पुणे ः धान्य साठवणुकीमध्ये शिफारशीनुसार कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करणे, त्यासंदर्भात विविध नियम अशा महत्त्वाच्या बाबी आहेत. याबाबत शेतकऱ्यांना मूलभूत घटकांची माहिती नाही. त्यामुळे कीटकनाशकांचा योग्य पद्धतीने वापर होत नाही. योग्य वापरासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल, अशी माहिती भारतीय कीटकशास्त्र सोसायटीचे सचिव डॉ. राममूर्ती यांनी दिली.
भारतीय कृषी संशोधन परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि भारतीय कीटकशास्त्र सोसायटी यांच्या वतीने पुणे कृषी महाविद्यालयात ‘धान्याची सुरक्षित साठवणूक व संरक्षण’ या विषयावर दोनदिवसीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी (ता. २९) या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राममूर्ती बोलत होते.
या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, तमिळनाडू कृषी विद्यापीठातील प्रसिद्धी विभागाचे संचालक डॉ. एस मोहनकुमार, भारतीय कीडनियंत्रण संघटनेचे अध्यक्ष राजीव परुळकर, कऱ्हाड कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साताप्पा खरबडे, भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कीटकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. चित्रा श्रीवास्तव, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, डॉ. उत्तम होले आदी उपस्थित होते.
डॉ. राममूर्ती म्हणाले, की देशात धान्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते; परंतु साठवणुकीमध्ये जवळपास वीस ते तीस टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धान्य साठवणुकीमध्ये कीटकनाशके वापरण्याच्या सुरक्षित पद्धती, काही प्रमाणात धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली जाणार आहे.
कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले, की आधुनिक तंत्रज्ञानाच्या अवलंबनामुळे देशातील धान्य उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. उत्पादित झालेल्या शेतीमालाची योग्य हाताळणी व साठवण या महत्त्वपूर्ण बाबी आहेत; परंतु संशोधनामधून असे निदर्शनास आले आहे, की शेतीमाल काढणीनंतर हाताळणी, वाहतूक व साठवण यामध्ये धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी, व्यापारी, निर्यातदार व आयात प्रक्रिया उद्योजक, तृणधान्य व कडधान्यांशी संबधित उद्योग संस्था, प्रक्रिया उद्योग, कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ, धान्य साठवणूक व नियमनासंबंधित शासकीय विभागांचे प्रतिनिधी, धान्य साठवणुकीकरिता गोदामे तसेच धुरीकरणाची सेवा पुरविणारे पुरवठादार, कृषी विभागाचे व कृषी विद्यापीठांमधील अधिकारी आदी विषयाशी संबंधित सर्व भागधारकांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे.
या वेळी सहायक प्राध्यापक डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. कीटकशास्त्र व हवामान विभागाचे प्रमुख डॉ. दादासाहेब पोखरकर यांनी आभार मानले.