चाराप्रक्रियेमुळे जनावरांचे पचन सुधारून शरीरात जास्त प्रमाणात ऊर्जानिर्मिती होते. दूध उत्पादनात व दुधाच्या दर्जामध्ये (फॅट व एसएनएफमध्ये) चांगली वाढ होते. सध्याच्या परिस्थितीत वाळलेल्या चाऱ्यावर प्रक्रिया केल्यास चाऱ्याची बचत होऊन दुष्काळातही किफायतशीर दुग्ध व्यवसाय करणे शक्य आहे. प्रक्रियेचा वैरणीवर होणारा रासायनिक परिणाम
वाळलेल्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण फक्त २.५ ते ३ टक्के असते, तसेच तंतुमय अपचनीय पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते. अशी वैरण निकृष्ट असून, जनावरे आवडीने खात नाहीत. हे तंतुमय पदार्थ सेल्युलोज, हेमीसेल्युलोज व लिग्नीन यांच्या साखळ्यांपासून बनलेले असतात. युरियाप्रक्रिया केल्यावर युरियाचे रूपांतर अमोनिया वायूमध्ये होते. हा अमोनिया वायू सेल्युलोज, हेमीसेल्युलोज व लिग्नीन यांच्या साखळ्या तोडण्याचे काम करतो. त्यामुळे निकृष्ट चारा पचायला सोपा होतो व त्यातून अधिक पोषक घटक शरीराला मिळतात. चाऱ्यातील प्रथिनांचे प्रमाण ६ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढते. चाऱ्याची पाचकता वाढते. जनावरे वैरण आवडीने खातात. प्रक्रिया केलेली वैरण खाऊ घालण्याची पद्धत
वैरण जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी ढिगातून समोरील बाजूने आवश्यक तेवढी काढून घ्यावी व ढीग परत आहे, तसा दाब देऊन झाकून ठेवावा. वैरण अर्धा एक तास पसरवून ठेवावी जेणेकरून त्यातील अमोनिया वायूचा वास निघून जाईल. प्रक्रिया केलेल्या चाऱ्याची चव पसंद न पडल्यास काही जनावरे सुरवातीस खाणार नाहीत तेव्हा साध्या वैरणीत मिसळून थोडे थोडे खावू घालून सवय लावावी व हळूहळू वैरणीचे प्रमाण वाढवावे. प्रक्रिया केलेली वैरण वयाने सहा महिन्यांच्या पुढील जनावरांना खावू घालता येते. प्रक्रिया केलेली वैरण वापरण्याचे फायदे १) चाऱ्यावरील खर्चात बचत – एका मोठ्या जनावरास दिवसात ३ ते ४ किलो वाळलेला चारा आवश्यक असतो. त्यामुळे वाया जाणाऱ्या निकृष्ट चाऱ्यातून हा पौष्टिक चारा जनावरांना मिळाल्याने कडब्यावरील खर्चात बचत होते. २) दूध उत्पादनात वाढ – प्रक्रिया केलेले काड तुलनेने जास्त पौष्टिक असते, त्यात ८ ते ९ टक्के प्रथिने, तर ५०-६० टक्क्यांपर्यंत पचनीय पदार्थ असतात. यामुळे जनावारचे दूध वाढण्यास मदत होते व दुधातील फॅट व एसएनएफसुद्धा वाढते. निकृष्ट चारा सकस करण्यासाठी एन्झाईम प्रक्रिया
जनावराला उभे राहण्यासाठी, चालण्यासाठी शरीरामध्ये हाडांची भूमिका खूप महत्त्वाची असते. वनस्पतीमध्ये वाऱ्यापासून व इतर संकटात टिकाव धरून उभे राहण्यासाठी तंतुमय पदार्थाची महत्त्वाची भूमिका आहे. वनस्पतीच्या पेशीभोवती पेशीभित्तिका असते. यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात. त्यामुळे चाऱ्याचे योग्य पचन होत नाही. तंतुमय पदार्थामध्ये सेल्युलोज, हेमी सेल्युलोज व लिग्नीन असते. लिग्नीनच्या बंधामुळे सेल्युलोज व हेमी सेल्युलोज हे एकमेकांमध्ये लिग्नीन बरोबर गुंडाळून ठेवलेले असतात. त्यामुळे चाऱ्यातील तंतुमय पदार्थाचे रुमिनोकोकस जीवाणू, प्रोटोझुआ व इतर अतिसुक्ष्म जीवांकडून पुर्णपणे पचन होत नाही त्यामुळे जनावरांच्या शेणामध्ये न पचलेल्या चाऱ्याचे तुकडे दिसतात. वाळलेल्या चाऱ्यामधील साधारणपणे बहुतांश सेल्युलोज व हेमी सेल्युलोजचे पचन लिग्नीनच्या बंधामुळे होत नाही. लिग्नीनचे प्रमाण चारा पचनात अडथळा निर्माण करतात. लिग्नीनच्या बंधाचे तुकडे होऊ लिबरोबरचे बंध ढिले कमजोर करून लिग्नीननचे हेमी सेल्युलोज व हेमी सेल्युलोजचे रूपांतर मोनोसॅकॅराईडमध्ये होते. पचनक्रियेमध्ये मोनोसॅकॅराईडचे ग्लुकोजमध्ये व ग्लुकोजचे ग्लायकोलायसीस होऊन शरीरात ऊर्जा तयार होते. चाऱ्यामध्ये असणाऱ्या लिग्नीनचे तुकडे करण्यासाठी अथवा त्यांचे बंध कमजोर करणेसाठी विविध प्रयोग सुरू आहेत. जसे की जनावरांच्या पोटात असणाऱ्या जीवाणूच्या जीन मध्ये बदल करणे, चाऱ्यावर रसायनांचा / एन्झाईमचा वापर करणे, चाऱ्यावर जैविक प्रक्रिया करणे इ. तसेच लिग्नीनचे प्रमाण कमी असणाऱ्या चाऱ्याची निर्मिती करणे सुरू आहे. एन्झाइम प्रक्रियेचा प्रतिजनावर प्रतिदिन खर्च केवळ रु. ३ ते ४ पर्यंत येतो. एन्झाईमचा वापर करण्याची पद्धत
झायलॅनेज, ब्लुटानायलेज, सेल्युलेज इ. एन्झाईमचा वापर चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. अनेक कंपनींचे एन्झाईम बाजारात मध्ये मिळतात. काही कंपन्यांच्या संशोधनातून बनविलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार एन्झाईम सोल्युशन पाण्यामध्ये मिसळावे. चाऱ्याची कुट्टी करून हे मिश्रण स्प्रे पंपाच्या साहाय्याने भरपूर फवारावे. नंतर अर्धा ते १ तास चाऱ्यावर प्रक्रिया होऊ द्यावी व तो चारा जनावरांना द्यावा. याहीपेक्षा चांगल्या प्रकारची प्रक्रिया होण्यासाठी हिरवा/वाळलेला चाऱ्याची कुट्टी, बगॅसेस, गव्हाचा कोंडा, सोयाबीन/तूर इ.चा भुसा/कुटार तयार केलेल्या मिश्रणात अर्धा तास भिजवावे व नंतर जनावरांना द्यावे. खाद्यामध्ये खाण्याचा सोडा थोड्या प्रमाणात वापरल्यास रुमेन चा सामू योग्य राहून प्रक्रिया अधिक योग्य प्रकारे होते व कोणत्याही चाऱ्याची / पशुखाद्याची पाचनीयता २०-४५ टक्क्यांपर्यंत वाढविता येते व उपलब्ध चाऱ्यातील अधिक पौष्टिक मूल्ये जनावरांच्या रक्तापर्यंत पोचविता येतात, असे संशोधन सांगते. टीप ः एन्झाईम प्रक्रिया पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी. संपर्क ः डॉ. सचिन रहाणे, ७०३८५३५१८१ (पशुधन विकास अधिकारी तथा सदस्य चारा साक्षरता अभियान, समन्वय समिती, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन)