रब्बीतील विविध पिकांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असते. राज्यातील विविध भागांतील अनेक शेतकरी अशा सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून उत्पादन व दर्जामध्ये चांगली वाढ मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांचे अनुभव अन्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
नाव : अक्षय मुकुंद कातड,गिरणारे, ता. जि. नाशिक
पिकाचे नियोजन : खरिपात टोमॅटो तर रब्बी हंगामात गहू, हरभरा तसेच वेलवर्गीय पिके घेतो. रब्बी हंगामात गहू ३ एकर, हरभरा १ एकर व काकडी, भोपळा, मिरची, वांगी ही पिके ३ एकरांत घेतो. जमिनीचा प्रकार काळी खोल असा आहे. आमच्या भागात सरासरी पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे गव्हासारख्या पिकाला लागवडीला पाणी देण्याची गरज भासत नाही. दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने गव्हाची पेरणी करतो. हरभराही याच वेळी पेरतो. गव्हासाठी संकरित, तर हरभऱ्यासाठी गावराण वाण वापरतो. पेरणी अगोदर ट्रायकोडर्मा, स्युडोमोनस या जैविक बुरशींची बीजप्रक्रिया करतो. गव्हाचे एकरी ४० किलो बियाणे लागते. पेरणीआधी ट्रॅक्टरने फणून व वखरुन घेतो. एकरी २ ट्रॉली शेणखत पसरून देतो. त्यानंतर पेरणी करतो. मातीतील ओलीवर पेरणी होते. लगेच वररून पाणी देत नाही. पहिले पाणी प्रवाही पद्धतीने गहू अंकूरून आल्यावर १० दिवसांनी देतो. त्यानंतर पुढील ठिबक सिंचन पद्धतीने दिले जाते. त्यासाठी गेल्या ४ वर्षांपासून इनलाइन ठिबक वापरतो. २०० फूट लांब व ५ फूट रुंद गादीवाफ्यात ठिबकच्या दोन लॅटरल पसरतो. ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्याने गव्हाला लागणाऱ्या पाण्यात ५० टक्के बचत झाली असून, उत्पादनात २० टक्के वाढ झाल्याचा गेल्या चार वर्षांचा अनुभव आहे. पूर्वी मिळणारे एकरी ३५ क्विंटल उत्पादन वाढून ४० क्विंटलपर्यंत आले आहे. खत व्यवस्थापनात पहिले पाणी देताना एकरी १०० किलो बोनमिल हे खत देतो. त्यानंतर दीड महिन्यानी गहू पोटरीत आल्यावर १०:२६:२६ हे खत एकरी १०० किलो देतो. ओंबी निघत असतांना बोरॉन, झिंक, कॅल्शियम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी दर दहा दिवसांच्या अंतराने दोन वेळा करतो. गव्हावर तांबेरा रोग व मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. लागवडीनंतर साधारण १ महिन्यानी थंडी व दाट धुके असतानाचे वातावरण रोग किडीसाठी पूरक असते. या वेळी बुरशीनाशकाची योग्य प्रमाणात फवारणी करतो. शक्यतो रासायनिक कीडनाशकांची फवारणी टाळतो. त्याऐवजी करंज तेल व नीमयुक्त कीडनाशकाचा वापर करतो. साडे तीन महिन्यांनंतर पक्वतेनंतर हार्वेस्टरच्या साह्याने काढणी केली जाते. एका एकरातून गव्हाचे ४० क्विंटल उत्पादन मिळते. आतापर्यंत क्विंटलला सरासरी २२०० रुपये दर मिळाला आहे. एका एकरातून आतापर्यंत एकूण ८८,००० रुपये उत्पन्न मिळाले आहे. हरभरा पिकाला एकरी एकूण खर्च ४००० रुपये इतका आला आहे. हरभऱ्याचे एकरी १० क्विंटल उत्पादन मिळते. हरभऱ्याला क्विंटलला ४५०० रुपये दर मिळाला आहे. हरभऱ्यापासून एकरी ४५,००० उत्पन्न मिळाले आहे. संपर्क : अक्षय कातड, ७७७५०३७७६६