सद्यःस्थितीत मोसंबीच्या आंबेबहर व मृगबहर धरलेल्या बागात फळगळीची समस्या दिसून येत आहे. अन्नद्रव्यांचे असंतुलन हे त्यामागील मुख्य कारण असून त्यानुसार उपाययोजना कराव्यात.
मोसंबीच्या एका फळाच्या पूर्ण वाढीसाठी चाळीस पानांची गरज असते. बहराच्या प्राथमिक अवस्थेत पानेविरहीत फांद्यावर काही फळे पोसली जातात. अशा फळांची वाढ मंदगतीने होऊन ती कमकुवत राहतात. झाड सशक्त आणि निरोगी राहण्यासाठी फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी. फळवाढीसाठी कार्बन नत्राचे संतुलन आवश्यक असते. नत्रामुळे पेशीक्षय क्रिया कमी होते. पानातील एकूण नत्रापैकी अमोनियम या संयुगाची मात्रा फळाच्या निरोगी वाढीसाठी पोषक असते. युरियाची १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी (१ टक्का) या प्रमाणात फवारणी केल्याने ही मात्रा वाढविता येते. कर्बोदकांचे प्रमाण : फळवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत कर्बोदकांच्या भरपूर उपलब्धतेमुळे पेशीभित्तीका सशक्त होते. बिजांडाचे आवरण त्यामुळे टणक होऊन भ्रूणाच्या वाढीला मदत होते. अशा वाढलेल्या भ्रूणातून ऑक्झिन संजीवकाचा स्राव सुरू राहून पेशीक्षय टळू शकतो. जमिनीतील आर्द्रता : बागेतील सर्व झाडांना आवश्यक तेवढे सिंचन दिल्यास फळगळतीस आळा बसतो. पाण्याच्या कमतरतेमुळे फळांच्या सुरवातीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. फळात त्वरित पेशीक्षय होण्यास सुरवात होते. तापमान : फळवाढीच्या सुरवातीच्या काळात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्या वर असेल आणि पाणी व्यवस्थापन योग्य नसल्यास फळगळ होते. उच्च तापमान आणि पाण्याचा ताण यामुळे झाडाच्या पानांची पर्णछिद्रे (स्टोमॅटा) बंद होतात. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. वाढीच्या अवस्थेतील फळांना कर्बोदकाचा पुरवठा कमी होतो.त्यामुळे फळगळ होते. बागेमध्ये तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास तापमान कमी होऊन ही फळगळ कमी होऊ शकते. फळगळीच्या नियंत्रणासाठी संजीवकांचा वापर करण्यात येतो. उदा. एनएए , जिबरेलिक ॲसिड. संजीवकांमुळे वनस्पतीमधील ऑक्झीनचे प्रमाण वाढून पेशीक्षय कमी होतो. नैसर्गिक फळगळ फायद्याची असली तरी वातावरणातील बदलामुळे होणारी फळगळ थांबविणे आवश्यक असते. त्यासाठी अंबिया बहराची फळधारणा झाल्यानंतर मे आणि जून महिन्यांत एनएए १५ पीपीएम (१५ मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) किंवा जिबरेलिक ॲसिड २० पीपीएम (२० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी) अशी फवारणी करावी. किंवा कार्बेन्डाझिम १ग्रॅम प्रतिलिटर पाणी) अधिक युरिया १ टक्का (१० ग्रॅम प्रतिलिटर) या मिश्रणाची एक फवारणी करावी. ह्याच मिश्रणाच्या दोन फवारण्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत फळे तोडणीपूर्वी कराव्यात. संपर्क : डॉ. एम. बी. पाटील, ९४२२८७३४१७ (मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर)