म्हैसाळ योजना थकीत वीजबिल आणि पाणीपट्टी यांमुळे बंद होती. यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र, कृष्णा खोरे महामंडळाने १५ कोटी रुपये दिल्याने ही योजना सुरू झाली. ही योजना सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. शेतीला पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा पाणीपट्टी भरण्याकडे कल आहे.
शेतकरी पाटबंधारे विभागाशी संपर्क करून आमची पाणीपट्टी अगोदर घ्या, असे सांगत आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी पाणीपट्टी वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊ लागले आहेत. शासनाने ८१-१९ असा नियम उपसा सिंचन योजनेसाठी लागू केला आहे. ८१ टक्के शासनाचा वाटा तर १९ टक्के शेतकऱ्यांचा वाटा यामुळे पाणीपट्टीची रक्कम कमी झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ११ हजार रुपये प्रति दश लक्ष घनफूट पाणीपट्टी आहे.
नवीन आदेशानुसार सध्या एकरी १२०० रुपये म्हैसाळची पाणीपट्टी आहे. पाणीपट्टी कमी झाल्याने शेतकरी ती भरण्यास पुढे आले आहेत. कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने या योजनेतील पंप बंद केले असून २४ पंप सुरू आहेत. कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नदीतील पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर पुन्हा पंप सुरू केले जातील.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन कायम सुरू राहण्यासाठी आता पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पैसे भरा आणि पाणी घ्या हे धोरण पाटबंधारे विभागाने राबविले आहे. त्यामुळे शेतकरी पाणी पट्टी भरण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. महिन्यात सुरू केलेल्या आवर्तनाची पाणीपट्टी शंभर टक्के वसुलीसाठी अधिकारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क करत आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.