वाढ्यातील आॅक्झलेट या घटकामुळे जनावराच्या शरीरात उपलब्ध कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे दूध उत्पादन व जनावराच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. वाढ्याचा मुरघास केला, तर वाढ्यातील आॅक्झलेटचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना ताजे व आहे असेच वाढे खायला देण्यापेक्षा वाढ्याचा मुरघास केला, तर अधिक फायदेशीर ठरेल. जनावरांचा आहारावरील खर्च कमी करायचा असेल, तर पशुखाद्य कमी करून हिरव्या चाऱ्याच्या वापरावर भर देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड यांच्या अभ्यासानुसार जनावरास १ किलो प्रथिनयुक्त आहार द्यावयाचा असेल, तर त्यावर पशुखाद्याच्या माध्यमातून ९४.४४ रुपये खर्च होतो, तर द्विदल हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून ५५.५५ रुपये खर्च होतो. १ किलो एकूण पचनीय आहार जर जनावराला द्यायचा असेल, तर पशुखाद्याच्या माध्यमातून २६.९८ रुपये खर्च होतो, तर हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून ११.६० रुपये खर्च होतो. म्हणजे १ किलो प्रथिने हिरव्या चाऱ्यातून दिले, तर ४१.१८ टक्के बचत होते, तर १ किलो एकून पचनीय आहार हिरव्या चाऱ्याच्या माध्यमातून दिला, तर ४२.९९ टक्के बचत होते. याचा विचार केला, तर दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी कायम पशुखाद्य कमी ठेवून हिरव्या चाऱ्यावर अधिक भर देणे फायद्याचे आहे. हिरव्या व सुक्या चाऱ्याची मागणी व पुरवठा हिरवा चारा देणे जरी आवश्यक असले, तरी एकूण चाऱ्यापैकी हिरव्या चाऱ्याची ६३ टक्के, तर सुक्या चाऱ्याची २३ टक्के कमतरता आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचे स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. अन्नधान्याची पिके घेत असताना किंवा औद्योगिकीकरणामधून जे वाया जाणारे घटक आहेत, त्यांचा जनावरांच्या आहारात वापर करणे आवश्यक आहे. यामध्ये सहज उपलब्ध होणारे धान्य पिकांचे अवशेष, ऊस व त्यापासून मिळणारे वाढ्याचा वापर करता येऊ शकतो. उसाचे वाढे
ज्या भागात उसाचे उत्पन्न घेतले जाते, अशा भागात जनावरांच्या आहारात ऊस व उसाच्या वाढ्याचे प्रमाण जास्त आहे. काही व्यावसायिक पशुपालक फक्त जनावरांसाठी मका व इतर चारा पिकांची लागवड करतात. तसेच उसाच्या कापणीच्या वेळी फार मोठ्या प्रमाणावर उसाचे वाढे एकाच कालावधीत जास्त उपलब्ध असते. उसाचे वाढे जास्त प्रमाणात दिल्यामुळे वाढ्यातील आॅक्झलेटचे दूरगामी परिणाम जनावरांची उत्पादन क्षमता, आरोग्य व प्रजनन क्षमतेवर होत असतो. त्यामुळे ऊस व उसाचे वाढे हे जनावराचे अन्न नाहीच, परंतु हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे अशा पदार्थांचा जनावरांच्या आहारात समावेश करावा लागतो. वाढे एकाच कालावधीत जास्त प्रमाणात उपलब्ध होते, कारण उसाची कापणी ही ठराविक कालावधीतच होत असते. त्यामुळे अशा प्रकारे एकदम उपलब्ध झालेला चारा वापरला जात नसल्यामुळे एकतर कमी दरात विकावा लागतो किंवा चारा वाळवून साठवून ठेवावा लागतो. उसाचे वाढे जर वाळवले, तर त्यातील अन्नघटकांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होते. त्यातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे एकदम उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याचा मुरघास करून वर्षभर व्यवस्थितपणे साठवून ठेवता येतो. मुरघास अधिक चांगला होण्यासाठी
वाढयामध्ये अन्नघटकांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. त्यामुळे मुरघासाची पौष्टिकता वाढविण्यासाठी वाढयात आवश्यक असलेल्या अन्नघटकांसोबतच त्यामध्ये काही घटक समाविष्ट करता येतात. यामध्ये साधा मुरघास, मळी समाविष्ट करून आणि मळी व युरिया समाविष्ट करून तयार केलेल्या मुरघासाचा समावेश होतो. साधा मुरघास करताना उपलब्ध वाढ्यातील पाण्याचे प्रमाण तपासावे. सुरुवातीला वाढ्यातील पाण्याचे प्रमाण हे ८० ते ८५ टक्के असते. दुसऱ्या दिवशी हे प्रमाण ७० टक्क्यांर्यंत असते. मुरघास चांगला होण्यासाठी चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण ६५ टक्के ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे आज आणलेले वाढे दुसऱ्या दिवशी मुरघास तयार करण्यासाठी वापरावे. हिरव्या वाढ्याची साठवण उपलब्ध वाढे व्यवस्थित उभे करून ठेवावे. वाढे एकावर एक टाकले, तर त्यामधील ऊर्जा कमी होते व बुरशीचे प्रमाण वाढून चाऱ्यात अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे मुरघासाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. वाढ्याचा मुरघास
उपलब्ध वाढ्याची कुट्टी यंत्राने कुट्टी करून घ्यावी. कुट्टी जास्त लहान केली, तर मुरघास करताना चारा व्यवस्थित दाबता येतो; परंतु जनावरांना रवंथ करण्यासाठी अडचण होऊ शकते. कुट्टीचा आकार जास्त मोठा झाला, तर मुरघास करताना आवश्यक त्या प्रमाणात चारा हवामुक्त करता येणार नाही. त्यासाठी वाढ्याची सर्वसाधारणपणे पाउण ते सव्वा इंच लांबीची कुट्टी करून मुरघास करावा. अशा वाढ्याच्या कुट्टीपासून लहान पिशवी, मोठी पिशवी, जंबो पिशवी, पिट, खड्ड्यातील मुरघास, बरेल मुरघास, जमिनीवरील मुरघास अशा विविध प्रकारे मुरघास करता येतो. कुट्टी झाल्यानंतर पिशवीत किंवा खड्ड्यामध्ये प्लॅस्टिक कागद अंथरूण झाल्यानंतर त्यावर हिरवा चारा थरावर थर दाबून भरावा. एक थर झाल्यानंतर व्यवस्थितपणे जास्तीत जास्त हवा बाहेर काढण्यासाठी पिशवीत असेल, तर माणसाच्या साहाय्याने किंवा मोठ्या खड्ड्यामध्ये असेल, तर ट्रेक्टरच्या साहाय्याने दाबावा. मुरघास मिश्रण टाकावयाचे असेल, तर चाऱ्याच्या वजनाच्या प्रमाणात मिश्रण टाकावे. पावडर किंवा द्रव पदार्थ कमी प्रमाणात टाकावयाचा असेल, तर सर्वसाधारणपणे १० ते १२ किलो कुट्टी घेऊन त्यात असे मिश्रण टाकावे व चारा हलवून टाकलेले मिश्रण व्यवस्थितपणे सर्व ठिकाणी एकसारखे मिसळले असेल, तर असा मिश्र चारा त्या थरावर टाकावा. त्यामुळे मिश्रण सर्व भागांत एकसारख्या प्रमाणात पसरण्यास मदत होते. असे थरावर थर पूर्ण झाल्यानंतर प्लॅस्टिकचा कागद हवाबंद होईल, या पद्धतीने बंद करून घ्यावा व त्यावर वजन ठेवावे. मरघास हवाबंद स्थितीत ४५ दिवस ठेवून त्यानंतर गरजेप्रमाणे जनावरांना खाऊ घालावा. मिश्रणे यामध्ये मुरघासाची गुणवत्ता अधिक चांगली होण्यासाठी आवश्यक किण्वन प्रक्रिया वाढविणारी मिश्रणे व अन्नघटकांची वाढ करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मिश्रणांचा समावेश होतो. उदा. मळी, युरिया व किण्वन प्रक्रिया वाढविणारे जिवाणू मुरघासाचे फायदे
ऊस कापणीदरम्यान एकदम जास्त उपलब्ध होणारे वाढे एक दोन दिवस वापरता येत नाही, त्यामुळे वाढे वाळल्यामुळे त्यातील अन्नघटक व खाण्यातील गोडी कमी होते. त्यामुळे मुरघासाच्या माध्यमातून हा चारा साठवून गरजेनुसार वापरता येतो. मुरघासातील किण्वन प्रक्रियेमुळे उसाच्या वाढयातील कर्बोदके आणि पचनीय क्षमता वाढते, प्रथिने जास्त प्रमाणात उपलब्ध होतात. मुरघास केल्यामुळे वाढ्याची चव, गोडी वाढते व जनावरे आवडीने खातात. वाढ्यामध्ये उपलब्ध असणारे आॅक्झलेटचे प्रमाण मुरघासात कमी होते व त्यामुळे होणारे अपाय टाळले जातात. वाढ्याची गुणवत्ता बाह्य मिश्रणे टाकून वाढवता येते. यामध्ये मळी युरिया इ. पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता सुधारते. चाऱ्याची जिवाणूंच्या मदतीने किण्वनप्रक्रिया होते. त्यामुळे जनावराच्या पोटातील पचन चांगले होण्यास मदत होते. डॉ. एस. पी. गायकवाड, ०२१६६-२२१३०२ (लेखक गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस्, फलटण, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)