दोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..

करार शेतीची मदार विदर्भासह राज्यात मजुरांच्या उपलब्धतेअभावी शेती कसणे अवघड झाले आहे. अशा स्थितीतदेशमुख एकहाती आपली ५० एकर व इतरांची १५० एकर असे २०० एकर शेतीचे व्यवस्थापन कुशलपणे सांभाळत आहेत. त्यासाठी कोणता शेती व्यवस्थापक देखील त्यांनी ठेवलेला नाही. त्यांचा मुलगा देखील नोकरी करतो. त्यामुळे शेतीची सारी मदार देशमुख यांच्यावर आहे. त्यासाठी यांत्रिकीकरणावर त्यांनी भर दिला आहे
देशमुख यांच्या कापूस शेतीला शेतकरी भेट देऊन त्यांचे तंत्र जाणून घेतात.
देशमुख यांच्या कापूस शेतीला शेतकरी भेट देऊन त्यांचे तंत्र जाणून घेतात.

शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती खारपाणपट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांची सुमारे १५० एकर शेती कसायला घेत कापूस या मुख्य पिकाद्वारे त्यांनी एकूण २०० एकरांंपर्यंत शेतीचा विस्तार साधला आहे. चार ट्रॅक्टर्स, अन्य यंत्रांद्वारे शेतीचे यांत्रिकीकरण, भाडेतत्त्वावर त्यांचा वापर, मजुरांचे योग्य व्यवस्थापन आदी बाबींद्वारे शेती आर्थिक दृष्ट्या फायदेशीर केली आहे.  अमरावती हाच जिल्हा व तालुका असलेल्या शिराळा गावचे मनोहर देशमुख पंचक्रोशीत कापूस व सोयाबीन उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची वडिलोपार्जीत ५० एकर शेती. त्यांचा भाग हा खारपाणपट्टा म्हणून ओळखला जातो. येथे त्यामुळेच विविध पिकांचे प्रयोग करण्यावर मर्यादा येतात. देशमुख हे कापूस व सोयाबीन पिकाचे पारंपरिक शेतकरी आहेत.  देशमुख यांची करार शेती 

  • फळपिके किंवा संत्रा घेण्याचाही देशमुख यांचा प्रयत्न होता. मात्र खारपाणपट्ट्यामुळे ते शक्य झाले नाही. 
  • अखेर त्यांनी कापूस व सोयाबीनवरच लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. मात्र हवामानातील बदल, दोन्ही पिकांचे उत्पादन, मिळणारे दर यांचा विचार करता फार मोठी रक्कम हाती पडत नव्हती. 
  • अखेर त्यांनी करार शेतीचा आधार घेण्याचे ठरवले. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या व्यक्‍तींची शेती अनेकवेळा पडीक राहते. किंवा त्याकडे फारसे लक्ष देणे शक्य होत नसते. 
  • मग देशमुख यांनी अशा व्यक्‍तींची चाचपणी सुरू केली. त्यांची शेती कसण्यास घेण्यास सुरूवात केली. गेल्यावर्षी पर्यंत या भागात त्यांना एकरी दहा हजार रुपयांप्रमाणे करारावर शेती मिळायची. यावर्षी हे दर १५ हजारांवर पोचले आहेत. यंदाची स्थिती सांगायची तर १५० एकर शेती देशमुख यांनी सुमारे ४ ते ५ जणांकडून कसण्यासाठी घेतली आहे. 
  • यांत्रिकीकरणावर भर  विदर्भासह राज्यात मजुरांच्या उपलब्धतेअभावी शेती कसणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत देशमुख एकहाती आपली ५० एकर व इतरांची १५० एकर असे २०० एकर शेतीचे व्यवस्थापन कुशलपणे सांभाळत आहेत. त्यासाठी कोणता शेती व्यवस्थापक देखील त्यांनी ठेवलेला नाही. त्यांचा मुलगा देखील नोकरी करतो. त्यामुळे शेतीची सारी मदार देशमुख यांच्यावर आहे. त्यासाठी यांत्रिकीकरणावर त्यांनी भर दिला आहे.  कपाशीने दिला हात  मागील वर्षापर्यंत देशमुख यांनी १२० एकरांवर कपाशी तर ८० एकरांवर सोयाबीन घेतले होते.  मात्र सोयाबीनची उत्पादकता व दर यांचा मेळ बसला नाही. त्यातून फारसे हाती काही लागले नाही. कपाशीने मात्र एकरी १२ क्विंटलच्या दरम्यान उत्पादन दिले. मागील वर्षी एकूण क्षेत्रातून सुमारे १४०० क्विंटल कापूस हाती लागला. त्यातील ७०० क्विंटल कापूस क्विंटलला ५२०० रुपये दराने विकला. उर्वरित कापूस जूनच्या दरम्यान ५८०० रुपये दराने विकला. कापूस शेतीने चांगलाच हात दिला. त्यामुळे यंदा सोयाबीन पूर्ण कमी करून २०० एकर केवळ कापूस घेतला आहे.  कमी कालावधीच्या वाण लागवडीवर भर  अलिकडील काळात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे पूर्वहंगामी त्यासोबतच कमी कालावधीच्या कापूस वाण घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून होत आहे. ही बाब लक्षात घेत या वर्षी कोरडवाहू आणि कमी कालावधीत परिपक्‍व होणाऱ्या वाणाची लावण देशमुख यांनी केली. खाजगी कंपनीच्या या वाणाचा परिपक्‍वता कालावधी साधारण १४० दिवसांचा आहे. त्यामुळे वेचणीनंतर रान मोकळे होत असल्याने किडी-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. कीड नियंत्रणावरील खर्चही कमी होतो.  कापूस पीकच फायदेशीर  तब्बल २०० एकरांवर कापूस घेण्यामागील कारण सांगताना देशमुख सांगतात की उत्पादन एकरी १४ ते १५ क्विंटलपर्यंत येते. त्यासाठी उत्पादन खर्च ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत येतो. क्विंटलला पाच हजार रुपये दर मिळाला तरी ते किफायतशीर ठरते. यंदाही एकरी १४ क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहेच. दोनशे क्विंटलपर्यंत विक्री झाली आहे.  यांत्रिकीकरण व कामांत सुसूत्रता  सुमारे पंधरा वर्षांपूर्वी देशमुख यांच्याकडे ट्रॅक्‍टर होता. मात्र करार शेतीअंतर्गत क्षेत्र वाढीस लागल्याने त्यांनी आपल्याकडील यंत्रसामग्रीचा विस्तार करण्यास सुरवात केली. आज त्यांच्याकडे एकूण चार ट्रॅक्‍टर्स आहेत. त्यांच्यासाठी चार चालक आहेत. एक मदतनीस आहे. पेरणी व मळणी यंत्रदेखील आहे. सकाळी सहापासूनच त्यांचा शेतीतील दिवस सुरू होतो. मजूरांना कामकामाची सूचना देत ते टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या शिवारांत फिरतात. सुमारे १०० मजुरांचे नियोजन त्यांनी सुलभपणे केले आहे. गावातच मजूर मिळतात. प्रत्येकी ५० मजुरांचे दोन गट तयार करून दोन महिला मजुरांना त्यांचे मुख्य बनवले आहे. त्यामुळे कामांची जबाबदारी योग्य पणे सांभाळली जाते.  भाडेतत्त्वावर यंत्र  गेल्या वर्षीपर्यंत सोयाबीन व तूर ही पीकपद्धती होती. त्या वेळी तुरीचे पीक उभे असताना सोयाबीन काढणी शक्‍य झाली पाहिजे, यासाठी पंजाबहून त्यांनी यंत्र तयार करून आणले. त्याची किंमत १४ लाख रुपये आहे. सात तास सोयाबीन तर दोन तास ( ओळी) तूर याप्रमाणे कापणी शक्‍य व्हावी यासाठी यंत्राच्या समोरील बाजूस आठ फुटांचे ब्लेड लावले आहे. तुरीच्या दोन तासात नऊ फुटांचे अंतर राहते. तर मधल्या भागात सोयाबीनचे तास राहतात. तासाला सहा लिटर डिझेलची आवश्‍यकता भासते. डिझेलसाठी ३०० रुपये तर यंत्र हाताळणाऱ्या व्यक्‍तीची मजूरी १०० रुपये याप्रमाणे जेमतेम ४०० रुपयांचा खर्च या यंत्राच्या वापरावर होतो. तासाला सरासरी दीड एकरावंरील कापणी व मळणी शक्‍य होते. सलग शेतीत हेच काम दोन एकरांवर शक्‍य होते.  पेरणीयंत्रातही गरजेनुरूप बदल 

  • पेरणीयंत्रही गरजेनुसार तयार करून घेतले आहे. आता यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येतात. 
  • साधारण १२०० रुपये प्रति एकर दरा प्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन कापणी, मळणी करुन देण्यात येते. 
  • हंगामात सुमारे ३५० एकरांला त्याचा फायदा करून दिला जातो. अशा प्रकारची व्यावसायिकताही देशमुख यांनी जपली आहे.
  • संपर्क- मनोहर देशमुख - ९८६०३१०६५२   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com