नगर : शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र त्यात अतिशयोक्ती नको आहे. शेळीपालन करताना ते शाश्वत राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या भागातील वातावरणाशीच निगडित असलेल्या शेळ्यांचे पालन करावे, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शेळी सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ संजय मंडकमाले यांनी केले.
नगर येथील सावेडी जॉगिंग पार्क मैदानावर सुरू असलेल्या सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात शुक्रवारी पहिल्या दिवशी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शेळी सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ संजय मंडकमाले यांचे आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन या विषयावर चर्चासत्र झाले.
मंडकमाले म्हणाले, की अलीकडच्या काळात शेळीपालनाकडे, विशेषतः बंदिस्त शेळीपालनाकडे कल वाढला आहे. मात्र मोठा खर्च करून शेळीपालन केले जात आहे. मात्र अनके ठिकाणी त्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तरुणांनी कर्ज काढून मुळीच शेळीपालन करू नये. गोठ्यावरही जास्तीचा खर्च करू नये. शेळीचा चारा तसा फुकटच मिळणारा आहे. त्यामुळे चाऱ्यावरही अधिक खर्च करण्याची गरज नाही. इतर राज्यांतून विविध जातीच्या शेळ्या आणल्या जातात. मात्र त्या टिकत नाहीत, त्यामुळे आपल्या भागात ज्या जातीच्या शेळ्या आहेत, त्याचेच पालन करावे. बाजाराचा, उत्पादनाचा खर्चाचा अभ्यास करून शेळीपालन करणे गरजेचे आहे. या वेळी शेतकऱ्यांच्या शेळी व करडाचे व्यवस्थापन आदींबाबत प्रश्नांचे निरसन करण्यात आले.