फुलपिकांमध्ये मोगरावर्गीय फुलपिकांना बहर धरण्यासाठी पाण्याचा ताण देण्यास सध्याचा काळ अनुकूल आहे. तसेच थंडीमुळे गुलाब या फुलपिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. मोगरा :
मोगरावर्गीय फुलपिकात पिकाचे पाणी तोडून बहर धरावा. बहर धरण्यासाठी जमिनीच्या मगदूरानुसार १० - १५ दिवस पाणी ताेडावे. म्हणजे पिकाला विश्रांती मिळेल. झाडाची पाने मलूल होऊन किंवा गळून पडू लागली की विश्रांतीकाळ पूर्ण झाला असे समजावे. अशी अवस्था जोपर्यंत येत नाही तोेपर्यंत पिकाला पाणी बंद करावे. पाने गळू लागताच आळ्याची खांदणी करावी. पिकाला खतमात्रा देऊन पाणी द्यावे. मोगऱ्याच्या पूर्ण वाढलेल्या प्रतिझाडास २०-२५ किलो शेणखताची मात्रा द्यावी. रासायनिक खतमात्रांमध्ये ५० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश प्रतिहेक्टर याप्रमाणात द्यावे. खते आळे पद्धतीने देऊन पाणी द्यावे. पिकाला पाणी देण्याअगोदर झाडांची छाटणी करावी. झाडावरील कमकुवत, रोगट, एकमेकांत मिसळणाऱ्या फांद्या छाटून टाकाव्यात. छाटणीनंतर संपुर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र झाडास द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा कळ्या धरण्याच्या वेळी द्यावी. छाटणीनंतर पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. उघड्यावरील गुलाब फुलांची काढणी करावी. पॅकिंग करून ती बाजारात पाठवावीत. थंडीमध्ये गुलाब पिकावर भुरी रोगाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून डिनोकॅप किंवा डायफेन्कोनॅझोल ०.०५ टक्के (५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) याप्रमाणात आलटून - पालटून फवारणी करावी. संपर्क : डॉ. सतीश जाधव, ९४०४६८३७०९ (अखिल भारतीय समन्वयित पुष्प सुधार प्रकल्प, गणेशखिंड, पुणे)