्याचे वजन कमी होते. तसेच उंदीर व इतर प्राणी त्याचे नुकसान करतात. त्यामुळे बोंडे उमलल्यानंतर त्यांची लागलीच वेचणी करून घ्यावी लागते. परंतु सध्या मजूरटंचाई आहे. कुठल्याही गावात पुरेसे मजूर नाहीत. मजुरांचा तुटवडा असल्याने शेतकरी थेट तालुक्याच्या ठिकाणी जाऊन मजूर ट्रॅक्टर, रिक्षाने आणत आहेत.
जळगाव शहरात गेंदालाल मिल परिसर, हरिविठ्ठल, आसोदा रस्ता भागातून महिला मजूर कापूस वेचणीकरिता आणले जात आहेत. सकाळी १० ते सायंकाळी पाच अशी त्यांची कापूस वेचणी कामाची वेळ असते. परंतु मजुरांना आणण्याचा वाहतूक खर्च संबंधित शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अर्थातच यात उत्पादन खर्च वाढत आहे. अशीच स्थिती पाचोरा, यावल, चोपडा भागात आहे. लोणी, खर्डी, पंचक येथील शेतकऱ्यांना अडावद, धानोरा या मोठ्या गावांमधून ट्रॅक्टरने मजूरांना आणावे लागते. यावल तालुक्यातही यावल शहरातून वड्री, विरावली, साकळी (ता. यावल) भागांत मजूर जात असल्याची माहिती मिळाली.
कापसाचे आगार म्हणून ओळख असलेल्या चोपडा येथे मजुरीचे दर वेगवेगळे आहेत. महिला मजुरास कापूस वेचणीसाठी किमान ८० रुपये रोज दिले जातात. तोल पद्धतीनेही वेचणी केली जाते. तोल म्हणजेच दोन किलो कपाशीचा एक तोल. ८० रुपये किंवा १०० रुपये रोज देण्याऐवजी तोल पद्धतीने महिलांना कापूस वेचणीचे काम दिले जाते. यामुळे कापूस वेचणी लवकर होते. जेवढे तोल वेचले जातील त्यानुसार मजुरी दिली जाते.
तोलचे यंदाचे नवे दर अजून जाहीर झालेले नाहीत. परंतु मागील काळात सहा ते सात रुपये प्रतितोल या दरात अनेक ठिकाणी कापूस वेचणी झाली होती. सध्या उन्हाचा कडाका वाढत असल्याने सकाळीच कापूस वेचणीसाठी मजूर शेतात जातात. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत कापूस वेचणीचे कामकाज चालते.