कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी एफआरपी अधिक २०० रुपये अशा ऊसदरावर तोडगा काढला आहे. पण गडहिंग्लज परिसरातील कारखान्यांची रिकव्हरी कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात प्रति टन २७०० रुपयापर्यंतची रक्कम पडणार आहे. यामुळे ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत. कर्नाटकातील कारखान्यांनी प्रति टन ३००० रुपयांपर्यंतची रक्कम देण्याची तयारी दाखविली आहे. यामुळे ऊस उत्पादकांनी कर्नाटकातील कारखान्यांशी संपर्क साधून या कारखान्यांना ऊस देण्याची तयारी दर्शविली आहे. या भागातील शेतकरी संघटनांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोल्हापुरात निघालेल्या तोडग्यानुसार रिकव्हरीनुसार वेगवेगळी उचल मिळणार आहे. यामध्ये गडहिंग्लज कारखान्याची पहिली उचल २६३८, आजऱ्याची २५३०, हेमरसची २७९३, इकोकेन २६८० रुपये मिळणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांचा दर मात्र सरासरी ३००० ते ३१०० रुपयापर्यंत पोचणार आहे. अशा परिस्थितीत गडहिंग्लज उपविभागातील शेतकऱ्यांना मात्र मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.
गडहिंग्लज तालुक्याला लागून कर्नाटकातील चिक्कोडी तालुका आहे. प्रत्येक वर्षी तेथील चार ते पाच कारखाने या भागात ऊसतोडीसाठी येतात. कोल्हापूर जिल्ह्यातील निर्णय होण्याअगोदरच तेथील कारखान्यांनी प्रति टनास ३००० रुपयांपर्यंत दर देण्याची तयारी दाखविली आहे. परंतु ऊसतोड बंद असल्याने शेतकऱ्यांना या कारखान्यांना ऊस पाठविणे अशक्य होते. आता तोड सुरू झाल्याने या कारखान्यांना ऊस पाठविणे शक्य होणार आहे.