सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली

संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

सातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात दिवसेंदिवस पाणीटंचाई भीषण होऊ लागल्याने टँकरच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. सध्या जिल्ह्यातील माण, खटाव व कोरेगाव या तालुक्यांतील २८ गावे १४२ वाड्यावस्त्यांवरील ३९ हजार ३४९ नागरिकांना २६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. संरक्षित पाणीसाठ्यासाठी सहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात अल्प पाऊस झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. कमी पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. पिण्याची पाण्याची टंचाई भासत असल्याने पिकांना पाणी कोठून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे रब्बी पिकांची पेरण्या रखडू लागल्या आहे. दुष्काळी तालुक्यात रब्बी ज्वारी वगळता इतर पिकांच्या पेरण्या जवळपास ठप्प आहेत. जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव या तीन तालुक्यांत पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

माण तालुक्‍याला टंचाईच्या सर्वाधिक झळा सोसाव्या लागत आहे. या तालुक्‍यात सर्वाधिक २१ टॅंकरद्वारे २२ गावे आणि १३५ वाड्यावस्त्यांवरील ३३ हजार ९१७ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईचा फटका येथील पशुधनालाही बसू लागला आहे. खटाव तालुक्‍यातील पाच गावे व सात वाड्यावस्त्यांवरील ४१४९ नागरिकांना चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यातील एका गावात पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, येथेही एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणीटंचाईत वाढ होत असल्याने सहा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. यामध्ये माणमधील पाच व खटाव तालुक्यातील एका विहिरीचा समावेश आहे. येत्या काळात पाणीटंचाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे प्रशासनास पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com