सुवर्णाताईंनी तयार केला अनारसे, पुडाची वडीचा ब्रॅंड

वडणगे (जि.कोल्हापूर) : प्रक्रिया उद्योगात सुवर्णाताईंनी महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. (छायाचित्रे ः  बी.डी.चेचर)
वडणगे (जि.कोल्हापूर) : प्रक्रिया उद्योगात सुवर्णाताईंनी महिलांना रोजगार मिळवून दिला आहे. (छायाचित्रे ः बी.डी.चेचर)

वडणगे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथील श्रीमती सुवर्णा सर्जेराव पाटील यांनी अनारसे आणि पुडाची वडी निर्मितीतून ग्रामीण महिलांपुढे एक वेगळा आदर्श तयार केला आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर सुवर्णाताईंनी प्रक्रिया उद्योगात ‘पाटील बंधू` या ब्रॅंडचा ठसा उमटविला आहे. घरची केवळ दोन एकर शेती, ती पण पुराच्या पाण्याखाली जायची. पती सर्जेराव पाटील हे खासगी प्रेसमध्ये कामाला. जेमतेम संसार चालायचा. पण सुवर्णाताईंनी घरगुती स्वरूपात खाद्यप्रक्रिया व्यवसाय करायचा ठरविला. यातून होणारी आर्थिक मिळकत कुटुंबाला उपयोगी ठरू शकेल या विचारातून त्यांनी अनारसे तयार करण्याचा विचार पतीला बोलून दाखविला. त्यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली.

सुवर्णाताईंच्या पाहुण्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने साहजिकच त्यांना हे काम आवडायचे नाही. पण जिद्दीच्या सुवर्णाताईंनी पतीच्या सहकार्याने अनारसे तयार करण्याचे काम सुरूच ठेवले. सुवर्णाताईंनी १९९८ च्या सुमारास प्रतिदिन दोन किलो अनारसे तयार करून विक्री सुरू केली. सुरवातीला बाजारपेठ मिळविणे हे मोठे आव्हान होते. कोल्हापूर शहर जवळच असल्याने अनेक नामवंत बेकरी व्यावसायिक, मिठाई दुकानात जाऊन आमचे पदार्थ विक्रीस ठेवा, मागणी आली तर आम्ही बनवून देतो, असे सांगत त्यांनी अनारसे निर्मिती आणि विक्रीस सुरवात केली. अनारसे देण्यासाठी त्या स्वत: दुकानात जात असत. सुरवातीला दिवाळीच्या दरम्यान अनारसे तयार केले जायचे. पण इतर दिवशीही अनारश्यांना मागणी असल्याचे लक्षात येताच सुवर्णाताईंनी हा व्यवसाय वर्षभर सुरू करण्याचा विचार केला आणि तो प्रत्यक्षात उतरवला. पतीच्या साहाय्याने त्यांनी वर्षभर अनारसे तयार करण्यास सुरवात केली. जशी मागणी वाढू लागली, तसा त्यांचा हुरुप वाढला. चांगल्या दर्जामुळे लग्नसराईमध्येही अनारश्यांना मागणी येऊ लागली. वडणगेसारख्या ग्रामीण भागातून दररोज पन्नास किलो अनारसे कोल्हापूर बाजारपेठेत जाऊ लागले. ही मागणी सुवर्णाताईंनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पेलली. अनारसे निर्मितीमध्ये जम बसला असतानाच सुवर्णाताईंच्या पतीचे निधन झाले. हा उद्योग चालविण्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. पतीच्या मृत्यूनंतर मुलाला नोकरी लावावी आणि हा व्यवसाय बंद करावा असे सल्ले नातेवाइकांनी दिले. पण दूरदृष्टी असणाऱ्या सुवर्णताईंनी नेटाने अनारसे बनविण्याचे काम सुरूच ठेवले. दर्जेदार अनारशे निर्मिती अनारसे निर्मितीमध्ये सुवर्णाताईंचा हातखंडा आहे. त्यांनी सुरवातीपासून उत्पादनाचा दर्जा काटेकोर ठेवून ग्राहक मिळविले. वडणगे हे गाव गुळाचे आगर. या परिसरातील गुऱ्हाळांमधूनच एकसारख्या दर्जाचा सेंद्रिय गूळ एकाच वेळी खरेदी केला जातो. गूळ वाळवून वर्षभर त्याचा वापर केला जातो. अनारश्यासाठी चांगल्या दर्जाचा जाडा तांदूळच खरेदी केला जातो. अशीच चिकित्सा अन्य पदार्थांच्या निवडीबाबतही होते. यामुळे सुवर्णाताईंना अनारश्याची गुणवत्ता सांभाळणे शक्य झाले आहे. यांत्रिकीकरणावर भर अनारसे निर्मिती करताना सुरवातीला सुवर्णाताईंना सगळी कामे हाताने करायला लागायची. आता त्यांचा पदवीधर मुलगा सुशांत त्यांच्या मदतीला आहे. दोघांनी मिळून या व्यवसायात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला. पीठ मळणे, खोबरे बारीक करणे, गूळ फोडणे, आदीसाठी स्वतंत्र यंत्रे आणली आहेत. यामुळे बरेचसे काम सोपे झाले. सध्या सुवर्णाताईंकडे दररोज तीन ते चार महिला काम करतात. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत पदार्थ तयार केले जातात. दुसऱ्या दिवशी ते मागणीनुसार पाठविले जातात. अनारसे आणि पुडाच्या वडीची विक्री प्रति किलोस २०० ते ३०० रुपयांच्या दरम्यान होते. दररोज सरासरी चाळीस किलो अनारसे आणि १०० किलो पुडाच्या वडीची विक्री होते. एका तासात पाच किलोपर्यंत वडी तयार होते. खर्च वजा जाता तीस टक्क्‍यांपर्यंत नफा राहात असल्याचे सुवर्णाताई सांगतात. अडचणी आल्या...पण माघार नाही अनारसे निर्मिती आणि पुडाची वडी निर्मिती करताना लोक काय म्हणतील? याबाबत सुवर्णाताईंच्या मनात नेहमीच धाकधूक होती. याबाबत एक मजेशीर आठवण त्या सांगतात. पहिली पाच ते सात वर्षे अनारसे निर्मिती आणि विक्रीची गोष्ट माहेरच्या लोकांपासून लपवून ठेवली. उगीच विरोध नको म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली. ज्यावेळी माहेरचे लोक येत त्या दिवशी अनारसे निर्मितीचे काम बंद ठेवले जाई. इतका कटाक्ष त्यांनी ठेवला. पण ज्यावेळी अनारसे निर्मितीचा ब्रॅंड तयार झाला, त्यावेळी मात्र सगळ्यांनीच त्यांचे कौतुक केले. आता सर्व कुटुंबीय अनारसे निर्मिती उद्योगाच्या यशस्वीतेबद्दल समाधान व्यक्त करतात. नातेवाइकांना माझ्या प्रक्रिया उद्योगाचा अभिमान असल्याचे त्या सांगतात. हे जिद्दीनेच घडल्याचा सार्थ अभिमान त्यांना आहे. अनारसे, पुडाची वडी याचबरोबरीने करंजी, तिखट पुऱ्या, चकली आदी पदार्थही मागणी असेल त्यावेळी सुवर्णाताई तयार करतात. पण खरी ओळख ही अनारसे व वड्यांचीच आहे. ‘पाटील बंधू` या ब्रॅंडने पदार्थाची विक्री होते. पती निधनानंतर मुलगा सुशांत व मुलगी स्वप्नालीने मोठे बळ देऊन हा उद्योग वाढविण्यास मदत केली. यामुळेच आपण यशस्वी झाल्याचे सुवर्णाताई सांगतात. दिवाळीला लगीनघाई दिवाळीच्या दरम्यान सुवर्णाताईंचे घर म्हणजे लग्नघरच असते. सुमारे पंचवीस महिला या कालावधीत दररोज मदतीस असतात. महिनाभराच्या कालावधीत तब्बल दोन टन अनारसे कोल्हापूरसह निपाणी, गडहिंग्लज, मुधाळतिट्टा, इचलकरंजी, सांगली भागात पाठविले जातात. मागणी नोंदवून अनारसे वेळेत पोच करणे याचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागते. फेमस केली कोल्हापुरी पुडाची वडी अनारसे विक्रीत स्थिरता आल्यानंतर सुवर्णाताईंनी गेल्या काही वर्षांपासून ‘पुडाची वडी` तयार करण्यास सुरवात केली. जशी पुण्याची बाकरवडी तशीच पुडाची वडी कोल्हापुरात प्रसिद्ध आहे. मैदा, खोबरे, लसूण, खाद्यतेलाचा वापर करून तयार केलेली ही वडी अनेकांनी परदेशात आपल्या नातेवाइकांनाही पाठविली आहे. कोल्हापूर शहरातील कोणत्याही दुकानात सुवर्णाताईंनी तयार केलेल्या पुडाच्या वडीला पहिली पसंती असते, हे समाधान खूप मोठे असल्याचे त्या सांगतात. संपर्क - सुवर्णा पाटील, ९०२८८०२५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com