काटेकोर नियोजनातून फळबाग केली फायद्याची

डाळिंब झाड सशक्त ठेवण्यावर भर.
डाळिंब झाड सशक्त ठेवण्यावर भर.

डाळिंब बागेत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, शेतीला पोल्ट्रीची जोड आणि प्रभावी व्यवस्थापन या त्रिसूत्रीतून शेती किफायतशीर करण्याचा प्रयत्न कळवण (जि. नाशिक) येथील भूषण कौतिकराव पगार यांनी केला आहे. सशक्त झाड, काटेकोर खत आणि पाणी व्यवस्थापन, दर्जेदार डाळिंब उत्पादनावर पगार यांचा भर आहे. 

कळवण (जि. नाशिक) पासून जवळच एकलहरे शिवारात पगार कुटुंबीयांची शेती आहे. कौतिक पगार यांनी पारंपरिक शेतीपासून डाळिंब फळबागेपर्यंतचा टप्पा गाठला. सध्या त्यांचा मुलगा भूषण हे शेतीची जबाबदारी सांभाळतात. बदलत्या काळाबरोबर त्यांनी शेतीत आधुनिकता आणली. भूषण यांनी गेल्या वर्षी १६ एकरांवर द्राक्ष लागवड केली आहे. त्यासोबतच पोल्ट्री उद्योगाची शेतीला जोड दिली आहे.

डाळिंब बाग केली किफायतशीर     डाळिंब लागवडीबाबत भूषण पगार म्हणाले, की हलक्या जमिनीत आम्ही २०११ मध्ये सहा एकरांवर डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली. त्यानंतर २०१३ मध्ये पाच एकरांवर रुबी आणि सात एकरांवर भगवा जातीची लागवड केली. दोन ओळींत १२ फूट आणि दोन झाडांत १० फूट अंतर ठेवले आहे. लागवड करताना ३ फूट बाय ३ फूट बाय ३ फूट आकाराचे खड्डे खणून, त्यामध्ये निंबोळी पेंड, शेणखत, कोंबडीखत, गांडूळखत, उसाचे पाचट, गव्हाचे तूस, म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश हे मिश्रण भरले. त्यामुळे रोपांची चांगली वाढ झाली.

अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर 

  अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत भूषण पगार म्हणाले, की बहर धरताना माती परीक्षणानुसार खते देतो. वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खते फर्टिगेशनद्वारे देतो. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये देतो. दरवर्षी माती व पाणी परीक्षण करून खतांच्या नियोजनात बदल करतो. मागील तीन वर्षांपासून शेणस्लरी वापरावर भर दिला आहे. शेणस्लरीमुळे रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी झाला. शेणस्लरी बनविण्यासाठी  टाक्‍या बनवल्या आहेत. टाकीतून स्लरी काढण्यासाठी मडपंप बनविला. मी चार प्रकारच्या स्लरी तयार करतो. एप्रिल ते आॅगस्ट या काळात दहा वेळा शेणस्लरी दर १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून देतो.    रासायनिक खताची स्लरी : २०० लिटर पाण्यात शेणखत २० किलो, गोमूत्र १० लिटर, म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो, डीएपी ५० किलो, सल्फेट ऑफ पोटॅश ५० किलो यांचे मिश्रण तयार करतो. हे मिश्रण सात दिवसांपर्यंत भिजत ठेवतो. या सात दिवसांत एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी मिश्रण ढवळतो. सात दिवसांनी मिश्रण चांगले एकजीव होते. त्यानंतर हे द्रावण प्रतिझाड दोन लिटर या प्रमाणात दिले जाते.    सूक्ष्म अन्नद्रव्य स्लरी : मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन, फेरस, मॅंगनीज, मॉलिब्डेनम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे एकत्र स्वरुपातील खत २५ किलो किंवा सुटे असे एकत्रित एकूण २५ किलो, त्यामध्ये २०० लिटर पाणी, २० किलो शेणखत, १० लिटर गोमूत्र हे मिश्रण वरीलप्रमाणे सात दिवसांपर्यंत भिजत ठेवतो. सात दिवसांनी हे मिश्रण प्रतिझाड दोन लिटर दिले जाते.   कडधान्ये स्लरी :  सात प्रकारच्या डाळींचा एकत्रित भरडा, गोमूत्र १० लिटर, २० किलो शेण २०० लिटर पाण्यात मिसळतो. हे मिश्रण सात दिवस भिजत ठेवतो. सात दिवसाने हे मिश्रण प्रतिझाड दोन लिटर दिले जाते.   पोल्ट्री खत स्लरी : ८० किलो कोंबडी खत, शेणखत ५० किलो, गोमूत्र १० लिटर आणि २० लिटर पाणी असे मिश्रण सात दिवस भिजत ठवतो. सात दिवसांनी हे मिश्रण प्रतिझाड दोन लिटर दिले जाते.

स्लरीचे फायदे 

  •  जमीन भुसभुशीत झाली, अतिरिक्त क्षारांचे नियंत्रण.
  •  अकाली फुलगळ थांबून अवघी १० टक्‍क्‍यांवर आली.
  •  फळे एकसारख्या आकाराची.
  •  फुगवण, चकाकी व गोडीत वाढ.
  •  फळांचे वजन ३५० ग्रॅम ते ७३० ग्रॅम, सरासरी ५०० ग्रॅम.
  • काटेकोर पाणी व्यवस्थापन  

    पाणी नियोजनाबाबत पगार म्हणाले, की छाटणी झाल्यानंतर पहिले पाणी जास्त दिले जाते. फूट निघू लागल्यानंतर पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. जानेवारी ते मे या महत्त्वाच्या कालावधीत पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेतो. प्रतिझाड ३० ते ५० लिटर पाणी एका वेळेस दिले जाते. जूननंतर पाणी हळूहळू कमी केले जाते. 

    झाड सशक्त करण्यावर भर 

    दरवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत वातावरणातील आर्द्रता वाढल्यानंतर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. रोग नियंत्रणासाठी शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार बुरशीनाशकांचा वापर केला जातो. बागेची स्वच्छता ठेवली जाते. झाड सशक्त करण्यावर भर दिल्याने रोगाचा प्रादुर्भाव फार कमी असतो असे पगार सांगतात. बहराचे नियोजन करताना पगार यांनी खत, पाणी व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले आहे. दरवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत हंगाम आटोपतो. त्यानंतर दोन महिने हा बागेचा विश्रांती काळ असतो. या काळात झाडांच्या आळ्यात शेणखत, गांडूळखत, निंबोळी पेंड मिसळली जाते. १५ जानेवारीदरम्यान छाटणी आणि पानगळ करून घेतो. फेब्रुवारीत पाणी देतो. शिफारशीनुसार खत मात्रा आणि पाणी दिले जाते. ऑगस्ट ते सप्टेंबर अखेरपर्यंत उत्पादन सुरू रहातो. पगार यांना पहिल्या वर्षी ४ टन, दुसऱ्या वर्षी ५ टन, तिसऱ्या वर्षी ७ टन, चौथ्या वर्षी १२ टन इतके प्रतिएकरी उत्पादन मिळाले. बागेमध्येच विविध राज्यांतील व्यापाऱ्यांना डाळिंबाची विक्री केली जाते. रुबी जातीला प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये आणि भगवा जातीला ७० रुपये दर मिळाला आहे.   

    डाळिंब व्यवस्थापनाचे मुद्दे  

  •  गरजेनुसार योग्य पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापनावर विशेष भर, 
  •     शेणस्लरीचा नियमित वापर
  •  छाटणीनंतर एका फांदीला ४ ते ५ सशक्त काड्या ठेवल्या जातात. काटा पूर्ण न काढता अर्धाच कट केला जातो. त्यामुळे फळ फार पुढे व मागे न निघता मध्यभागीच मिळते. पाला मोठा मिळतो. या स्थितीत फळ उन्हाळ्यात खराब होत नाही. 
  •  एका झाडावर क्षमतेनुसार जास्तीत जास्त १५० फळे.
  •  स्वयंचलित यंत्रणेने गरजेनुसार पाणी नियोजन. 
  • फळबागेला पोल्ट्रीची जोड  २०११ मध्ये भूषण पगार हे कृषी अधिकारी मोहन वाघ, उद्योजक संजय देवरे यांच्या मार्गदर्शनाने पोल्ट्री व्यवसायाकडे वळले. सुरवातीला २० हजार ब्रॉयलर कोंबड्यांचे शेड उभारले.  मात्र २०१२ पासून ते ब्रीडर फार्मिंगकडे वळले. सद्यःस्थितीत ते दररोज ५५०० ते ६००० अंड्यांचे उत्पादन घेतात. अंडी खरेदीसाठी त्यांनी एका हॅचरीबरोबर करार केला आहे. ब्रीडर फार्ममधील बहुतांश मिळकत ही कर्ज हफ्त्यात जाते.

    कुटुंबातील प्रत्येकाचा सहभाग  भूषण यांचे वडील कौतिक पगार, त्यांची आई सुनीता पगार यांच्यासह भूषण यांचे छोटे बंधू रोहित, भूषण यांची पत्नी सोनाली, रोहित यांची पत्नी श्‍वेता यांनी फळबागेतील जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाते.

    संपर्क ः भूषण पगार,  ९९६०९१२००९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com