अनियंत्रित कीड नियंत्रण

भेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे.
संपादकीय
संपादकीय

राज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस सुरू आहे. असे वातावरण खरीप पिकांवरील कीड-रोगास अत्यंत पोषक आहे. खरिपातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिकांवर रस सोशक किडी; तसेच पाने, फुले, पात्या, बोंडं खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसाने पिकांची वाढ खुंटली असून, अशी पिके अनेक रोगांनादेखील बळी पडताहेत. मागील वर्षी बोगस कीडनाशके, शिफारस नसताना अनेक कीडनाशकांचे अप्रमाणित मिश्रण आणि फवारणी वेळी आवश्यक ती काळजी घेतली न गेल्याने राज्यात जवळपास ५० शेतकरी, शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर या वर्षी तरी बनावट कीडनाशकांपासून ते एकंदरीतच पीक संरक्षणाबाबत कृषी विभाग सर्वोतोपरी काळजी घेईल, असे वाटत होते. परंतु तसे काहीही झालेले नाही. मुळात मागणीप्रमाणे प्रमाणित कीटकनाशकांचा राज्यात पुरवठा नाही. बोगस कीटकनाशके बाजारात पोचली आहेत. शेतकऱ्यांनी एखाद्या शिफारशीत कीटकनाशकाची मागणी कृषी सेवा केंद्र चालकाकडे केल्यास, ‘ते कशाला मागता त्याचा बाप देतो नं’ म्हणून भलतेच कीटकनाशक त्यांच्या माथी मारले जात आहे. सोबत टॉनिक, जैविक कीडनाशक, वाढ संजिवके शेतकऱ्यांनी मागणी न करता दिली जात आहेत. या सर्वांचे प्रमाणदेखील कृषी सेवा केंद्र चालकच बिनदिक्कतपणे सांगत आहेत. त्यामुळे या वर्षीदेखील कीडनाशकांची विषबाधा होऊन चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे.   

राज्यात कापसाचे बेकायदेशीर बियाणे मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या बोगस बियाण्यांचा सामना शेतकऱ्यांना या वर्षीही करावा लागला. त्यानंतर शेतकऱ्यांकडून ठरावीक रासायनिक खतांची मागणी वाढली असताना त्यांचा कृत्रिम तुटवडा भासवून ब्लॅकमध्ये अधिक दराने सर्रास विक्री सुरू आहे, तर काही भागात बनावट पोटॅश, डीएपी ही आढळून आले आहे. हे सर्व कमी की काय या वर्षीसुद्धा बोगस, अप्रमाणित कीटकनाशकांचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. हे सर्व पाहता कृषी निविष्ठांच्या बाबतीत सारे काही अनियंत्रितच असल्याचे दिसून येते. बनावट कीटकनाशक प्रकरणी कृषी आयुक्तांनी चौकशीचे आदेश देऊन यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईची ताकीद दिली आहे. अशावेळी तक्रार दाखल झालेले, संशयित लॉटबरोबर एकंदरीतच बाजारातील सर्वच कीटकनाशकांचे नमुने घेऊन त्यांची कसून तपासणी व्हायला हवी. यात भेसळ, बनावटपणा आढळल्यास अशा कीटकनाशकांची विक्री थांबवून असे प्रकार करणारी व्यक्ती, संस्था, कंपनी आणि विक्रेते यांवर कडक कारवाई व्हायला पाहिजे. हे करीत असताना खरिपातील पिकांवरील कीड आणि रोग कोणता, त्यासाठी शिफारस असलेले कीडनाशक कोणते, ते किती प्रमाणात वापरायचे, फवारणी करताना काय काळजी घ्यायची याबाबतचे प्रबोधनही वाढवावे लागेल. असे झाले नाही तर शेतकरी स्वतःच्या समाधानासाठी फवारण्या तर करतील, परंतु त्याचे अपेक्षित परिणाम त्यांना मिळणार नाहीत. उलट फवारणीवरील खर्च वाया जाईल, त्याहूनही गंभीर बाब म्हणजे विषबाधा झाली तर शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com