औरंगाबादमधील कांदा उत्पादकांसाठी २३ लाखांचे अनुदान मंजूर

कांदा अनुदान
कांदा अनुदान
औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलै ते ऑगस्ट २०१६ दरम्यान कांद्याची विक्री केलेल्या ६३२ शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल १०० रुपयांप्रमाणे अनुदान मंजूर झाले असून त्याची रक्‍कम २३ लाख रुपये आहे. 
 
दोन वर्षांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाही. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने भरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, बाजार समितीमध्ये जुलै व ऑगस्ट २०१६ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना, तसेच अनुदानासाठी प्रस्ताव पाठविलेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान मंजूर केले आहे. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोनशे क्विंटलसाठी हे अनुदान दिले जाणार आहे.
 
औरंगाबाद बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदानापोटी २३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. बाजार समितीमध्ये २४ हजार क्विंटल कांद्यांची आवक झाली होती. अनुदानासाठी ६३२ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले होते. यापैकी ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्‍कम वर्ग करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांचे अनुदान जमा करण्यात आलेले नाही.
 
अनुदानासाठी अर्जात राष्ट्रीयीकृत बॅंकेचे खाते आवश्‍यक होते. अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंक, शेड्यूल्ड बॅंकेचे खाते क्रमांक दिले; तसेच काही शेतकऱ्यांकडून बॅंकेचा आयएफसी कोड चुकीचा टाकल्याने सदर रक्‍कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही. या प्रकरणातील अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांनी बाजार समिती किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com