अकोला आधीच खारपाणपट्टा असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यात या वर्षी कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोला तालुक्यातील खारपाण पट्ट्यात असलेल्या गावांमध्ये डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. ही पाणीटंचाई लोकांसाठी परीक्षा घेणारी ठरत आहे.
अकोला तालुक्यात असलेल्या गांधीग्राम, गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर, धामना, बोरगाव, दुधाळा, मांडाला, गोत्रा, पाळोदी, आगर, लोणाग्रा, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, फरामर्दाबाद, वल्लभनगर, हिंगणा-तामसवाडी, निंभोरा, कासली, म्हातोडी, घुसर, आपातापा या खारपाणपट्ट्यातील गावात पिण्याच्या पाण्याची नेहमीच समस्या असते.
या गावांमध्ये कुठेही बोअरवेल किंवा विहीर खोदल्यास गोडे पाणी लागत नाही. सर्वत्र खारे पाणी लागते. त्यामुळे बाहेरून पाणी आणणे हाच एक पर्याय शिल्लक आहे. पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणी द्यावे लागते. काही गावांना उन्हाळ्यात केवळ टॅंकरचा आधार असतो. उपरोक्त गावांपैकी बऱ्याच ठिकाणी सध्या टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र टॅंकरद्वारे दिले जाणारे पाणी पुरेसे नसते. यामुळे तासन्तास प्रतीक्षा केल्यानंतर अत्यल्प पाणी ग्रामस्थांना मिळते.
या गावांना वारी हनुमान येथील प्रकल्पातून पाणी देण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेली आहे. काही गावांपर्यंत पाइपलाइनचे काम झाले. परंतु, ‘वारी हनुमान’चे पाणी अद्यापही मिळू शकलेले नाही. या गावांसाठी पाण्याचा मुख्य स्रोत पूर्णा नदी आहे. काही वर्षांपर्यंत ही नदी बारमाही वाहत होती. परंतु, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नदी दिवाळीनंतर आटली. पावसाळ्यात पडणारे पाणी कुठलेही बंधारे, बॅरेज नसल्याने तसेच वाहून जाते.