शेषरावांनी सुनियोजितपणे जपलेली संत्रा बाग 

शेषराव घोडेराव यांची सुनियोजित संत्रा बागेची नवी लागवड
शेषराव घोडेराव यांची सुनियोजित संत्रा बागेची नवी लागवड

टेंभूरखेडा (ता. वरुड, जि. अमरावती) येथील शेषराव घोडेराव यांनी आपल्या भागातील पारंपरिक नागपुरी संत्र्याची शेती उत्तमपणे साधली आहे. सुमारे १४ ते १५ एकरांत दोन बहारांत घेत असलेल्या संत्र्यांची थेट विक्रीही सुरू केली आहे. विदर्भ ऑरेंज फार्मर्स ग्रोअर्स नावाने शेतकरी कंपनीही सुरू करून संत्रा पिकाला अधिक चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.    अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी या भागात नागपुरी संत्र्याखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. जिल्ह्यातील टेंभूरखेडा (ता. वरुड) येथे शेषराव घोडेराव यांची शेती आहे. त्यांचा प्रिंटींग प्रेसचाही व्यवसाय आहे. मात्र तो सांभाळून त्यांनी शेतीचाही चांगला विकास साधला आहे. संत्रा हे त्यांचे मुख्य पीक आहे. एके ठिकाणी अकराशे, दुसऱ्या ठिकाणी सातशे तर तिसऱ्या ठिकाणी सुमारे ३८० झाडे असे त्यांचे संत्र्याचे क्षेत्र विखुरलेले आहे.  शेतीतील व्यवस्थापन  आंबीया व मृग असे दोन्ही बहार घेण्याकडे शेषराव यांचा भर असतो. आंबिया बहारातील फळांचे उत्पादन पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाच्या सोयी आहेत तेच या बहाराला पसंती देतात. यंदा तापमान नीचांकी आले होते. परिणामी या काळात बागेला पाणी देण्यात आले नाही. या काळात पाणी दिल्यास झाडांना नवती फुटण्यात अडचणीत येतात. त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली असे शेषराव सांगतात. जानेवारीत प्रति झाड २५ ते ३० किलो प्रमाणात शेणखत दिले जाते.  मधमाशांच्या माध्यमातून परागीभवनाची प्रक्रिया होते. त्याचाही उत्पादकतेवर अपेक्षित परिणाम होतो.  थेट विक्रीवर भर  सुमारे सात ते आठ वर्षे वयाच्या झाडांपासून प्रति झाड सुमारे ५०० फळे एवढे उत्पादन मिळते.  बाजारात फळे पाठविण्यापूर्वी शेतातच प्रतवारी केली जाते. बागेतच क्रेटमध्ये भरून पुरवठा होतो.  यंदा आंबिया बहारातील संत्र्याला २५ ते २८ हजार रुपये प्रति टन दर मिळाला. व्यापाऱ्याला बाग देण्याच्या पर्यायात सातत्य ठेवले आहे. तथापी अलीकडील काळात नागपूर येथील बाजार किंवा तत्सम ठिकाणे निवडून थेट विक्री करण्यावर भर दिला आहे. दोन डझनाचा कोरूगेटेड बॉक्‍स व २० किलो याप्रमाणे विक्री करण्यात येत आहे.  पाण्याची केली अशी सोय  पाण्यासाठी एकमेव विहिरीचा पर्याय आहे. यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक जाणवू लागल्याने  बेंबळी शिवारातून सुमारे १४ हजार फुटांवरून पाणी आणले आहे. त्यासाठी केलेल्या पाइपलाइनसाठी  सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च झाला. वरुड, मोर्शी हा ड्राय झोन असल्याने नव्या बोअरवेलच्या कामाला बंदी आहे. बेंबळी शिवारात काही शेतकऱ्यांच्या जुन्या बोअरवेल्स आहेत. मात्र वापराअभावी त्या बंद पडल्या होत्या. त्यांचे पाणी आपल्या शेतापर्यंत आणत बाग वाचविण्यासाठी शेषराव यांनी पुढाकार घेतला.  नव्या बागेत मिरचीचे आंतरपीक  शेषराव यांनी २०१२ मध्ये बारगाव शिवारात तीन एकर शेती खरेदी केली. त्यातील दीड एकरावंर २०१८ मध्ये नवी संत्रा लागवड करण्यात आली. ही झाडे लहान असल्याने यात मिरचीचे आंतरपीक घेतले. दीड एकरात १० टन उत्पादन मिळाले. राजूरा बाजार येथील बाजारात विक्री होऊन १२०० रुपये प्रति क्‍विंटलप्रमाणे दर मिळाला. संत्र्यामधील आंतरपीक हा जणू बोनस पर्याय प्रमाणे ठरतो.  पूरक व्यवसायातून उन्नती  शेषराव यांनी संत्रा पिकाला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. टेंभूरखेडा शिवारात ते सुमारे १५० गावरान कोंबड्यांचे संगोपन करकतात. त्यापासून दररोज ३५ ते ४० अंडी मिळतात. दहा ते १५ रुपये प्रति नग दराने त्यांची विक्री होते. या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून शेतीसाठी लागणाऱ्या दोन मजुरांच्या मजुरीची सोय होते. पूर्वी मोठ्या संख्येने दुधाळ जनावरे होती. त्यांच्यासाठी बांधलेल्या गोठ्यातच कोंबड्यांना ठेवले आहे. आता केवळ तीन गावरान गायी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाची विक्री न करता घरगुती कारणासाठीच वापर होतो. सात ते आठ शेळ्यांचे संगोपनही होते. त्यांचे लेंडीखत शेतीला उपयोगी ठरते. शेषराव यांनी विदर्भ ऑरेंज फार्मर्स ग्रोअर्स या शेतकरी कंपनीची स्थापनाही केली आहे. त्याचे सुमारे २५० शेतकरी आहेत.  संपर्क - शेषराव घोडेराव - ९३२५५५९९०७  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com