हरभरा पिकाला तुषार सिंचनाने पाणी द्यावे.
हरभरा पिकाला तुषार सिंचनाने पाणी द्यावे.

पीक व्यवस्थापन सल्ला

रब्बी ज्वारी ः

  • पीक उगवणीनंतर ८ ते १० दिवसांनी पहिली विरळणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी विरळणी करून हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवावी.
  • कोरडवाहू ज्वारीस पेरणीनंतर ३, ५ व ८ आठवड्यांनी एकूण तीन कोळपण्या द्याव्यात आणि आवश्यकतेनुसार १ ते २ निंदण्या कराव्यात, म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर भेगा पडणार नाहीत, जमिनीवर ओलावा टिकून राहील आणि तणांचे नियंत्रण होईल.
  • रब्बी हंगामात जमिनीतील जवळपास ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे कमी होतो. जमिनीतील उपलब्ध ओलावा टिकविण्यासाठी शेतातील काढलेले तण, पालापाचोळा, गव्हाची काडे, तुर काटके इ. चा वापर ज्वारी पेरल्यापासून ५० दिवसांच्या आत आच्छादन म्हणून करावा.
  • शक्य झाल्यास कमकुवत झाडे काढावीत.
  • संरक्षित पाणी व्यवस्थापन करावे. एकच पाण्याची सोय असल्यास पीक ३५ ते ४० दिवासांचे असताना किंवा पीक पोटऱ्यात असताना पाणी द्यावे. पाणी मोकाट पद्धतीने न देता पट्टा पद्धतीने द्यावे.
  • करडई

  • पीक उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांनी विरळणी करून दोन रोपातील अंतर २० सें.मी. ठेवावे.
  • पीक उगवणीनंतर २५ ते ३० आणि ४५ ते ५० दिवसांनी दोन निंदण्या व कोळपण्या कराव्यात.
  • पाणी सोड ओळ पद्धतीने किंवा रुंद वरंबा पद्धतीने द्यावे.
  • सोड ओळ पद्धतीने पिकाच्या दोन ओळीनंतर एक ओळ पेरणी न करता सोडून द्यावी. सोडलेल्या ओळीतून सरी पाडून त्या सरीद्वारे पिकास पाणी द्यावे. सुरुवातीच्या अवस्थेत तुषार सिंचनाचा वापर करावा.
  • पिकाच्या संवेदनशील अवस्थेत (पीक फुलावर येताना आणि बोंडात करडई भरण्याची अवस्था) पाणी द्यावे.
  • गहू

  • एकेरी पेरणी करावी.
  • वेळेवर आंतरमशागतीमुळे तणांचे नियंत्रण होऊन ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
  • पेरणीनंतर ३०-४० दिवसाच्या आत गरजेप्रमाणे १-२ वेळा खुरपणी करावी. आच्छादनाचा वापर करावा.
  • कमी प्रमाणात ओलिताची सोय असेल तर पाण्याच्या पाळ्यांचे खालीलप्रमाणे नियोजन करावे.
  • ओलिताची उपलब्धता पाण्याची पाळी देण्याची वेळ (पेरणीनंतरचे दिवस)
    एक ओलिताची सोय ४२
    दोन ओलितची सोय २१, ६५
    तीन ओलितची सोय २१, ४२, ६५
    पाणी देण्यासाठी पिकास तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. -

    हरभरा

  • तीन आठवड्याच्या आत पिकास एक कोळपणी व खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे.
  • जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असतो आणि एखादे पाणी देणे शक्य असल्यास पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.
  • हलकी जमीन असेल तर ३५ आणि ७० दिवसांनी पाणी द्यावे भारी जमीन असेल तर ३५ दिवसांनी पाणी द्यावे.
  • जिरायती हरभऱ्यासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा दिड टक्के युरियाची (१५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) फवारणी करावी, त्यानंतर दुसरी १५ दिवसांनी फवारणी करावी.
  • तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • ऊस

  • हलक्या ते मध्यम जमिनीत पाणी लवकर मुरते. जास्त पाणी दिल्यास बहुतांशी पाणी निचऱ्याद्वारे वाया जाते. दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
  • पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास एकावेळी एकच सरीत पाणी न देता दोन ते तीन सऱ्यामध्ये तो सारख्या प्रमाणात विभागून घावा.
  • पाणी नेहमी एका आडएक सरीमध्ये द्यावे.
  • पट्टा पद्धतीने व जोडओळ पध्दतीने उसाची लागवड करावी.
  • हेक्टरी ८ ते १० टन ऊसाचे पाचट किंवा शेतातील पालापाचोळ्याचे आच्छादन करावे.
  • अती अवर्षण काळात पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी केओलीन (८०० ग्रॅम प्रति लिटर दहा पाणी) बाष्पीभवन विरोधी द्रावणाचे १० ते १२ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.
  • पिकांच्या बुंध्याकडील वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत व त्याचा आच्छादनासाठी वापर करावा. तणांचे नियंत्रण करावे.
  • पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने नोव्हेंबरपासूनच प्रत्येक पाळीतील अंतर हळूहळू वाढवीत जावे. शक्य तेथे आंतरमशागत करावी.
  • संपर्क ः डॉ. एस. बी. पवार ः ९४२२१७८९८२ (राष्टीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com