फळे, भाज्यांच्या साठवणीसाठी सहज उपलब्ध असणाऱ्या विटा, बांबू, वाळू आणि गोणपाट इत्यादी वस्तूंपासून शीतकक्ष बनवता येतो. फळे आणि भाजीपाला साठविताना कसल्याही प्रकारची यांत्रिक, रासायनिक आणि विद्युत ऊर्जेची आवश्यकता नाही, त्यामुळे याला शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष म्हणतात. फळे पिकण्याची प्रक्रिया बाहेरील वातावरणाच्या तुलनेत तापमान कमी व आर्द्रता जास्त असल्यामुळे फळांमध्ये बाष्पीभवन कमी होऊन फळांच्या श्वसनक्रियेचा वेग मंदावतो आणि उष्णतामान कमी होण्यास मदत होते. फळे एकसमान पिकू लागतात, त्यामुळे त्यांच्या वजनात घट येत नाही. नियंत्रित वातावरणातील साठवण पद्धतीमध्ये कक्षातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून कार्बनडाय अाॅक्साईडचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे फळांचा श्वसनाचा वेग मंदावतो व फळे सुकत नाहीत. काढणी केल्यानंतर फळे आणि रासायनिक क्रिया तापमानाशी संबंधित असल्याने भाज्या व फळांची कमी तापमानाला योग्य त्या आर्द्रतेला साठवण केल्यास या क्रियांचा (उदा. श्वसनक्रिया, बाष्पीभवनाची क्रिया, पिकवण्याची क्रिया) वेग मंदावताे. सूक्ष्मजीवांच्या प्रादुर्भावामुळे फळे आणि भाज्या खराब होत असतात; पण कमी तापमानात फळे आणि भाज्यांवरील सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत, त्यामुळे भरपूर दिवसापर्यंत फळे टिकून राहतात. प्रत्येक फळांची आणि भाजीपाल्याची त्याच्या गरजेनुसार ठराविक तापमानाला आणि आर्द्रतेला शीतगृहात साठवण करावी लागते. तेव्हा फळांचे आणि भाज्यांचे आयुष्य दुपटीने, तिपटीने वाढते. उदा. आंब्याची फळे ही ८-१० अंश सेल्सिअस तापमानाला आणि ८५ ते ९० टक्के आर्द्रतेला शीतगृहात साठविली असता फळांचे आयुष्य चार आठवड्यांनी वाढते. फळे, भाजीपाल्याच्या साठवणीसाठी शीतकक्ष उत्पादक आपल्या शेतात फळे आणि भाजीपाल्याच्या साठवणीसाठी शीतकक्ष स्वतः बांधू शकतो. शीतकक्षाची रचना शीतकक्ष सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून बनविता येतो. विटा, वाळू, बांबू, वाळा, आणि वाया गेलेली पोती यांचा वापर करून या शीतकक्षाची रचना एका छोट्या हौदासारखी करता येते. विटांचा एक थर देऊन शीतकक्षाच्या तळाचा भाग रचतात. दोन विटांमधील अंतरात बारीक वाळू भरावी. त्यानंतर विटांच्या दोन भिंती रचून त्यात दोन भिंतीतील अंतर ७.५ से.मी.ठेवावे. दोन भिंतीमधील अंतर सुद्धा वाळूने भरून घ्यावे. अशा रीतीने वाळू आणि विटांच्या साहाय्याने हौद तयार करून घ्यावा. या हौदावर झाकण्यासाठी बांबूमध्ये पोत्यावर वाळा पसरून आणि सुतळीने बांधून घेऊन झाकण तयार करतात. वाळा नसल्यास नारळाच्या झावळ्या सुद्धा वापरतात. शीतकक्ष शक्यतो झाडाखाली किंवा छपराखाली बांधावा जेणेकरून दररोज सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा शीतकक्षाच्या भिंतीच्या बाहेरील बाजूने पाणी शिंपडावे आणि भिंत चांगली ओली करावी. ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी शीतकक्षातून जवळ अंतरावर एका ठराविक उंचीवर प्लास्टिकचा पिंप ठेऊन पाणी भरावे. पिंपाला पाइप जोडून शीतकक्षाच्या वरील बाजूस असलेल्या वाळूमधून पाइप ठेऊन त्याला ठिबक संचाच्या नळ्या जोडाव्यात म्हणजे पाण्याची बचत होते. शीतकक्षातील तापमान आणि आर्द्रतेचे नियंत्रण दिवसातून दोन वेळा पाणी शिंपडण्याने विटा थंड होतात. शीतकक्षात साठविलेल्या फळे आणि भाज्यांच्या श्वसनामुळे आणि इतर क्रियांमुळे उष्णता बाहेर निर्माण होते. विटावर पाणी शिंपडण्याने ही उष्णता बाहेर काढून घेतली जाते आणि शीतकक्षात गारवा निर्माण होतो. नियमितपणे शीतकक्षावर दिवसातून दोन वेळा पाणी मारल्यास कडक उन्हामध्ये शीतकक्षातील तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा १५ ते १८ अंश सेल्सिअस कमी असते. हिवाळ्यातसुद्धा बाहेरच्या तापमानापेक्षा शीतकक्षातील तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी असते. शीतकक्षात वर्षभर आर्द्रतेचे प्रमाण हे ९५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे कमी तापमान आणि जास्त आर्द्रता या दोघांचा परिणाम होऊन फळे आणि भाज्यांचे आयुष्य वाढते. फळे आणि भाज्या, ताज्या टवटवीत आणि आकर्षक राहतात. शिवाय वजनातसुद्धा खूप कमी घट होतो. फळांची पिकण्याची प्रक्रिया फारच मंद गतीने होते आणि एकसारखी होते. शीतकक्षात फळे, भाज्या कशा साठवतात काढणीनंतर तडा गेलेली, फुटलेली, दबलेली फळे, आणि भाज्या बाजूला कराव्यात. फळे आणि भाज्या प्रतावारीनंतर टोपल्या, करंड्या किंवा प्लास्टिकच्या क्रेटमध्ये ठेवून ते शीतकक्षात ठेवावीत आणि वरून झाकण ठेवावे. नियमितपणे दिवसातून दोन वेळा बाहेरच्या बाजूने पाणी मारावे. शीतकक्षात आंबा, संत्री आणि बोराचे आयुष्य ८ ते १२ दिवसांपर्यंत वाढते, असे दिसून आले. सर्वसाधारण खोलीच्या तापमानाला या फळांचे आयुष्य ५ ते ६ दिवस वाढते. कोथिंबीर, पुदिना आणि राजगिरा एप्रिल, मे महिन्यामध्ये फार तर एक दिवस टिकतात; परंतु शीतकक्षात त्यांची साठवण ३ दिवसांपर्यंत करता येते. शिवाय पालेभाज्या ताज्या आणि टवटवीत राहतात. तसेच पालक आणि मेथी शीतकक्षात १० दिवसापर्यंत चांगल्या स्थितीत राहते. भेंडी खोलीच्या तापमानाला १ दिवस टवटवीत राहते; परंतु शीतकक्षात तीच भेंडी ६ दिवस टिकते. तसेच गाजर, मुळा आणि कोबी शीतकक्षात साठविल्याने १० ते १२ दिवसापर्यंत ताज्या राहतात. संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र, अकोला) |