अतीव संघर्षातून घडलेली प्रगतशील शेती

मिश्र पीक, आंतरपीक वा बहुविध पीकपद्धती हे नानांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे.
मिश्र पीक, आंतरपीक वा बहुविध पीकपद्धती हे नानांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे.

अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी अॅवॉर्ड : नाना पाटील, पिंप्री खुर्द, जि. जळगाव -------------------------------------------------------------------- जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्‍यातील पिंप्री खुर्द येथे शेती असलेले नाना भाऊसिंग पाटील यांचा शेतीतील प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. कष्टमय परिस्थितीत शिक्षण, नोकरी असे टप्पे पार करीत सेंद्रिय, कमी खर्चिक शेतीपद्धतीवर भर देत शून्यातून त्यानी आपले विश्व उभे केले आहे. पिंप्री खुर्द (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथे शेती असलेल्या नाना भाऊसिंग पाटील यांचा दोन बंधू, बहीण असा परिवार. घरात ते सर्वांत धाकटे. अवघे दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईनेच त्यांचा सांभाळ केला. आईच्या वाट्याला केवळ ७१ गुंठे जमीन आलेली. अत्यंत प्रतिकूल स्थितीत कुटुंबाची गुजराण सुरू होती. नानाने शिकून- सवरून मोठे व्हावे, इतरांना मदत करावी असे आईला नेहमी वाटायचे. घरच्या परिस्थितीचे भान बाळगत नानांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इथे नानांच्या वाट्याला पुन्हा दुर्दैव आले. आईचेही कुठल्याशा कारणाने निधन झाल्याने कृपाछत्रच हरपले.

आई- वडिलांना पोरके झालेले नाना खचून निश्चित गेले; पण हिंमत हरले नाहीत. त्यांनी जिद्दीने चाळीसगाव येथे व्यावसायिक अभ्यासक्रम ‘आयटीआय’ शाखेचे शिक्षण घेतले. बहीण व दोन भावांची मदत त्यांना होती. सकाळी शिक्षण, अभ्यास, मग रात्री एका डेअरीत काम करायचे, असा दिनक्रम सुरू होता. कारण घरात पैसा  येणंही गरजेचं होतं. अनेकदा डेअरीतच झोपावं लागे. दोन वर्षे ‘आयटीआय’चे शिक्षण घेताना प्रचंड मेहनत घेतली. शिक्षण  घेतल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी पुणे गाठले.

नोकरीचा अनुभवही खरे तर शेती करण्याची प्रबळ इच्छा होती; पण थोड्या क्षेत्रात संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ चालवणे सोपे नव्हते. मग पुण्यात चार वर्षे खासगी कंपनीत नोकरी केली. नोकरीच्या सुरवातीच्या काळात शिवाजीनगर बस स्टॅंडच्या परिसरातच ते रात्री झोपायचे. निवासाची सोय परवडेल असा पगारही नव्हता.

असा संघर्ष करीतच नाशिकमध्ये आले. घरगुती उपकरणे निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रात नोकरी पत्करली. नोकरी करीत असतानाच लग्न झाले. काही वर्षे घरगुती उपकरणे दुरुस्तीचा व्यवसायही केला.

शेतीची ऊर्मी दाटून आली नाशिकमध्ये स्थिरस्थावर होत असतानाच उपकरणे दुरुस्तीच्या कामानिमित्त ग्राहकाकडे गेले असताना हातात ‘अॅग्रोवन’चा अंक पडला. ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. ‘अॅग्रोवन’ वाचून आपणही प्रगतिशील शेतकरी होऊ शकतो, असे नानांना वाटले. त्याचवेळी आपल्या आईचे स्वप्न साकार करण्याची ऊर्मीही जागृत झाली. प्रगतिशील शेतीकडे वाटचाल इथपर्यंतच्या वाटचालीदरम्यान घरी शेतीच्या वाटण्या झाल्या होत्या. नाना यांच्या वाट्याला गावी फक्त २० गुंठे जमीन आली; पण शेतीतच भरीव काही करावे असा चंगच बांधला. नोकरी- व्यवसायातून आजवर जी बचत केली होती, त्यातून शेतीच खरेदी करावी असे पाटील दांपत्याने ठरवले. हौसमौज, चैन या बाबींपेक्षा तेच महत्त्वाचे वाटले. सन २०१० व २०१२ मध्ये असे दोन टप्प्यांमध्ये अनेक समस्यांना तोंड देत एकूण साडेचार एकर शेती विकत घेतली.

शेतीतील दोन एकर बागायती असून त्यात विहीर आहे. उर्वरित अडीच एकर कोरडवाहू आहे. कपाशी, मका, तूर, ज्वारी, बाजरी, हरभरा, भुईमूग, कडधान्ये आदी पिके ते घेतात. नाशिक येथे जागा घेऊन हक्काचे घरही बांधले आहे. नाशिक ते धुळे असा सतत प्रवास करूनही नाना कधीही थकत नाहीत.    नानांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, कृषी दैनिके, प्रकाशने यांचे नियमित वाचन.
  • बहुतांश शेती सेंद्रिय पद्धतीने. प्रत्येक गोष्ट समजून, अभ्यासपूर्ण करण्याचे सूत्र जपले.  
  • मनमिळाऊ, धडपडा स्वभाव. प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञ, कृषी विभागातील अधिकारी यांच्या कायम संपर्कात राहून नवे प्रयोग करतात.
  • एकात्मिक कीड नियंत्रण व अन्नद्रव्य व्यवस्थापनात तरबेज  
  • माती परीक्षणानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर
  • उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर वापर, बीजप्रक्रिया व पीक फेरपालट
  • उत्पादनवाढीसाठी मुख्य पिकात कडधान्यांसारखी आंतरपिके
  • गांडूळ खत, कंपोस्ट खत, दशपर्णी अर्क, जीवामृत, कडुनिंब अर्काचा वापर.
  • मका, अंबाडी, चवळी अशी सापळा पिके; तर चिकट व कामगंध सापळ्यांचा वापर
  • काही रासायनिक खतांच्या घरच्याघरी ग्रेड तयार करून वापर
  • जलसंधारणासाठी शेतात बांधबंदिस्ती, जिरायती क्षेत्रात सरी- वरंबा पद्धतीने  
  • पीक संरक्षणासाठी पीक विमा योजनेत सहभागी
  • दोन एकर क्षारपड जमिनीत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातून नापिक जमीन सुपीक करून उत्पादन चांगले मिळवले.
  • जिरायती क्षेत्रात सघन पद्धतीने तीन बाय एक फूट पद्धतीने कापूस लागवड.   
  • सेंद्रिय पद्धतीवर भर देत उत्पादन घेतल्याने नानांकडील शेतमालाची थेट ग्राहकांना हातोहात विक्री होते. दरही अधिकचा पदरात पडतो. अनेक ग्राहक वर्षभर अाधी त्यांच्याकडे बाजरी, ज्वारी, कडधान्यांची मागणी नोंदवून ठेवतात.  
  • उत्पादन (एकरी व प्रातिनिधिक) कपाशी - १५ क्विंटल, मका - २८ क्विंटल, ज्वारी - १२ क्विंटल, बाजरी - उन्हाळी - १५ क्विंटल, हरभरा - सेंद्रिय - ०७ क्विंटल, कापूस जिरायती - ११ क्विंटल     शेतकऱ्यांचे झाले मार्गदर्शक स्वतःपुरती शेती मर्यादित न ठेवता नाना अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, प्रेरणा देतात. सेंद्रिय शेतीच्या अभ्यासासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परिषदा, प्रदर्शने, दौरे यातही नाना हिरिरीने सहभागी होतात. अलीकडेच ते नैनिताल येथे जाऊन आले.

    अन्नदाता शेतकरी गट स्थापन करून गावातील शेतकऱ्यांना एकत्र आणले आहे. सेंद्रिय शेती, एकात्मिक शेती, पीक संरक्षण, कृषी योजना आदींबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतात. महात्मा फुले कृषी विद्यापीठातही त्यांना मार्गदर्शनपर अनुभव शेतकऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली आहे.

    पुरस्कार वितरण कार्यक्रम

  • तारीख ः २९ डिसेंबर (शुक्रवार)
  • स्थळ ः टिळक स्मारक सभागृह, पुणे.
  • वेळ ः सायंकाळी चार ते सात.
  • कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com