वाशीम : जिल्ह्यात आजवर सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. याचा फटका आधी खरीप पिकांना बसला. तशीच स्थिती आता रब्बी हंगामाचीही होऊ शकते. आगामी हंगामात रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता वाढली आहे.
जिल्ह्यात आजवर केवळ ७० टक्के पाऊस पडला आहे. कमी पावसामुळे जलस्रोतांमधील साठा वाढलेला नाही. उपलब्ध साठासुद्धा आता तळाला गेला आहे. विहिरींची पातळी दरदिवसाला खाली जात आहे. या बाबी रब्बीच्या पथ्यावर पडणाऱ्या असून, त्यामुळे क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध असेल तरच, रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी नुकतेच शेतकऱ्यांना केले आहे.
वाशीम जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७९८ मिमी आहे. मात्र आजवर केवळ ७० टक्के पाऊस झाला आहे. हा पडलेला पाऊस अनियमित असून, अनेक ठिकाणी पुरेसा झालेला नाही. कमी पावसामुळे नदी-नाले वाहिले नाहीत. परिणामी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ३३ प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांतील उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा मिळून केवळ २४ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले जाते. ही स्थिती बघता सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण बाब आहे.
वाशीम जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ८१ हजार हेक्टर आहे. कृषी विभागाने यंदा एक लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले आहे. त्यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांचा समावेश आहे. गव्हाचे नियोजित क्षेत्र ४५ हजार, तर हरभरा पिकाचे क्षेत्र २५ हजार हेक्टर आहे. त्याशिवाय रब्बी ज्वारी दीड हजार हेक्टर, करडई ४०० हेक्टर आणि मक्याचे क्षेत्र १०० हेक्टरचे नियोजित आहे.
यातील गहू आणि हरभरा या पिकांना पाण्याची गरज असते. सिंचनाची सोय असेल तर ही पिके येऊ शकतात. विशेषतः गव्हाला पाणी हवे असते. सद्यःस्थितीत पाणी कमी झाल्याने हे क्षेत्र लागवडीखाली येईल याची कुठलीही शाश्वती दिसत नाही.