वेळ लई बाका-पुढ्यातला!

वायुप्रदूषण हे जगभरातील मृत्यूचे पाचवे मोठे कारण ठरले आहे. चीनने यावर वेळीच उपाय करणे सुरू केले; पण भारत मात्र अजून जागा झाला नाही.
संपादकीय
संपादकीय

‘मध्यम आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे’ असे भारतीय संशोधन संस्था व इकहान स्कूल ऑफ मेडिसीन, नवी दिल्ली यांच्या अभ्यासामधून निष्पन्न झाले. ‘जगभरात वायुप्रदूषणामुळे २०१५ मध्ये सुमारे ४२ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला, तर भारतात ११ लाख व चीनमध्येही ११ लाख बळी गेले. जगभरातील ९२ टक्के लोकसंख्या अशुद्ध वातावरणात श्वास घेत असते,’ असे हेल्थ इफेक्‍टस्‌ इन्स्टिट्यूट (एमईआय) अमेरिका यांच्या अहवालात म्हटले आहे.

वायुप्रदूषण हे जगभरातील मृत्यूचे पाचवे मोठे कारण ठरले आहे. चीनने यावर वेळीच उपाय करणे चालू केले; पण भारत मात्र अजून जागा झाला नाही. देशभरात १६८ शहरामधील हवेची गुणवत्ता तपासल्यानंतर हा निष्कर्ष काढला गेला. वाहनातून निघणारा धूर सर्वाधिक अपायकारक असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. वाहनातून निघणारा धूर व अन्य प्रदूषकांचे कण वातावरणाचे ४० ते ६० टक्‍क्‍यांनी प्रदूषण वाढवितात. यासाठी अवजड वाहने सर्वाधिक जबाबदार आहेत. 

‘जळणाऱ्या कोळशाचा इंधन म्हणून वापर केल्याने होणाऱ्या वायुप्रदूषणाने चीनमध्ये २०१३ मध्ये ३.६६ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला. स्टील, सिमेंट कारखाने, मोठ्या प्रमाणात वाहनातील प्रदूषित विषारी वायूमुळे प्रमुख शहरे बाधित झाली.’ घराबाहेर पडताना मास्क लावावे लागते. खोकला, कफ, घशाची जळजळ या प्रकाराला तिथे ‘बिजिंग कफ’ असे संबोधले जाते. भारतातील अलाहाबाद हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे. तिथे ३० मिनीट सायकल चालवण्याचा व्यायाम केला तर उपायापेक्षा अपायच जास्त होतो. ग्वाल्हेर, वाराणशी ही त्यानंतरची प्रदूषित शहरे. सध्या दिल्लीचे उदाहरण ताजे आहे.

दिवाळीतल्या फटाक्‍यांचा धूर व थंडीमुळे जड झालेली हवा यांचे जाड थर शहरावर मैली चादर पसरवून आहेत. त्यातून कोण सुटेल, हा प्रश्‍न प्रत्येकाला भेडसावतो आहे. आज प्रत्येकाला नाकावर, तोंडावर मास्क बांधून शहरात फिरावे लागते. ४०० लोक विमान प्रवासात मरतात तेव्हा सर्व जगाचे लक्ष लागते. पण १७०० विमाने कोसळून जेवढे मृत्यू होतील तितके मृत्यू वायू प्रदूषणाने होताहेत. हे नाही टाळले तर कोसळणाऱ्या एखाद्या विमानात आपणही असू शकतो?

केंद्रीय वायुप्रदूषण मंडळाने देशभरातील १२१ शहरांतील वायुप्रदूषणाचा अभ्यास केला. देवास, कोझीकोडा आणि तिरुपती शहराचा अपवाद वगळता अन्य सर्व शहरांमध्ये वायुप्रदूषणाचा स्तर प्रचंड वाढत आहे. तथाकथित वाहन क्रांती याला जबाबदार आहे, असे अहवाल सांगतो. झाडंझुडपे हवेतील कार्बनडाय ऑक्‍साईड शोषून घेतात. एवढेच आपल्याला माहीत आहे; परंतु कार्बन शोषून घेण्याची त्यांची क्षमता कमी- कमी होत चालल्याचे अहवाल सांगतो. ज्या मार्गावरून सतत वाहतूक सुरू असते त्या मार्गावरील झाडाझुडपांची क्षमता क्रमशः घटत गेली असून ती आता अवघी ३६.७५ टक्केच उरली आहे. आता कार्बन शोषून घेण्यासाठी तिप्पट झाडे लावावी लागतील. आणखी ती मोठी होईपर्यंत त्यांची क्षमता घटत जाणार? अशा उपाययोजनांपेक्षा प्रदूषणाचा स्तरच कमी करणे अत्यंत आवश्‍यक बनले आहे. डेहराडून येथील वन संशोधन संस्थेने केलेल्या प्रयोगात हे सत्य समोर आले आहे.

‘जलवायू संशोधन आणि त्यांचा जंगलावर होणारा परिणाम’ याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. हुकूमसिंग यांनी फोटो सिंथेसीस ॲनलाईजरच्या माध्यमातून कार्बन शोषून घेणाऱ्या झाडाझुडपांच्या क्षमतेचा वेध घेतला. प्रदूषणाचा स्तर अत्यंत उच्च असणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रदूषकांचा थर पानावर जमून ते झाकोळल्याने प्रकाश संश्‍लेषण प्रक्रिया मंदावली. निसर्गाने आपणाला पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे झाडे ही होत. त्यांचीही क्षमता आम्ही घटवत चाललो आहोत. 

प्रदूषणाचा स्तर कमी करावयाचा तर आपल्याला विकास प्रक्रियेची नव्याने मांडणी करावी लागेल आणि या सर्व एकत्रित परिणामामुळे हवामान बदलाचा परिणाम दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. नवोनील दास अर्थडे नेटवर्कच्या प्रतिनिधीच्या मते जगभरात २०२० पर्यंत ७.८ अब्ज वृक्ष लागवड अपेक्षित आहे. कारण २०१७ हे वर्ष आजवरचे सर्वात उष्ण असे तिसरे वर्ष ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) वेधशाळेने म्हटले आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी व सौर ऊर्जेसाठी नागरिकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिसर, घर, समाज, हिरवागार करावा लागेल;तर वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांच्या मते वृक्षरोपणाकडे दुर्लक्ष करून आज मानवाने ३६ लाख एकरावरील जंगलतोड केली.

मानवी जीवनात पैसा, सोने यापेक्षा शुद्ध पाणी, हवा व वनस्पतीचे महत्त्व अधिक आहे. तेव्हा या मोहिमेत आपण सर्व जण सामील होऊया. याची सुरवात स्वतःपासून करूयात. घर, परिसर, गाव अन्‌ देश जर स्वच्छ झाला, प्रत्येकांनी किमान एक जरी झाड लावून जगवले व स्वतःच्या सवयी बदलल्या तरी ही समस्या मोठी नक्कीच होणार नाही. गरज आहे प्रयत्नांची, विश्वासाची अन्‌ स्वतःतला माणूस जिवंत ठेवण्याची. नाही तर काळ तुम्हाला माफ करणार नाही हे मात्र नक्की. शेवटी... ‘नाही ऐकल्या कोणी- सावध या हाका वेळ लई बाका-पुढ्यातला’ रमेश चिल्ले : ९४२२६१०७७५ (लेखक शेती व पर्यावरणाचे  अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com