त्रिपुराचे वैभव ः राणी अननस

त्रिपुरा राणी अननस
त्रिपुरा राणी अननस

त्रिपुरा राज्यातील अननसाला ‘त्रिपुरा राणी अननस’ या नावाने ओळखले जाते. खास चव, आकार आणि गुणवत्तेमुळे त्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले. या अननसाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते.

त्रिपुरा हे नैसर्गिक समृद्धीने नटलेले राज्य. या राज्यात आठ जिल्हे आहेत. राज्याचे क्षेत्रफळ दहा लाख एकोणपन्नास हजार आहे. राज्याच्या तीनही बाजूंनी बांगलादेशची सीमा आहे, तर केवळ ईशान्येला काही भाग आसाम व काही भाग मिझोरमला जोडलेला आहे. राज्यात निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्रिपुरा एक कृषिप्रधान राज्य. येथील निम्म्याहून अधिक लोक शेतीवर अवलंबून आहेत. येथे डोंगराळ भाग जास्त आहे. डोंगराळ भागामुळे येथील केवळ २७ टक्के जमीन लागवडीखाली आहे. अननस, भात आणि फणस ही मुख्य पिके, याशिवाय रबर, चहा ही नगदी पिके आहेत. येथील अननस हे पीक इतर राज्यांत लागवड केल्या जाणाऱ्या अननसापेक्षा काही बाबतीत खास आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.  अननसाचा इतिहास 

  • अननस हे पोर्तुगीज नाव आहे. अननस हे फळ ख्रिस्तोफर कोलंबस याला १४९३ मध्ये सर्वांत प्रथम ग्वादेलोप (ग्वादेलोप हे बेट  कॅरिबियन समुद्रामधील  लेसर अँटिल्स द्वीप समूहाचा भाग असून, तो फ्रान्सच्या पाच परकीय प्रदेशांपैकी एक आहे.) या बेटावर सापडले असा उल्लेख आढळतो. 
  •  हे फळ मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे असे म्हणतात. असे असले तरी ख्रिस्तोफर कोलंबस त्याला पिना डी इंडस (piña de Indes) असे म्हणतो. या शब्दाचा अर्थ ‘भारतीय वंशाचा’ (‘pine of the Indians’) असा होतो. त्यामुळे अननसाचा संबंध आणि संदर्भ भारताशी जोडला गेला आहे. 
  • खास चव, रंग आणि आकारात वेगळेपणा  

  • त्रिपुरा राज्यातील अननसाला ‘त्रिपुरा राणी अननस’ या नावाने ओळखले जाते. खास चव, आकार आणि गुणवत्तेमुळे त्याला भौगोलिक मानांकन (जीआय) मिळाले.
  •  त्रिपुरा राणी अननसाची लागवड पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ही जात इतर अननसापेक्षा चवीने, आकाराने तसेच गुणवत्तेच्या बाबतीत वेगळी आहे. 
  • अननसाची पाने थोडी कडक, त्याचा कडा काटेरी असतात. दोन्ही बाजूंच्या पृष्ठभागावर एक पांढऱ्या रंगाचे आवरण असते. हे फळ इतर प्रकारच्या अननसाच्या तुलनेत खूप लहान असले तरी सुवासिक सुगंध आणि सोनेरी पिवळा रंग याचे वैशिष्ट्य आहे. रस चमकदार पिवळ्या रंगाचा असतो. 
  • एका फळाचे वजन साधरणतः एक ते दीड किलो इतके असते. यामध्ये एकूण साखरेचे प्रमाण १३ ते १४ टक्के आहे. जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण २८ ते ३० मिलिग्रॅम/१०० ग्रॅम इतके आहे. टीएसएसचे प्रमाण १८ ते १९ टक्के तर पाण्याचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के इतके असते. या फळात धागे कमी प्रमाणात असतात.
  • अनुकूल हवामानाचा फायदा   अननस हे भारतातील उत्तर-पूर्व राज्यांत घेतले जाणारे प्रमुख पीक. हे पीक व्यावसायिकदृष्ट्या आसाम, मेघालाय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश नागालँड आणि मणिपूर या राज्यांत घेतले जाते. त्रिपुरा हे अननसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. त्रिपुरामधील अननसाच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे ६,२०० हेक्टर आहे. साधारणपणे एका हेक्टरमध्ये १९ टन उत्पादन मिळते.  त्रिपुरातील अननसाला जीआय रूपाने जे यश मिळाले, त्याचे एक कारण म्हणजे त्रिपुरामधील कृषी हवामानाची स्थिती. अननस लागवडीसाठी येथील हवामान उपयुक्त आहे. या ठिकाणी डोंगराळ भाग असल्यामुळे कमी कॅल्शियम आणि किंचित आम्लीय गुणधर्माची जांभ्या खडकाची जमीन आढळते. सामूचे प्रमाण ५ ते ६ इतके आहे. हे सामूचे प्रमाण अननस वाढीसाठी उपयुक्त ठरते. येथील तापमान साधारणत: १५ अंश सेल्सिअस ते ३२ अंश सेल्सिअस इतके असते. येथे पाऊस चांगल्या प्रमाणात पडतो. अशा प्रकारच्या हवामानामुळे येथील राणी अननस इतर राज्यांतील अननसापेक्षा चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत वेगळा आहे.     शेतकऱ्यांना झाला फायदा  उत्तर-पूर्व विभागीय कृषी विपणन महामंडळ (एनईआरएएमएसी) यांनी या अननसाच्या वैशिष्टपूर्ण गुणधर्मामुळे जीआय नोंदणीसाठी २९ ऑगस्ट २०१३ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला होता. नोंदणीसाठी या संस्थेला अथक प्रयत्न करावे लागले. या अननसातील अद्वितीयपणा सिद्ध झाल्यानंतर जीआय रजिस्ट्रीने २५ मार्च २०१५ ला जीआय प्रमाणपत्र दिले. अशा प्रकारे त्रिपुरा राणी अननसाला जीआय मानांकन मिळाले.

    जीआय मानांकन मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्याला अननस हा जागतिक बाजारपेठ नेण्याची संधी मिळाली.वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अलीकडेच संपूर्ण पूर्वोत्तर क्षेत्रात त्रिपुरामध्ये कृषी निर्यात क्षेत्र योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविल्या जातील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून दिला जाईल. याचा फायदा निश्चित शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी होईल. सध्या बांगलादेश तसेच इतर देशांमधून या अननसाला मागणी आहे.  जीआय मानंकानामुळे हा अननस जगभर पोचणार आहे. या ठिकाणी फळ प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढत आहे. संपर्क ः गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१  (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com