रोपे तयार करण्यासाठी निवडलेली जागा चांगली स्वच्छ करावी. त्याचप्रमाणे जमीन चांगली नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. तीन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. गादी वाफ्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरावे व मातीत मिसळावे. वाफ्यावर दोन सें.मी. खोलीच्या दहा सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर रेघा ओढून घ्याव्यात. त्यात प्रथम फोरेट (१० जी) हे कीटकनाशक दहा ग्रॅम प्रत्येक वाफ्यावर टाकून नंतर बी पेरणी करावी. प्रति वाफा दहा ग्रॅम बियाणे वापरावे. एक हेक्टर ढोबळी मिरची लागवडीसाठी सुमारे ४०० ते ५०० ग्रॅम बियाण्याची गरज असते. जातीनुसार बियाण्याची गरज बदलू शकते. रोपे सहा ते आठ आठवड्यांची झाल्यावर ती पुनर्लागवडीस तयार होतात. लागवड करताना रोपे १५ सें.मी. उंचीची आणि आठ ते दहा पाने असलेली निरोगी, सशक्त असावीत. कंपोस्ट आणि बारीक रेती (वाळू) हे १ ः १ या प्रमाणात मिश्रण करून ट्रेमध्ये भरावे. सर्वसाधारणपणे एका ट्रेमध्ये ३ ते ४ ग्रॅम मिरची बी लागते. ट्रेमधील माती भिजवून त्यावर कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकांची फवारणी करावी. ओळी तयार करून अर्ध्या इंचावर बियाणे टोकून, त्यावर झाकून घ्यावे. ट्रेवर प्लॅस्टिक कागद झाकल्यास ऊब मिळून ४ ते ५ दिवसांत बियाणे उगवते. त्यानंतर प्लॅस्टिक कागद काढून ट्रे उन्हात ठेवावेत आणि ट्रे ओलसर राहतील, याची काळजी घ्यावी. - १० ते १५ दिवसांनी ट्रेमधील रोपे प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून ठेवावीत. तीन ते चार आठवड्यांनंतर ही रोपे लागवडीसाठी वापरावीत. लागवड : रोपाची लागवड करताना दोन ओळींतील अंतर ६० सें. मी. (२ फूट) आणि दोन रोपांमधील अंतर ४५ सेंटिमीटर ठेवल्यास एकरी सर्वसाधारणपणे १४,५२० झाडे लागतात. रोपांची लागवड संध्याकाळी करावी. हलकी जमीन असेल, तर सरीमध्ये लावण करावी आणि भारी जमीन असेल, तर सरीच्या एका बगलेस करावी.
आंतरमशागत : एक महिन्याच्या अंतराने खुरपणी करावी. खते द्यावीत व झाडांना भर द्यावी.
हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. माती परीक्षणानंतर १५० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाश पिकाला द्यावे. संपूर्ण पालाश, स्फुरद आणि शेणखत तसेच अर्धी नत्राची मात्रा लागवड करताना द्यावी. उर्वरित अर्धे नत्र दोन समान हप्त्यांत द्यावे. एक लागवडीनंतर एक महिना व पन्नास दिवसांच्या अंतराने विभागून द्यावे. मिरचीला लागवडीपासून सुरवातीच्या वाढीसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काही शेतकरी या पिकाची लागवड पट्टा पद्धतीने करतात व पाणी ठिबक पद्धतीने देतात. यामुळे पाण्याची बचत होते व उत्पादनात सव्वा पटीने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. फळांची काढणी आणि उत्पादन : फळे हिरवीगार व संपूर्ण वाढलेली असल्यास फळांची काढणी करावी. त्यासाठी फळांच्या टोकाच्या वाळलेल्या स्त्री केसरांचा भाग गळून पडलेला असावा. साधारणपणे दर आठ दिवसांनी फळांची काढणी करावी. अशा चार ते पाच काढणीत सर्व पीक निघते. हेक्टरी ढोबळी मिरचीचे १७ ते २० टनांपर्यंत सरासरी उत्पादन मिळते.
पीक संरक्षण : मर : रोपे सुरवातीपासूनच कीड व रोगमुक्त असावीत. बी पेरताना बियांना थायरमची प्रक्रिया करावी. वाळलेली रोपे उपटून टाकावीत व ०.६ टक्का तीव्रतेचे बोर्डो मिश्रण झाडांना ओतावे.
विषाणूजन्य रोग (चुरडा-मुरडा) :
विषाणूंजन्य रोगाचा प्रसार रसशोषक कीटकांमार्फत होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या किटकनाशकांचा वापर करावा. तापमानात वाढ झाल्यावर लाल ठिपक्यांच्या कोळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाण्यात विरघळणारे गंधक दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. - एस. जी. महाडिक, एच. व्ही. बोराटे संपर्क : ०२५२५ - २४१०४८ (लेखक कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे कार्यरत आहेत.)