शहापूर झाले १४० शेततळ्यांचे गाव

सोयाबीन पिकास तुषारद्वारे संरक्षित सिंचन.
सोयाबीन पिकास तुषारद्वारे संरक्षित सिंचन.

शहापूर (जि. नांदेड) गावाने जिल्ह्यात शेततळ्यांची सर्वप्रथम शंभरी पार केली आहे. आजमितीस १४० शेततळी गाव परिसरात पूर्ण झाली आहेत. खरिपाबरोबर रब्बी पिकांनाही त्यामुळे संरक्षित सिंचनाची सोय झाली. अनियमित पावसामुळे पीक उत्पादनात येणारी अनियमितता शेततळ्यामुळे संपली. किमान एक, दोन पाणी देऊन त्याआधारे उत्पादन व उत्पन्न घेऊन दुष्काळातही शेती सुकर करणे त्यांना शक्य झाले आहे.  खरीप तसेच रब्बी पिकांना संरक्षित सिंचनाची सोय निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने मागेल  त्याला शेततळे योजना सुरू केली. परंतु नांदेड जिल्ह्यात या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शेततळे म्हटले की नको नको म्हणून मागे हटणारे अनेकजण असतात. पण त्यास अपवाद ठरले ते देगलूर तालुक्यातील शहापूर हे गाव. हे गाव देगलूरपासून १५ किलोमीटरवर व तेलंगणा राज्याच्या सीमेजवळ आहे. गावात बहुतांश लोक मराठीसह तेलगू भाषेत बोलतात.  दुष्काळजन्य परिस्थिती 

  • देगलूर तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात येतो. सरासरी पाऊसमान ९०० मिलिमीटर. 
  • गेल्या पाच वर्षात पावसाने कधीच सरासरी गाठली नाही. 
  • सन २०१४ मध्ये फक्त ३३ टक्के तर २०१८ केवळ ३९ टक्के पाऊस. वितरणही असमान. 
  • शहापूर महसूल मंडळात तो सर्वाधिक ६४ टक्के पडला. पण पिकाच्या 
  • गरजेनुसार नव्हता. 
  • जून व जुलैत पावसाचे खंड ३२ दिवस होते. कहर म्हणजे २८ ऑगस्टनंतर पाऊसच पडला नाही. -या वेळी सोयाबीन फुलावर, शेंगा भरण्याच्या स्थितीत होते. याचवेळी पिकाला पावसाची जास्त गरज असते. या काळात पाऊस झाला नाही तर उत्पादनात प्रचंड घट येते. 
  • पथदर्शक प्रकल्प  संरक्षित सिंचनाची सोय नसल्याने हाती आलेले सोयाबीन अनेकदा गेले होते. यातून मार्ग काढण्यासाठी कृषी विभागाने २०१७ मध्ये शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व पटवून दिले. त्यातून १५ शेततळी तयार झाली. याही वर्षी सोयाबीन फुलात असताना पावसाने विश्रांती घेतली. या शेतकऱ्यांनी तुषारद्वारे सिंचन दिले. त्यांना सोयाबीनचा उतारा अन्य शेतकऱ्यांपेक्षा उत्तम आला. रब्बीतही हरभऱ्याला असेच सिंचन मिळाल्याने उतारा वाढला. त्यानंतर शेतकऱ्यांची शेततळ्याप्रती सकारात्मक वृत्ती वाढली. मागणी वाढल्याने जेसीबी यंत्रांच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात शेततळे खोदून मिळाले.  झालेली कामे 

  • शहापूर व लगतची गावे- मे २०१८ पर्यंत- १०० शेततळी पूर्ण 
  • यंदा आजमितीस- ४०, एकूण १४० 
  • देगलूर तालुक्यात मागील २४८ व यंदाची मिळून- सुमारे ३००. 
  • त्यात शहापूरचा वाटा जास्त. 
  • खरीप २०१८- सुमारे ४५० हेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचन 
  • झालेले फायदे 

  • खरिपासह रब्बी पिकांना संरक्षित सिंचन 
  • अनियमित पावसामुळे होणारी उत्पादनातील अनियमितता दूर 
  • गावच्या जमिनी काळ्या कसदार. शेतकरीही चांगले पीक उत्पादन घेण्यात प्रसिद्ध. 
  • गावात विहिरी नाहीत. केवळ बोअर्स. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे तेही बेभरवशाचे. त्यामुळे संरक्षित सिंचनाचा मोठा प्रश्न संपला. 
  • खरिपासह रब्बीला फायदा  शहापूर परिसरात मे पूर्वी पूर्ण झालेल्या शेततळ्यांचा फायदा २०१८ मधील खरीप, रब्बी पिकांना झाला. याचे कारण म्हणजे २८ ऑगस्टनंतर पाऊसच झाला नाही. या काळात फुले लागलेल्या, शेंगा भरत असलेल्या सोयाबीनला शेततळ्यातून तुषारने पाणी दिले. उडीद, मूग आदी पिकांनाही काहींनी पाणी दिले. सोयाबीननंतर रान तुषारने ओलावून घेऊन हरभऱ्याची पेरणी झाली. ज्यांच्याकडे शेततळे नाही त्यांना एकरी ६ ते ७ क्विंटल तर शेततळेधारकांना ९ ते १० क्विंटलपर्यंत सोयाबीनचे तर हरभऱ्याचे एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळाले.  शेतकऱ्यांचा सत्कार  नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गावातील पाण्याने भरलेल्या शेततळ्यांना भेटी देत  शेतकऱ्यांचा सत्कार केला. कृषी सहायक राहुबाई यन्नवार, कृषी पर्यवेक्षक एस के देवनाळे, मंडळ कृषी अधिकारी एम. बी. सोनकांबळे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, माजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांचाही गौरव झाला.  शेतकरी अनुभव  मी शेतकरी व एका पक्षाचा राजकीय कार्यकर्ताही आहे. सन २०१७ च्या उन्हाळ्यात २५ बाय २० बाय तीन मीटर आकाराचे शेततळे घेतले. त्यावर शेती तरली आहे. दोन बोअर्स आहेत. दोन्हीला मिळून एक इंचच पाणी आहे. त्याचे पाणी शेततळ्यात भरतो. यंदा ऑगस्टमध्ये दोन चांगले पाऊस झाले. त्यातून शेततळे भरले. त्यावर सुमारे २२ एकरांवर सिंचन केले. त्यातील १६ एकरांत सोयाबीन व तूर होती. हरभरा सात एकरांत होता. सोयाबीनचे एकरी ८ क्विंटल, तुरीचे पाच क्विंटल तर हरभऱ्याचे ८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. यंदा दुष्काळजन्य स्थिती आहे. गावातील शेततळ्यांना आता पाणी नाही. या स्थितीत मिळालेले उत्पादन चांगलेच म्हणायला हवे.  -बालाजी कनकंटे- ८८५७९८७५७० -  सन २०१८ मध्ये शेततळे पूर्ण केले. पाणीटंचाईत सहा एकर सोयाबीनला एक संरक्षित सिंचन देऊ शकलो. एकरी ८ क्विंटल उत्पादन मिळाले. अन्य शेतकऱ्यांना ३-४ क्विंटल उत्पादनावरच समाधान मानावे लागले. यंदा ऑगस्टअखेरीस पाऊस गायब झाला. जमिनीत अजिबात ओल नव्हती. त्यामुळे रब्बी पिके अनेकांना घेता आली नाहीत. मी मात्र तुषारने जमीन ओलावून चार एकर हरभरा व दोन एकर ज्वारी घेऊ शकलो. हरभरा व ज्वारीला तुषारने दोन पाणी दिले. हरभरा एकरी सात क्विंटल तर ज्वारी सहा क्विंटल झाली.  -तिरुपती रेड्डी कनकंटे (मो. ८४२१२११८७८) : -  संपर्क-   शिवाजी शिंदे – ९४०४६९२४९५  बालाजी कनकंटे – ८८५७९८७५७०  (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com