आधार हवा उभे करणारा

दुसऱ्याच्या दुःखात डोकावून त्याला किमान मानसिक, आर्थिक आधार द्यावा, असे आज समाजमनाला वाटत नाही, परंतु सर्वत्रच असे नकारात्मक चित्र नाही.
संपादकीय
संपादकीय

शेतकरी आत्महत्यांची कारणे स्पष्ट आहेत. त्यावरील उपायही माहीत आहेत. तरीही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होताना दिसत नाहीत. उलट विदर्भातून सुरू झालेले शेतकरी आत्महत्यांचे सत्र आता राज्यभर, देशभर पोचले आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यावरून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न कमी पडत आहेत, असेच म्हणावे लागेल. मागील सुमारे दीडएक दशकापासून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनासह अनेक सेवाभावी संस्था विविध उपक्रम, योजना राबवित आहेत. परंतु तरीही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबत नाहीत.

खरे तर शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब उद्‍ध्वस्त होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीवर कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन पडते. यातील काही महिला दुःख अंगावर घेऊन अत्यंत खंबीरतेने उद्‍ध्वस्त संसाराची घडी पुन्हा बसवतात. शेतीतच काबाडकष्ट करून मुला-मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांना उद्योग-व्यवसायाला लावतात. परंतु बहुतांश महिलांनी संसाराचा गाडा रुळावर आणला तरी सध्याच्या परिस्थितीत मुलांबाळांचे शिक्षण पूर्ण करणे त्यांना कठीण जाते. खरे तर बऱ्यापैकी आर्थिक स्थिती असलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबातील मुलामुलींना आता चांगले शिक्षण मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी मोफत निवासी शिक्षणाचा आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देऊन उभे करणे ही शासनाबरोबर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. परंतु आजचा समाज सुखाचा वाटेकरी आहे, दुःखाचा नाही. त्यांच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. एखाद्यावर संकट कोसळले तर त्यात मला काय करायचे, असे समाजातल्या बहुतांश लोकांना वाटते. दुसऱ्याच्या दुःखात डोकावून त्याला किमान मानसिक, आर्थिक आधार द्यावा, असे त्यास वाटत नाही. परंतु सर्वत्रच असे नकारात्मक चित्र नाही. ‘रयत’, ‘आपुलकी’सह काही सेवाभावी संस्था, कॉर्पोरेट घराणी तर काही ठिकाणी आयटीतील मुले एकत्र येऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना आधार देऊन त्यांना उभे करीत आहेत. शेतकरी आत्महत्या ही राज्यातील सर्वांत मोठी सामाजिक समस्या बनली आहे. या संकटाचा सामना सर्वांनी मिळून करावयाचा आहे, हा भाव खरे तर या संस्था समाजमनावर रुजवत आहेत. या संस्थांच्या कार्यातून संकटग्रस्तांना आपण एकटे-दुकटे नाही, आपल्या पाठीमागे समाजातील अनेकजण उभे आहेत, असा मानसिक आधार तर मिळतोच; परंतु उद्ध्वस्त कुटुंबांना जगण्याचे सामर्थ्य मिळते.

‘रयत’ ही संस्था तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभी राहिलेली आहे. या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणाची केवळ बीजेच रोवली नाही, तर ‘कमवा आणि शिका’ असे धडे देऊन गरीब मुलांना विद्यार्थिदशेतच स्वावलंबी बनविण्याचे काम केले आहे. आज शालेय शिक्षणात शेतीचे शिक्षण गरजेचे असताना, शासनाला त्याचे फारसे गांभीर्य वाटत नाही. परंतु रयत शिक्षण संस्थेच्या तब्बल २० शाळांमधून आधुनिक शेती मुलांना शिकविली जाते. रयत शिक्षण संस्थेला या उपक्रमात अनेक कॉर्पोरेट घराण्याची साथ लाभते आहे, ही बाब उल्लेखनीय आहे. परंतु आजही अनेक कॉर्पोरेट घराणी समाजिक क्षेत्रात फारसे काही करताना दिसत नाहीत. त्यांनी ‘सीएसआर’च्या पुढे जाऊन संकटग्रस्तांना उभे करण्याचे काम करायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com