नवीन लागवड केलेल्या फळझाडांना नत्राची मात्रा ५० ग्रॅम प्रतिझाड तसेच शेणखताची मात्रा १० किलो प्रतिझाड या प्रमाणात द्यावी. अांबे बहरासाठी पाण्याचा ताण दिला असल्यास खालीलप्रमाणे कामे करावीत. हलकी नांगरणी व वखरणी करून काडी कचरा वेचून बाग स्वच्छ करावी. झाडाभोवती दुहेरी बांगडी पद्धतीने आळे तयार करावे. झाडाच्या दोन ओळीमधून पाणी देण्यासाठी दांड तयार करावेत. प्रतिझाड कुजलेले शेणखत ५० किलो, नत्र, स्फुरद व पालाश प्रत्येकी ४०० ग्रॅम याप्रमाणात आळे करून द्यावे. बागेस ताण देताना प्रथम आळ्याच्या १/४ भागाचे पाणी तोडावे. चार ते पाच दिवसांनी १/२ भागाचे पाणी तोडावे. पुन्हा ५-६ दिवसांनी ३/४ भागाचे पाणी तोडावे. शेवटी संपुर्ण पाणी तोडावे. कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल (१८.५ टक्के) २.७ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. मुख्य खोडालगत आलेली पिले कापून टाकावीत. थंडीपासून संरक्षणासाठी बागेभोवती रात्री व सकाळी शेकोटी पेटवून धूर करावा. बागेस पाणी शक्यतो रात्रीच्या वेळी द्यावे. गाभासड आढळून आल्यास रोगग्रस्त झाडे मुळासकट खोदून नष्ट करावीत. करपा रोग आढळल्यास मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कंद पोखरणारा सोंडकिडा या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून बुंध्याभोवती आळवणी करावी. बागेस ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे. बागेस आळे करून शेणखत ५० किलो तसेच रासायनिक खते नत्र ८०० ग्रॅम, स्फुरद ४०० ग्रॅम व पालाश ४०० ग्रॅम प्रतिझाड द्यावे. नियमित १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. दुधी भोपळा, कारले, दोडके, वांगी, मिरची, चवळी, भेंडी लागवड करावी. धुके पडल्यानंतर कांदा पात खराब होते. तसेच कांदा पीक एक ते दीड महिन्याचे झाले असल्यास विळ्याने पात ५ सें.मी.पर्यंत कापून हेक्टरी ५० किलो नत्र युरियाद्वारे द्यावे. गाजर काढणीपूर्वी १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. संपर्क : डी. डी. पटाईत, ०२४५२-२२९००० (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)