शेती परिवाराची कामे हवी शेतकऱ्यांशी सुसंगत

शेती परिवाराची कामे शेतकऱ्यांच्या कामाशी सुसंगत चालवण्यासाठी शासनाने केलेले कायदे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत. शासनाला या कायद्याची कडक अंमलबजावणी करून ती शेतकऱ्यांच्या कामाशी सुसंगत करता येतात; परंतु तसे प्रयत्नच होत नाहीत.
संपादकीय
संपादकीय
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रगत देशांनी उद्योगधंदे वाढवून देशाची आर्थिक प्रगती केली व रोजगारपण वाढवले. तिथल्या देशात फक्त लोकसंख्येच्या ५ टक्के लोक शेती करतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर याच उद्देशाने नेहरूंच्या मंत्रिमंडळापासून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळापर्यंत उद्योगधंद्यांच्या वाढीलाच महत्त्व दिले आहे. यामुळे देशाची आर्थिक प्रगती झाली; पण शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या कमी करता आली नाही. आजही आपल्या देशाच्या १२५ कोटी लोकसंख्येच्या ५५ ते ६० टक्के लोकांचा चरितार्थ व रोजगार शेतीच्या उत्पन्नावर चालतो. आज शेतकऱ्यांची तरुण पिढी शेतीतल्या शारीरिक कामापासून दूर गेली आहे व स्वयंचलित यंत्राच्या वापरामुळे शेतीत शारीरिक श्रमाची गरज उरली नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. या लोकसंख्येला शेतीवर टिकवून ठेवण्याच्या काही योजना आखल्या पाहिजेत; पण यावर अजून चर्चा झाली नाही. यामुळे सध्या शेतकरी संघटनांचा शासनाबरोबर संघर्ष चालू आहे. त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा शेतकऱ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. सर्व राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अडचणींचा सत्ता मिळवण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठी उपयोग करतात. त्यांची अडचणीतून सुटका करून फायदेशीर शेतीसाठी प्रयत्न होताना दिसतच नाहीत. शेतकऱ्यांचे शेतीतून बाहेर पडण्याचे सर्व मार्गदेखील बंद करण्यात येत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला काही योजना आखून शेतीवर टिकवून ठेवण्याचा कोणी विचार केला नाही. डॉ. एम. एस. स्वामिनाथन एका कार्यक्रमात म्हणाले, ‘‘शेती हा जीवन देणारा व्यवसाय आहे. मात्र जीवन देणारा व्यवसाय जेव्हा जीव घेणारा बनतो तेव्हा समजावे वास्तवात काहीतरी चुकीचे घडत आहे.’’ आपल्या देशातील शास्त्रज्ञ व शेती प्रश्‍नाचे अभ्यासक म्हणतात, ‘‘येथील शेती जोखमीची व खर्चिक बनली आहे. ती एकटा शेतकरी फायद्याची करू शकणार नाही. ती सामुदायिकपणेच फायद्याची केली पाहिजे.’’ आपल्या देशाची शेती पूर्वीपासून सामुदायिकपणेच चालत असे. शेतकरी आणि बारा बलुतेदार मिळून सरकारच्या मदतीशिवाय सामुदायिकपणे शेती करीत होते. आधुनिक शेतीत बलुतेदारेची पद्धत बंद पडली व त्या जागी शेतीचा परिवार आला. शेतकऱ्याचा शेतमालाच्या उत्पादन खर्चाचा ज्या ज्या घटकांशी आर्थिक व्यवहार चालतो ते सर्व घटक म्हणजे आधुनिक शेतीचा परिवार. या परिवाराच्या सहकार्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीच करता येत नाही. हा परिवार फार मोठा आहे. त्यातील नित्य आर्थिक व्यवहार चालणार मुख्य घटक शेतमजूर, शेतीला सर्व प्रकारच्या निविष्ठा पुरवणारे उद्योगपती, दोरखंड, कुदळ खोऱ्यापासून ट्रॅक्‍टरपर्यंतची सर्व औजारे पुरवणारे कारखानदार, पूर्वमशागतीपासून पिकाची विक्री करेपर्यंत भाड्याने लावलेली औजारे व निरनिराळ्या प्रकारची मजुरीने काम करणारे सर्व मजूर, शेतकऱ्यांना पीककर्ज देणाऱ्या बॅंका, शेतकऱ्यांनी काढलेले साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था व कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यातील व्यापारी, आडते, दलाल असा हा मोठा शेतीचा परिवार आहे. यांची कामे शेतकऱ्यासाठीच चालू असतात. व या कामाची मजुरी शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल बाजारात विकून देत असतात. शेतकरी व शेतीचा परिवार यांनी सामुदायिकपणे चालवण्याचा आधुनिक शेती हा व्यवसाय आहे. परिवाराची शेतकऱ्यांसाठी चाललेली कामे शेतकऱ्याच्या कामाशी सुसंगत व समन्वयाने चालली तर शेतकऱ्याला शेतीत तोटा येण्याचे काहीच कारण नाही. पण शेतीचा परिवार व शेतकरी याची कामे एकमेकांच्या कामाशी सुसंगत व समन्वयाने चालत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांना शेतीत तोटा होतो. परिवाराची कामे शेतकऱ्यांच्या कामाशी सुसंगत चालवण्यासाठी शासनाने केलेले कायदे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत. शासनाला या कायद्याची कडक अंमलबजावणी करून ती शेतकऱ्यांच्या कामाशी सुसंगत व समन्वयाने चालवता येतात; आणि याद्वारे शेतकऱ्यांना स्वतःची शेती फायद्याची करण्याचा मार्गदेखील मोकळा करून देता येतो. परंतु १९५० सालापासून शासनाने अशी कडक कारवाई केली नाही व आपण शेतकऱ्यांनीपण नियमाप्रमाणे परिवाराकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशी शासनाकडे तक्रार केली नाही. यामुळे परिवाराकडून शेतीची कामे करून घेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतमालाचा उत्पादन खर्च वाढतो. व शेतकऱ्याचे उत्पन्न कमी होते. कधी कधी परिवाराकडून कामे करून घेण्यास शेतकऱ्यांचे सर्वच उत्पन्न संपते व शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. आजही याच पद्धतीने शेतकऱ्यांना शेतीची कामे करून घ्यावी लागतात. सर्व क्षेत्रातल्या शेतकऱ्यांचे हितचिंतकांनी या कामाजवळ जाऊन याची सत्यता पडताळून पाहावी. शेतीमध्ये स्वयंचलित यंत्राच्या वाढत्या वापराने फक्त शेतीच्याच उत्पन्नावर चरितार्थ व रोजगार अवलंबून असलेले शेतकरीच अडचणीत सापडले आहेत. सर्व जगात अशा शेतकऱ्यांची संख्या आपल्या देशात जास्त आहे. याचा विचार करूनच शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवावे लागतील. नारायण देशपांडे : ९०९६१४०८०१ (लेखक शेती परिवार कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com