प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अन्‌ प्रसारही

रवींद्र देवरवाडे यांनी १० गुंठे क्षेत्रातील शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे.
रवींद्र देवरवाडे यांनी १० गुंठे क्षेत्रातील शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे.

ॲग्रोवन मराठडवाड्याचा स्मार्ट शेतकरी ॲवॉर्ड  : रवींद्र भानुदास देवरवाडे, देवळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड -------------------------------------------------------------------------------------- सततच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीची वाट बिकट होत आहे. बिकट वाटेला प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सुकर बनवणारे, आपल्यासोबतच गावातील अन्य शेतकऱ्यांसाही धडपडणारे शेतकरी नेहमीच कौतुकाला पात्र ठरतात. असेच एक शेतकरी आहेत बीड जिल्ह्यातील देवळा (ता. अंबाजोगाई) येथील रवींद्र भानुदास देवरवाडे. त्यांनी शेतीमध्ये नव्या तंत्राचा सातत्यपूर्ण वापर करत शेतीला ऊर्जितावस्था आणली. शेडनेटमधील शेती, शेततळ्यातील मत्सपालन, संपूर्ण शेतीसाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब अशा प्रयोगातून उत्पादन व उत्पन्नामध्ये शाश्वतता मिळवली आहे. केवळ आपण प्रयोग करून, फायदे मिळवून न थांबता सामाजिक कामातही ते हिरीरिने भाग घेतात.

     समाजकार्यातील पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू) मिळाल्यानंतर २००२ मध्ये रवींद्र शेतीमध्ये उतरले. त्या वेळी एकत्रित २८ एकर शेती करण्यासाठी वडिल व बंधूना मदत करायचे. पुढे २०१२-१३ मध्ये त्यांचे चारही बंधू विभक्त झाले. आता रवींद्र यांच्याकडे आईवडिलांसह पंधरा एकर शेती असून, नातेवाइकांची पाच एकर शेतीही सांभाळतात.    पाणी भरपूर म्हणून ऊस पिकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास कमी पाण्याच्या हंगामी भाजीपाल्यापर्यंत पोचला. त्यासाठी २००९ -१० मध्ये अंबाजोगाई येथील कृषी विज्ञान केंद्रांची मोठी मदत झाली. ऊस पीक सोडून भाजीपाला, टोमॅटो, टरबूज, बटाटा आणि ज्वारी, हरभरा यासारखी पिके ते घेऊ लागले. मांजरा नदीच्या काठावर असूनही ठिबक व तुषार सिंचन वापरत पाण्याचा काटेकोर वापर ते करतात. ‘कशाला खर्च करायचा,’ असे सुरवातीला म्हणणारे लोकही पुढे पाणी कमी होत गेले तसे त्यांच्यामागे येत गेले. पाणीबचतीसाठी सेंद्रिय पाचट आच्छादनाचा प्रयोगही गावात होऊ लागला. 

 २०१३-१४ मध्ये दहा गुंठ्यांत शेडनेट उभारले. पहिल्यांदा घेतलेल्या टोमॅटोच्या पिकांमध्ये उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला. तरीही न खचता ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. त्यातून दुष्काळी स्थितीतही पुढील काही वर्षे अनुक्रमे १३, ९ व ६ टन असे उत्पादन घेतले. ते सेंद्रिय शेती करणाऱ्या शेडनेटमधील ४० शेतकऱ्यांच्या गटात जोडले गेले. एकूण ८० शेडनेटधारक शेतकऱ्यांमधून उत्कृष्ट उत्पादक म्हणून त्यांचा पहिला क्रमांक आला. 

 गेल्या १० वर्षांपासून सोयाबीन बीजोत्पादनामध्येही भाग घेत आहे. अन्य शेतकऱ्यांनाही बीजोत्पादनासाठी प्रोत्साहन देतात. या वर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाचे क्षेत्र १४ एकरांपर्यंत वाढविले असून, दहा गुंठ्यांत शेडनेटमधील भाजीपाला व दोन एकरमध्ये सेंद्रिय पद्धतीने हरभरा घेतला आहे. अडीच एकरांत ठिबक सिंचन, उर्वरीत सर्व शेतीमध्ये तुषार सिंचन तंत्राचा वापर करतात.

 शेती व्यवस्थापनामध्ये उताराला आडवी पेरणी, जैविक खतांची बीज प्रक्रिया, पीक संरक्षणासाठी ट्रायकोडर्मासह एकात्मिक पद्धतीचा अवलंब केला जातो. त्याच प्रमाणे लोखंडी वखार, कुळव, कोळपे, नांगर अशी खरेदी करत हळूहळू यांत्रिकीकरणाकडे वाटचाल चालू आहे.

 गेल्या १० वर्षांपासून उसाचे पाचट कुट्टी करून शेतातच कुजवतात. शेतातील पिकांचे अवशेष शेतातच ढीग करून चांगले कुजल्यानंतर शेतात वापरतात. पाचटाच्या आच्छादनामुळे पाण्याची बचत होते, तसेच  शेतातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत आहे.   

 पूरक व्यवसाय

  •  दोन गायी आणि दोन म्हशी आहेत. त्यांचे दूध संकलन केंद्रात दिले जाते. 
  •  २०१२ पासून बायोगॅस उभारला असून, त्यातून इंधनाची गरज भागते. स्लरीचा वापर शेतीमध्ये केला जातो. 
  •  अवर्षणाची स्थिती पाहता पाण्याची गरज भागविण्यासाठी २०१३-१४ मध्ये रवींद्र देवरवाडे यांनी शेततळे घेतले. ४४ बाय ४४ आकाराच्या या शेततळ्यात यंदा ऑक्‍टोबरमध्ये मत्स्य बीज सोडले आहे. या माशांची उत्तम वाढ सुरू आहे. आता मांजरा नदीकाठी कायम पाणी असलेल्या जवळपास अडीच एकर शेतीत छोटी-छोटी तळी बनवून, त्यामध्ये मत्स्यपालन करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
  • सामाजिक कार्य व सन्मान

  • समाजकार्यात पदव्युत्तर पदवी मिळवलेली असल्याने समाजकार्यामध्ये रवींद्र यांचे मन शेतीइतकेच रमते. 
  • गावात त्यांनी २५ जणांच्या श्रमकरी गटाची स्थापना केली आहे. या गटाच्या पुढाकारातून देवळा गावात हगणदारीमुक्‍तीची कामे झाली. गावशिवारातील नदी नाला खोलीकरण रुंदीकरण, सरळीकरण, बांधबंदिस्ती या कामांसोबतच तंटामुक्तीसाठी कामे करण्यात आली. 
  •  दोन वर्षांपासून पाणी फाउंडेशनसोबत ते काम करतात. 
  •  गावातील पडणाऱ्या पावसाचे पाणी पर्जन्यमापन यंत्राच्या माध्यमातून मोजून, त्यानुसार नियोजनाचे कामही     देवरवाडे हिरीरिने करतात. नॅचरल ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीचे ते सदस्य आहेत. 
  • अंबाजोगाईच्या मानवलोक समाज महाविद्यालयाने प्रगतिशील शेतकरी म्हणून गौरव केला. तसेच  अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने नानाजी देशमुख कृषी सन्मान पुरस्कार मिळाला आहे.
  •  आयसीएआर च्या बहूपिक पद्धतीवरील परिषदेत त्यांनी सहभाग नोंदविला आहे.
  • पुरस्कार वितरण कार्यक्रम :
  • तारीख :  २९ डिसेंबर (शुक्रवार)
  • स्थळ :   टिळक स्मारक सभागृह, पुणे.
  • वेळ :  सायंकाळी चार ते सात.
  • कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com