कांदा-लसूण सल्ला

कांदा-लसूण सल्ला

सध्या शेतात खरीप कांद्याचे पीक उभे असून, रांगडा कांद्याची पुनर्लागवड करण्याची वेळ आहे; तसेच रब्बी कांदा रोपवाटिका करण्याची योग्य वेळ आहे. लसूण आणि बीजोत्पादनासाठी कांद्याचे कंद साधारपणपणे या महिन्यामध्ये लावले जातात. 

खरीप कांद्याच्या उभ्या पिकाकरिता : 

  • सतत पाऊस पडत राहिल्यास काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अतिरिक्त पाण्याचा योग्य रितीने निचरा करून घ्यावा. 
  • पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ मि.ली./ लिटर या प्रमाणात द्यावीत.
  • नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरियाची १० ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  • फुलकिडे व करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी)मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम  - १५ दिवसांच्या अंतराने, कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लाझोल १ ग्रॅम  - १० ते १५ दिवसांच्या अंतराने, प्रोफेनोफॉस १ मि.ली. अधिक हेक्‍साकोनॅझोल १ मि.लि. 
  • पुनर्लागवडीच्या ११० दिवसांनंतर खरीप कांदा पिकाची काढणी करावी. कांदाकाढणीपूर्णी रिकामा बॅरल फिरवून माना पाडून घ्याव्यात. कांदाकाढणीआधी १० दिवस पाणी देणे बंद करावे. 
  • पावसामध्ये पिकाची काढणी करू नये. पाणी शोषलेल्या कंदामध्ये साठवण क्षमता कमी असल्याने असे कांदे त्वरित बाजारामध्ये पाठवावेत. 
  • लसूण लागवडीकरिता पूर्वमशागत : 

  • शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
  • वाफे तयार करण्यापूर्वी हेक्‍टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ पट कोंबडी खत किंवा ७.५ टन गांडूळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.
  • रासायनिक खत मात्रा हेक्टरी नत्र ७५ किलो, स्फुरद ४० किलो, पालाश ४० किलो व गंधक ४० किलो द्यावे. लागवडीवेळी २५ किलो नत्र आणि स्फुरद, पालाश व गंधकाच्या संपूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरीत नत्रमात्रा दोन समान हप्त्यात विभागून ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. 
  • ठिबक सिंचन वापरत असल्यास, लागवडीपूर्वी २५ किलो नत्र देऊन, उर्वरीत नत्रमात्रा सहा समान हप्त्यात विभागून दहा दिवसांच्या अंतराने द्याव्यात. 
  • ऍझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू (पीएसबी) या जैविक खतांच्या प्राथमिक मात्रा प्रत्येकी ५ किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात द्यावे.
  • पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.ली. प्रति लिटर किंवा पेंडीमिथेलीन (३० टक्के ईसी) ३.५ ते ४ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात या तणनाशकांचा वापर करावा.
  • लागवडीकरीता १.५ ग्रॅम वजनाच्या पाकळ्या निवडाव्यात. लहान, पोचट, रोगट लसून कळ्या निवडू नयेत. 
  • बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात लसून कळ्या दोन तास बुडवून नंतर लागवड करावी. 
  • लसूण कळ्या टोकण पद्धतीने १५ बाय १० सेमी अंतरावर व २ सेमी खोलीवर लावाव्यात. हेक्टरी ४०० ते ५०० किलो कळ्या लागतात. 
  • गादी वाफे १५ सें.मी. उंच आणि १२० सें.मी. रुंद असे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. इतके अंतर ठेवावे. रुंद गादी वाफ्यांची पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोयीची आहे.
  • ठिबक सिंचनासाठी प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलाईन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. जाडीच्या दोन लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रिपर मधले अंतर ३०-५० सें.मी. असावे. तसेच त्याची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी.
  • तुषार सिंचनासाठी लॅटरलमध्ये (२० मि.मी.) ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.
  • बीजोत्पादनासाठी कांदा लागवड 
  • लागवडीच्या सर्व बाबी वरील शिफारशीप्रमाणेच आहेत. 
  • लागवडीसाठी ५० ते ६० ग्रॅम वजनाचे मध्यम आकारेच कांदे निवडावेत. सालपट निघालेले, काजळी व मोड आलेले किंवा सडलेले कांदे बीजोत्पादनासाठी अजिबात वापरू नयेत. 
  • हेक्टरी ३ ते ३.५ टन कांदे बियाण्यासाठी लागतात.  
  • कंद प्रक्रिया : प्रक्रियेपूर्वी कंदाचा वरील एक तृतीअंश भाग कापून टाकावा. त्यानंतर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर द्रावण्यामध्ये कंद बुडवून लागवड करावी. 
  • दोन सऱ्या तळाशी २० सेमी अंतरावर कांदे ठेवून लागवड करावी. एक सरी मोकळी ठेवावी. कांदे ठेवलेल्या सरीचा माथा सपाट करावा.  त्यामुळे सरीच्या तळाशी ठेवलेले कांदे मातीने चांगले झाकून जातात. शिवाय ठिबक सिंचनाच्या लॅटरल पसरण्यासाठी सपाट जागा तयार होते. एक जोड ओळीसाठी एक लॅटरल वापरावी. 
  • रब्बी कांदा व लसूण साठवणीसाठी : 

  • कांद्याची सड आणि कोंब येणे टाळण्यासठी सातत्याने देखरेख ठेवावी. सडलेले, पिचलेले कांदे तात्काळ काढून टाकावेत. कांदा चाळीमध्ये हवा खेळती राहील, याकडे लक्ष द्यावे. 
  • कांद्याचे ढिग ४-५ फूट उंचीपर्यंत ठेवून योग्य प्रकारे पसरावेत. 
  • लसणाच्या गड्ड्या पातींसह हवेदार चाळीमध्ये लटकवून किंवा वरील दिशेने निमुळत्या होत गेलेल्या वर्तुळाकार ढिगामध्ये साठवून ठेवावेत. 
  • रांगडा कांदा रोपांची पुनर्लागवड : 

  • शेताची नांगरणी करून, कुळवाच्या पाळ्या देऊन मोठे ढेकळे फोडून जमीन भुसभूशीत करावी. 
  • वाफे तयार करण्यापूर्वणी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन गांडूळखत किंवा कोंबडी खत मिसळून घ्यावे. 
  • गादीवाफे १५ सेमी उंच आणि १२० सेमी रुंद तयार करावेत. दोन वाफ्यामध्ये ४५ सेमी अंतर ठेवावे. रुंद गादी वाफा पद्धती तुषार किंवा ठिबक सिंचन पद्धतीसाठी सोयीची ठरते. 
  • ठिबक सिंचनासाठी प्रत्येक वाफ्यावर १६ मिमी व्यासाच्या दोन इनलाईन लॅटरल (उत्सर्ग ४ लिटर ) वापराव्यात. 
  • तुषार सिंचनासाठी २० मि.मी. व्यासाची लॅटरलवर ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरापर्यंत फेकणारे नोझल वापरावेत.
  • रासायनिक खतांमधून हेक्‍टरी नत्र ११० किलो, स्फुरद ४० किलो व पालाश ४० किलो देणे आवश्‍यक आहे. गंधक देण्यापूर्वी जमिनीतील गंधकाच्या प्रमाणाचा अंदाज घ्यावा. जमिनीमध्ये हेक्‍टरी २५ किलो पेक्षा जास्त गंधक असल्यास, गंधक हेक्‍टरी १५ किलो या प्रमाणात द्यावे. गंधकाचे प्रमाण हेक्‍टरी २५ किलो पेक्षा कमी असल्यास, अशा जमिनीत हेक्‍टरी ३० किलो या प्रमाणात गंधक द्यावे. 
  • रोपांच्या पुनर्लागणीच्या वेळी ४० किलो नत्र द्यावे. मात्र, स्फुरद, पालाश व गंधक यांच्या पूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत पुनर्लागणीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्या.
  • कांद्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला असल्यास, रोपांच्या पुनर्लागणीच्या वेळी ४० किलो नत्र देऊन उर्वरित नत्र समान हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे ६० दिवसांपर्यंत द्यावे.
  • तणनाशकाचा वापर ः पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी, प्रमाण प्रति लिटर पाणी
  • ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.ली. किंवा पेंडीमिथेलीन (३० टक्के ईसी) ३.५ ते ४ मि.ली. 
  • दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून ३५-४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागण करावी.
  • पुनर्लागवडीकरिता रोपे निवडताना योग्य काळजी घेणे आवश्‍यक आहे. खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्यांकडील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा.
  • कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • पुनर्लागवडी वेळी व पुनर्लागवडीनंतर तीन दिवसांने पाणी दिल्यास रोपांची चांगली वाढ होते.
  • या काळात फूलकिडे, करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी, शिफारशीनुसार योग्य त्या कीडनाशकाची फवारणी करावी.
  • संपर्क : डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५ - २२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर जि. पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com