शिराळा, जि. सांगली ः शिराळा तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून पाझर तलाव, विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. मात्र चांदोली येथील वारणा धरणात गतवर्षाच्या तुलनेत सव्वापाच टीएमसी जादा पाणीसाठा आहे. वारणा धरणात सध्या २३.६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु, बदलत्या हवामानाचा फटका या तालुक्याला बसला आहे. येथे कोणत्यावेळी किती पाऊस पडेल हे सांगणे कठीण झाले आहे. मात्र येथील वारणा धरणामुळे या परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या धरणामुळे वारणा नदी बारमाही वाहू लागली आहे. वारणा कालव्यामुळे अनेक ठिकाणची माळरानावरील शेती बहरू लागली आहे.
यावर्षी शिराळा तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने धरणे, तलाव, विहिरींमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. परंतु, सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पाझर तलाव व छोटी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे.
मोरणा धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने शिराळा उत्तर भाग व मोरणाकाठच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यासाठी वाकुर्डे बुद्रुक योजना सुरू करून पाणी करमजाई तलावात सोडून ते पाणी मोरणा धरणात सोडण्यात आले आहे. वारणा काठच्या शेतीला पाणी देण्यासाठी व टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनेसाठी वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणामुळे शिराळा आणि कऱ्हाड तालुक्यातील पिकांना जीवदान मिळत आहे.
वारणा धरणाची एकूण क्षमता ३८ टीएमसी असून सध्या धरणात २३.६२ टीएमसी म्हणजेच ६८.६७ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी १८.३० टीएमसी म्हणजे ५३.२० टक्के तर २०१६मध्ये याच कालवधीत १६.७८ टीएमसी म्हणजे ४८.७० टक्के पाणीसाठा होता. आता या धरणातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत आहे.