नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करतो, तोच यशस्वी होतो. वरखेडा (जि. नाशिक) येथील उफाडे बंधूंची कथा अशीच आहे. कुटुंबाकडे अवघे दोन एकर क्षेत्र. मागील पाच वर्षांत एका गाईपासून सुरवात करून सोळा गाईंपर्यंत उफाडे बंधूंनी मजल मारली. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू केली आहे.
वरखेडा (ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे गाव द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध. लखमापूर फाट्याहून वरखेडा गावाकडे जाताना जनता विद्यालयाजवळ प्रल्हाद पुंजाजी उफाडे यांची शेती आहे. टोमॅटो, द्राक्ष, कोबी लागवड करणारे प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख. मागील काही वर्षांत बदलत्या वातावरणामुळे ही पिके अडचणीत आली. यातच मणक्याची शस्त्रक्रिया करण्याची वेळ त्यांच्यावर आली. प्रल्हादराव जिद्दीने शेती करीत असतानाच शिकत असलेल्या जालिंदर, वैभव, चेतन या मुलांनी हळूहळू शेतीची सर्व जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्यास सुरवात केली. भाजीपाला शेती परवडत नसल्याचे समोर आल्यानंतर या तिघांनी दुग्ध व्यवसायाकडे वळायचे ठरवले. जालिंदरचे वय ३२, वैभवचे वय २६, तर चेतनचे वय २२ आहे. जालिंदर आणि वैभव गावालगत असलेल्या एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. चेतन मात्र पूर्णवेळ दुग्ध व्यवसायात आहेत. जालिंदर आणि वैभव हे नोकरी संभाळून चेतन यांना पशुपालनात मदत करतात. तिघांनीही व्यवसायातील कामाचे विभाग वाटून घेतले आहेत. तिघांचा समन्वय आणि व्यवस्थापनात वडील प्रल्हाद व आई नंदाबाई, जालिंदर यांची पत्नी वर्षा यांचा सहभाग यामुळे उफाडे कुटुंबाचा ‘ईश्वरी डेअरी फार्म’ दमदार वाटचाल करीत आहे. शेतीतील अनुभवाबाबत जालिंदर म्हणाले, की वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजीपाला पिके घेत होतो. कधी चांगले उत्पन्न यायचे तर कधी मोठा तोटा व्हायचा. स्थिर उत्पन्न कधीच नसायचे. २०१० मध्ये लागवड केलेल्या टोमॅटो क्रेटला ११०० पर्यंत दर मिळाला. त्या वेळी चांगले उत्पन्न मिळाले होते. त्याच्या दुसऱ्या वर्षी दर इतका कमी मिळाला की खर्च तर गेलाच; वरून अडीच लाखांचा तोटा झाला. हा अनुभव आमच्यासाठी ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. आता उत्पन्न कमी मिळाले तरी चालेल, पण शाश्वत उत्पन्न कसे मिळेल याचा आम्ही शोध घेऊ लागलो. दुग्ध व्यवसायाचा पर्याय समोर आला. मात्र हा यशस्वी होणारा व्यवसाय नाही. गोठ्याकडे वळू नका, असे अनेकांनी आम्हाला सांगून हे न करण्याचे सल्ले दिले. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो.
दुग्ध व्यवसायाला सुरवात दुग्ध व्यवसायाच्या वाटचालीबाबत चेतन उफाडे म्हणाले, की,वर्ष २०१२ पासून आम्ही दुग्ध व्यवसायाकडे वळलो. सायखेडा बाजारातून पहिल्यांदा एका मध्यस्थाच्या मदतीने होल्स्टिन फ्रिजियन गाय खरेदी केली. दुसऱ्या वेताची समजून गाय खरेदी केली, मात्र प्रत्यक्षात ती पाचव्या वेताची गाय होती. हे उशिराने कळले. फसवणूक झाल्यानंतर आमची समज वाढली. दुसऱ्या वर्षी लोणी (जि. नगर) येथील बाजारातून चार होल्स्टिन फ्रिजियन गाई घेतल्या. २०१५ मध्ये आमच्याकडे भीषण पाणीटंचाई होती. या काळात चांगल्या १० कालवडी विकाव्या लागल्या. आता पाच वर्षांनंतर गोठ्यात १६ दुधाळ गाई आणि पाच कालवडी आहेत. या सर्व गाई घरच्या वेताच्या आहेत. आम्ही मुक्त संचार गोठ्याचा अवलंब केला आहे. दोन्ही वेळेचे मिळून २२० लिटर दूध खासगी डेअरीला देतो. डेअरीची गाडी रोज गोठ्यावर येऊन दूध घेऊन जाते. त्यामुळे दूध वाहतुकीची अडचण नाही. शेण, गोमूत्रालाही मागणी मुक्त संचार गोठ्यात गाईंचे शेण चार महिन्यांपर्यंत तसेच राहू दिले जाते. उन्हामुळे ते चांगले वाळते. या शेणामध्ये गोमूत्रदेखील मिसळत असल्याने त्याची गुणवत्ता वाढते. परिसरातील शेतकऱ्यांकडून या खताला चांगली मागणी आहे. दरवर्षी साधारण ३६ ट्रॉली शेणखत विकले जाते. प्रतिट्रॉली ४००० रुपये दराने शेणखताची विक्री होते. ठराविक कालावधीत शेतकऱ्यांकडून स्लरीसाठी गोमूत्राची मागणी असते. गोमूत्र विक्रीतून वर्षाला ५० हजार रुपये मिळतात. ओल्या शेणखताच्या विक्रीतूनही वर्षाला २० हजारापर्यंत उत्पन्न मिळते.
मुक्त संचार गोठ्यातील नियोजन
महत्त्वाचे मुद्दे
दूध प्रक्रियेच्या दिशेने
संपर्क ः चेतन उफाडे : ९८२२३२९२९८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.