संकट टाळण्यासाठी...

गुलाबी बोंड अळीचे संकट आपल्या दारात आहे. आत्ताच सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन या संकटाला तेथेच थोपवायला हवे.
संपादकीय
संपादकीय

मागच्या वर्षी वऱ्हाड प्रांत आणि खानदेशामध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातच कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून लागला होता. याची दखल घेत ॲग्रोवनने ‘वेळीच ओळखा बोंड अळीचा धोका’ असा अग्रलेख प्रसिद्ध करुन शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी विभाग आणि राज्य शासनालासुद्धा सजग केले होते. परंतु हा विषय कुणीही गांभीर्याने घेतला नाही. पुढे त्याचे परिणाम काय झाले, हे सर्वांसमोर आहेत. गेल्या वर्षी राज्यातील बीटी कापसाखालील ८० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट आढळून आली. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे कापसावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांची फवारणी करताना ४० शेतकरी-शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. गेल्या वर्षीच्या गुलाबी बोंड अळीच्या उद्रेकानंतर कृषी विभागाने डिसेंबरनंतर फरदड शेतात ठेऊ नये, कापसाच्या पऱ्हाट्या-पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावे, शेताची खोल नांगरट करावी, या वर्षी पूर्वहंगामी कापूस घेऊ नये, पीक फेरपालट करावी, कमी कालावधीचे बियाणे वापरावे, रेफ्युजी बियाणे लावावे आदींबाबत प्रबोधन केले होते. परंतु ही माहिती सर्वच कापूस उत्पादकांपर्यंत पोचली नाही. पोचली असेल तरी सर्वच कापूस उत्पादकांनी त्याचे तंतोतंत पालन केलेले नाही, हे सत्य आहे. 

चालू हंगामात जिनींगमध्ये लावलेल्या कामगंध सापळ्यात गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून येत आहेत. काही शेतकरी पऱ्हाट्या इंधन म्हणून जाळण्यासाठी शेताच्या बांधावर अथवा गावालगतच्या जागेत साठवतात. त्यावर असलेल्या अळीच्या कोशातूनही पतंग बाहेर पडतात. गुलाबी बोंड अळीच्या नर-मादी पतंगांचे मिलन झाल्यावर मादी कापसाच्या फूल, कळ्या, पाते, बोंडांवर अंडी घालते. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचे संकट आपल्या दारावरच आहे. आत्ताच योग्य ती खबरदारी घेऊन या संकटाला दारातच थोपवायला हवे. नाही तर हे संकट मागच्या वर्षीप्रमाणे विशाल रूप धारण करू शकते.  

राज्यभरातील सर्व कापूस उत्पादकांनी आपल्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, झाला तरी तो फारसा नुकसानकारक ठरणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. गुलाबी बोंड अळी येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपायांबाबत कृषी विभाग, कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला हवे. कापसासह इतरही खरीप पिकांमध्ये कीडरोगांचे सर्वेक्षण करून सनियंत्रण व सल्ला यासाठी क्रॉपसॅप प्रकल्प राबविला गेला. यातील कंत्राटी सर्वेक्षक कीडरोगांच्या सर्वेक्षणाचे काम उत्तम प्रकारे करीत होते. या वर्षी कृषी विभागाने अशा सर्वेक्षकांना हटवून ते काम कृषी सहायकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत दिले आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत सर्वांना माहीत आहे. त्यामुळे कीडरोग सर्वेक्षणाचा बट्ट्याबोळ वाजणार असेच दिसते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना केवळ कामगंध, प्रकाश सापळे लावा, निंबोळी अर्काची फवारणी करा, अशा उपाययोजना सांगून भागणार नाही. तर हे साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे लागेल. तसेच कामगंध, प्रकाश सापळे कुठे, कसे लावायचे, त्यातील ल्यूर कधी, कसा बदलायचा, त्यात किती पतंग आढळले म्हणजे फवारणी करायची, निंबोळी अर्क फवारणीचे प्रमाण काय, रासायनिक कीडनाशके कधी, कोणती, कशी फवारायची याचे संपूर्ण मार्गदर्शन प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांना व्हायला हवे. असे झाले तरच गुलाबी बोंड अळी या वर्षी नुकसानकारक ठरणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com