उत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो

पाणीटंचाईने शिकवले सन २०१२ मधील पाण्याच्या संकटानं अनेक बाबी शिकवल्या. दोन शेततळी, विहिरी, पाइपलाइनची सोय केली.शेततळ्यातील व प्रसंगानुरून विकत पाणी घेऊन मोसंबीची बाग व रोपवाटिका जगविण्याचे प्रयत्न होतात. प्रत्येक वर्षी शेती उत्पन्नातील निम्मा पैसा पुढील वर्षासाठी गुंतवण्याची सवय ठेवली. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला.
पिवळ यांचे शेततळे, मोसंबीची बाग, नर्सरी
पिवळ यांचे शेततळे, मोसंबीची बाग, नर्सरी

काही काळ दुष्काळाचा येणारच याचा अंदाज बांधून आडूळ (जि. औरंगाबाद) येथील पिवळ बंधूंनी पाण्यासाठी विविध उपाय केले. प्रत्येक वर्षीच्या उत्पन्नातून निम्मी रक्‍कम शेतीसाठीच खर्ची घालण्याची सवय लावली. प्रसंगी पाणी विकत आणून ते बागेला दिले. मोसंबी बागेला रोपनिर्मितीची जोड देताना कुटुंबातल्या तिघा भावंडांनी शेतीचे पद्धतशीर नियोजन केले. संकटे येत राहिली पण मात करण्याची जिद्द तयार झाली.   पैठण तालुक्‍यातील आडूळ (जि. औरंगाबाद) येथील सुनील तुकाराम पिवळ व त्यांचे बंधू यांची शेती म्हणजे नियोजनबद्ध शेतीची झलकच आहे. त्यांची संयुक्त साडेदहा एकर शेती. पैकी साडेपाच एकर वडिलोपार्जीत. पाच एकर अलीकडील सात वर्षांत शेतीतील उत्पन्नातूनच घेतली. यंदाप्रमाणे अनेकवेळा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागलं. सन २००२ पूर्वी शेती पारंपरिक होती. पाच एकरांत कपाशी असायची. एकरी २० ते २२ क्‍विंटल उत्पादन काढण्याची किमया पिवळ कुटुंबीयांनी कष्ट व नियोजनातून साधली होती.  पाणीटंचाईने शिकवले  सन २०१२ मधील पाण्याच्या संकटानं अनेक बाबी शिकवल्या. दोन शेततळी, विहिरी, पाइपलाइनची सोय केली. सात ते आठ महिने विहिरी चालतात. उर्वरित चार महिने शेततळ्यातील व प्रसंगानुरून विकत पाणी घेऊन मोसंबीची बाग व रोपवाटिका जगविण्याचे प्रयत्न होतात. प्रत्येक वर्षी शेती उत्पन्नातील निम्मा पैसा पुढील वर्षासाठी गुंतवण्याची सवय ठेवली. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन ठेवला.  नर्सरीची जोड  मोसंबीच्या बागेला २००७-०८ मध्ये ‘नर्सरी’ची जोड दिली. आता हा व्यवसाय वृद्धिंगत होत आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत रोपे ‘बुकिंग’ करून नेली जातात. यंदा उत्पादन क्षमता ६० ते ७० हजार रोपांपर्यंत पोचली हे यश म्हणावे लागेल. सुमारे ३५ रुपये प्रतिरोप दर असतो. या व्यवसायातून समाधानकारक रक्कम हाती मिळते. नर्सरीची जबाबदारी बंधू रामेश्‍वर यांच्याकडे आहे. बी लावण्यापासून कलमा बांधणे, त्यांचे संगोपन करून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यापर्यंतचे काम ते पार पाडतात. दुसरीकडे मोसंबीच्या बागेची जबाबदारी सुनील व ज्ञानेश्‍वर पाहतात. फळबागेसाठी हिमायतबाग फळसंशोधन केंद्राचे डॉ. संजय पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते.  मोसंबी पीक नियोजन, व्यवस्थापन 

  • वर्ष लागवड  झाडांची संख्या 
  • २००२          ७०० 
  • २०१५-         ४०० 
  • २०१७-         २५० 
  • सन २००८- उत्पादन- ५० किलो प्रतिझाड 
  • २०१० मध्ये- ८० किलोपर्यंत. दोन वर्षांपासून एक ते दीड क्‍विंटलपर्यंत. 
  • पाण्याच्या शाश्‍वततेसाठी प्रयत्न मोसंबीची २००२ मध्ये लागवड करताना एक लाख ८० हजार रूपये खर्चून विहीर घेतली. जोड म्हणून २००५ मध्ये शेततळे घेतले. सन २०१२ मध्ये पाण्याची कमतरता जाणवली. त्या वेळी सात लाख रुपयांचे पाणी विकत आणले. सर्व प्रयत्नांतून दहा लाखांपर्यंत उत्पन्न हाती आले. असं संकट पुन्हा येऊ शकतं म्हणून २०१५ मध्ये अडूळ गावतलावाजवळ जागा घेऊन विहीर खोदली. तेथून पाच लाख रुपये खर्चून पाइपलाइन केली. त्याचवर्षी दीड एकरात शेततळे उभारले. त्यासाठी पाच लाख रुपये प्रतिएकरांप्रमाणे दोन एकर जमीन विकत घेतली. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी सारी शेती २००४ पासून ठिबकवर आणली.  दोन टॅंकरद्वारे पाणी  यंदा पावसाने सुरवात चांगली करून पुढे साथ सोडली. एरवी फेब्रुवारीनंतर घ्यावं लागणारं टॅंकरचं पाणी सप्टेंबरमध्येच सुरू करावं लागलं. दोन शेततळी आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला अन्‌ विहिरीला पाणी आलं की ते शेततळ्यात भरून ठेवण्याचं नियोजन असतं. पावसाळ्याच्या शेवटी शेततळे भरू असं कधी केलं जात नाही. परंतु यंदा पाऊसच अत्यल्प झाला. मोठे शेततळं जवळपास दहा फूट तर छोटं जेमतेम भरता आलं. आंबे बहार चांगला फुलला असतानाचं पाणी गेलं. लगडलेली मोसंबी मिळेल त्या दरात विकावी लागू नये म्हणून दोन टॅंकरने एक दिवसाआड बागेला पाणी दिलं. एक दिवसात सात ते आठ खेपा टॅंकरच्या कराव्या लागतात. दोन हजार रुपये प्रतिटॅंकर खर्च होतो. पण गेल्या महिन्यात ऑक्‍टोबरमध्ये आठ लाख रुपयांना मागितलेल्या बागेचा भाव नोव्हेंबरमध्ये अठरा लाख रुपयांपर्यंत वधारला. आज परिसरात आंबे बहार जवळपास कुणाकडे शिल्लक नाही. पुढे पाणी मिळेल की नाही या चिंतेने सारे बाग विकून बसले. त्यामुळे आता आपल्या मोसंबीला दर मिळेल याची खात्री सुनील यांना आहे.  शेतीकामे स्वत: करण्याला प्राधान्य  पाच एकर बागेला वर्षाकाठी किमान ५० ते ६० हजारांचे रासायनिक खत व दोन वर्षात एकदा दीड लाख रुपयांचे शेणखत वापरण्याचा नियम आहे. जवळपास आठ ते दहा फवारण्या, दोन खुरपण्या, मशागतीची कामे होतात. यासाठी अत्यंत गरज असेल तरच मजुरांचा वापर पिवळ बंधू करतात. शक्‍यतो तिघे भाऊ मिळूनचं सर्व कामे नियोजनपूर्वक करतात.    संपर्क- सुनील पिवळ-९७६३८३५२७२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com