आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव अतिशय महत्त्वाचे कार्य करत असल्याने प्रत्येकाची काळजी घेणे आवश्यक असते. काही अवयव असे असतात, की आपल्याकडून त्याच्याकडे नकळत दुर्लक्ष केले जाते. कान, नाक यांची विशेषतः कानांची मुद्दाम काळजी घेतली जात नाही. सर्वप्रथम कानदुखी, कान कोरडे पडणे, आग होणे, फोड येणे ही लक्षणे का निर्माण होतात हे माहीत असायला हवे.
‘कान'' आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी एक आहे. ज्याद्वारे श्रवण हे महत्त्वाचे काम घडत असते म्हणून काळजीपूर्वक वेळच्या वेळी कानाची तपासणी करून आरोग्य उत्तम ठेवावे.
थंडीत त्वचा कोरडी पडते व खाजते. त्याचप्रमाणे कानाची त्वचा कोरडी पडून कान खाजतो. कानात मळ साठला असेल तरी कान दुखतो आणि खाजतो. खूप उष्ण प्रकृती असणाऱ्या स्त्रियांना कानावर किंवा आतील बाजूस फोड येतात. ते ठणकतात व क्वचित तापही येतो. त्यामुळेही कान दुखतो. कानशिले गरम होऊन आग होते. अनेक स्त्रियांच्या कानातून स्रावही येतो. बऱ्याचदा एकदम मान वळवली, पटकन उठले, आडवे झोपले की चक्कर येते किंवा तोल जातो. अशावेळी पित्त वाढले नसेल तर कदाचित कानात विकृती असू शकते. ही गोष्ट ध्यानात ठेवावी. बऱ्याच दिवसांपासून सर्दी असणे हेदेखील महत्त्वाचे कारण कानदुखीचे असते. अशी कारणे माहीत असली की त्याप्रमाणे काळजी घेणे सोपे जाते. कान दुखतो तो जास्त करून गार हवा सतत कानांना लागल्यामुळे, त्यामुळे पहाटे उठल्यावर विशेषतः थंडीच्या दिवसांत तरी कानाला रुमाल बांधावा. रोज गरम तव्यावर कापड गरम करून बाहेरून कानांना शेक द्यावा. लसणाच्या २-३ पाकळ्या खोबरेल तेलात गुलाबी होईपर्यंत उकळाव्यात व तेल कोमट झाले की २ थेंब घालावेत. जुनाट सर्दी असेल तर चिकित्सा करून घ्यावी. पिंपळी चूर्ण मधाबरोबर पाव चमचा प्रमाणात घ्यावे. हवेतील कोरडेपणामुळे, गारठ्यामुळे कानातील मळ कोरडा बनून त्रासदायक ठरतो. पेन्सिल, पीन, चष्म्याची दांडी, बोटांची नखे, काडना या गोष्टींचा वापर करून मळ काढण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे कानाच्या पडद्याला इजा व जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. त्यासाठी जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन मळ काढून घ्यावा. उष्णता वाढून कानशिलांची आग होत असल्यास चंदन, ज्येष्ठ मध, अनंत मूळ पावडर एकत्र करून पाण्यात कालवून बाहेरून लेप लावावा. आहारातही तूप, दूध यांचे प्रमाण वाढवावे. काही वेळा कानावर फोड येतो. त्यावर चंदन उगाळून लावावे. पोटातही गुलकंद घ्यावा. ज्यामुळे उष्णता कमी होते. त्वरित तज्ज्ञ आयुर्वेद डॉक्टरांना दाखवून चिकित्सा सुरू करावी. बऱ्याचदा कानातून स्राव होतो. पाणी आहे की पू आहे हे प्रत्यक्ष तपासल्यावरच कळते. अशावेळी कानाच्या डॉक्टरांना लवकर दाखवून यावे. त्याच्या जोडीला त्रिफळा गुग्गुळ, सूक्ष्म त्रिफळा या गोळ्या पाण्याबरोबर २-३ प्रमाणात घ्याव्यात. या गोळ्यांनी वेदना कमी होतात आणि जंतुसंसर्ग वाढत नाही. कान फुटण्याची तक्रार असेल तर दही, आंबट ताक घेऊ नये. आहारात तिखट चमचमीत खाऊ नये. मिरचीचा कमी वापर करावा. (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)