सहनशीलतेचा अंत किती दिवस पाहणार?

सतत तोटा येणार आहे हे कळूनसुद्धा शेतीसारखा आतबट्ट्याचा व्यवसाय करणारे असे अनेक तात्या आपल्यासारख्यांना खाऊ घालत आहेत. आम्ही मात्र त्यांचे आर्थिक आणि शारीरिक भांडवल काढून आणण्याचाच कुटिल डाव खेळतो आहोत.
संपादकीय
संपादकीय

परवा सुसलाद, तालुका जत या गावी जाण्याचा योग आला. माझे व्याही रामचंद्र जतकर यांचे हे गाव, कर्नाटकाच्या सीमेवर, तसे ते मूळचे पंढरपूरचे परिचारक. पणजोबा दत्तक गेले आणि हे सुसलादचे जतकर झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणींचे लग्न वगैरे झाल्यावर, चार भावांचा शेतीत निभाव लागणार नाही, हे हेरून दोघे भाऊ पस्तीस वर्षांपूर्वी पुण्याला आले. बाकी दोघे भाऊ शेतीवर राहिले. पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी पुण्यात आले, नोकरी करून मुलाबाळांचे संसार व्यवस्थित लागल्यावर आणि सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी गावाकडे जाऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. मधल्या काळात चारही भाऊ वाटण्या करून बाजूला राहिले. मुळातला शेतकरी पिंड त्यांना स्वस्थ बसू देईना, म्हणून शेती करायला गावाकडे गेले. त्याला आता तीन वर्षे झाली. ते स्वतःच शेती करतात. आत्ता त्यांचं वय पासस्ट वर्षांचं. शेतात चांगलं घर बांधलंय. जुन्या सामाईक विहिरीचं थोडं पाणी उपलब्ध आहे, त्याच थोड्या पाण्याच्या आधाराने सात एकर शेती करत आहेत. एक मुलगा, दोन मुली सगळ्यांची लग्न झाली आहेत. अनेक दिवसांपासून मला गावाकडे येण्यासाठी आग्रह चालूच होता, त्यात त्यांचेकडे हुरडा आलेला. मलाही जायचे होतेच, गेलो एकदाचा. 

एके काळी मीही अत्यंत आवडीने आणि चांगल्या प्रकारची  शेती करायचो. निसर्गाशी तादात्म्य पावण्याची अनुभूती शेतकऱ्याला शेती सोडता सोडवत नाही. मलाही सोडवत नव्हती पण अत्यंत नाइलाजाने मला शेती सोडावी लागली. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने माझा शेतीव्यवसायिक म्हणून पराभव केला आणि तो पराभव स्वीकारून अत्यंत जड अंतःकरणाने मी शेती विकून टाकली. पण शेतीची ओढ अजूनही कायम आहे. गावाकडे गेल्यावर कोणातरी शेतकरी मित्राच्या शेताला जाऊन ती ओढ सांतवण्याचा प्रयत्न करत असतोच. असो, सुसलाद हे गाव महाराष्ट्राच्या टोकाला असल्यामुळे रस्ते काय दर्जाचे असतील, ते वेगळं सांगायला नको.

गावापासून शेती साधारण एक किलोमीटर, चालतच जावे लागते. एसटी ने सायंकाळी पाच वाजता गावात उतरलो. तात्या (माझे व्याही) घ्यायला आलेले होते. गिट्टी उघडी पडलेल्या रस्त्याने चालत शेतात गेलो. चहा पाणी झाल्यावर तात्यांनी शेतात वापरण्याचा ड्रेस अंगावर चढवला. ज्वारीच्या पिकावर पाखरांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या, त्या राखणे गरजेचे  होते. हातात गोफण घेऊन आणि माझी परवानगी घेऊन ते पाखरं हाकायला गेले. गंभीरपणे शेती करायला ते गावाकडे आल्याचे जाणवत होते. गेल्याबरोबर आमची हुरडा खायची सोय केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी सलग तीन वेळा हुरडा खाऊ घातल्यावरच त्यांना समाधान वाटलं. दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन वापस निघण्याच्या पहाटे साडेतीन वाजता बाहेर कुत्रे भुंकण्याचा आवाज आला म्हणून जागा झालो व उठून बाहेर आलो. घराच्या बाजूला असलेल्या शेतात दारं धरण्यासाठी तात्याच्या भावाच्या शेतात त्यांचा भागीन आला होता. थ्री फेज लाईट येण्याची ही वेळ, दहा अंश सें. ग्रे. तापमानात पहाटे साडेतीन वाजल्यापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत हा गडी  मका व हरभऱ्याच्या पिकाला पाणी देत उभा. मनात आल रात्री शेतीला वीजपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना  आणि वीज मंत्र्याला महिन्यातील किमान आठ दिवस रात्री  शेतात पाणी देण्यासाठी पाठवायला पाहिजे.

निघायच्या दिवशी सकाळीच एका माणसाला बोलावून तात्यांनी लेकीसाठी, जावयासाठी, नातींसाठी  गरम हुरडा भाजून बांधून द्यायची सोय केलेली. आमच्या बरोबर काय देऊ आणि काय नको, असं त्या दोघा नवरा-बायकोला झालेलं. बोरं, ढाळे, लिंबू, लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, लाल तिखट, नातीने फोन करून सांगितलंय हे निमित्त सांगून, काय देऊ आणि काय नको, असं त्यांना झालं होतं. पोटच्या पोरीबद्दल त्यांच्या मनात असलेला कोवळेपणा आणि त्यापायी चाललेली धावाधाव एका आईबापाच्या मनाची कालवाकालव बघून ते जे बांधून देतील ते नाही म्हणवेना. सगळं सामान घेतलं आणि आम्ही बस गाठायला बाहेर पडलो, अनेक प्रश्नांचे ओझे घेऊन.

आदल्या दिवशी बोलता बोलता तात्यांनी दोन-तीन लाख रुपये खर्च करून नवीन विहीर पाडणार असल्याबद्दलची भावी योजना सांगितली, नव्हे तसा निर्धारच व्यक्त केला. मी मात्र त्यांची योजना ऐकून मनातून हादरलो. कारण कर्ज काढून ही योजना राबवणार आहेत. सामायिक विहिरीतील पाणी पुरेसं नाही, सातच्या सात एकर रान पाण्याखाली आणण्याची ओढ त्यांना गप्प बसू देणारी नाही, हे मी ताडलं. सतत तोटा येणार आहे हे कळूनसुद्धा शेतीसारखा आतबट्ट्याचा व्यवसाय करणारे असे अनेक तात्या आपल्यासारख्यांना खाऊ घालत आहेत. आम्ही मात्र त्यांचे आर्थिक आणि शारीरिक भांडवल काढून आणण्याचाच कुटिल डाव खेळतो आहोत. काय जादू असेल त्या काळ्या आईची कुणास ठाऊक? पुनर्निर्माणाचा आनंद कि आणखी काही, मरणाकडे जाणार आहोत, हे माहिती असूनसुद्धा दिव्यावर झेप घेणारा पतंग आणि शेतकरी यातला फरक याची तुलना करत करत आणि तात्यांच्या भावी योजनेला शुभेच्छा देत  सुसलादहून पुण्याकडे निघालो, तो जुन्याच प्रश्नांची उजळणी करतच.

देश स्वतंत्र झाल्याला सत्तर वर्षं व्हायला आली. नियोजनाचा बोलबाला करत, कल्याणकारी समाजरचनेचे ढोल बडवीत आम्ही ग्रामीण भारताची परवड केली आहे. तिचे भग्न अवशेष खेडेगावात पाऊल टाकताच दिसायला लागतात. ना पाण्याची सोय, ना विजेची उपलब्धता, ना रस्त्याची उभारणी, बाकीच्या शेतीसाठी  लागणाऱ्या संरचेनेचा, सुधारणेचा तर विचारच करायला नको. शेती व्यवसायात बाहेरून भांडवल येऊच नये अशा प्रकारचे सारे बंदोबस्त आपल्या राज्यकर्त्यांनी आणि नियोजनकर्त्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे  कर्तबगार उद्योजक इच्छा असूनही शेतीत येऊ शकत नाहीत. संरचेनेचा अभाव, तंत्रज्ञान वापराला बंधन आणि त्यात कहर म्हणजे शेतमालाचे भाव सातत्याने पाडण्याचे सरकारचे धोरण. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भारत उध्वस्त झालाय, हे पाहता क्षणीच जाणवतं. इतकी विपरीत परिस्थिती असूनही शेतीचं उत्पादन टिकून आहे, ते  तात्यासारखी शेतीची आवड असणारे असंख्य संवेदनशील आणि कष्टाळू शेतकरी आणि रात्ररात्र उभे राहून पाणी देणारे  शेतकऱ्यांचे सहउत्पादक आहेत म्हणून.  दिव्यावर पतंगासारख्या उड्या मारणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत सरकार आणि आपल्यासारखा समाज किती दिवस पाहणार आहे, कोण जाणे?   अनंत देशपांडे : ९४०३५४१८४१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com