मा गील एक दोन दिवसांत झालेल्या पावसानंतर उद्यापासून सर्वच द्राक्ष विभागामध्ये बऱ्यापैकी उघडीप मिळेल. अधूनमधून वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी जास्त उष्णता असेल अशा ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण होणार नाही अशा ठिकाणी पुढील काही दिवस पहाटेचे तापमान कमी झाल्यामुळे आर्द्रता वाढेल तसेच पानावर ओलसरपणा उशिरापर्यंत राहील. अशा वातावरणामध्ये बऱ्याच द्राक्ष विभागामध्ये खाली दिलेल्या उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक ठरणार आहे.
ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे; परंतु अजूनही जमिनीमध्ये ओलसरपणा आहे, त्या ठिकाणी डाउनी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यकता आहे. सर्वच विभागातील बागा ३५ ते ४० दिवसांच्यापुढे आहेत. या बागांमध्ये फुलोऱ्यास सुरवात झालेली असेल किंवा फुलोरा पन्नास टक्यांमध्ये असेल. अशा बागांच्यामध्ये डाउनीच्या नियंत्रणासाठी फोसेटील ए एल किंवा पोटॅशिअम सॉल्ट आॅफ फॉस्फरस ॲसिड ३ ते ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी आणि २ ग्रॅम मॅंकोझेब टॅंकमिक्स करून फवारावे. या फवारणीने जास्त आर्द्रता असतानासुद्धा फॉस्फाइट आंतरप्रवाही होते. त्यामुळे रोग नियंत्रण चांगले मिळू शकते. ज्या बागांच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात साठले आहे, अशा ठिकाणी पांढऱ्या मुळ्यांची वाढ काही काळ थांबू शकते किंवा नत्राचे शोषण जास्त होईल. अशा परिस्थितीमध्ये पोटॅश फवारणीतून दिल्याने नायट्रेट नत्र नियंत्रणात राहाते. त्यामुळे फुटींची जास्त वाढ होणे व घड कुजणे इत्यादी प्रकार कमी होतात. या दृष्टिकोनातून पोटॅशियम सॉल्ट आॅफ फॉस्फरस ॲसिड फवारल्यास जास्त फायद्याचे आहे. कारण यामध्ये ३४ टक्के पोटॅश आहे. यामुळे पोटॅश फवारणी आणि रोग नियंत्रण करणे शक्य होईल. ढगाळ वातारण नसल्यास सकाळचे दव जास्त पडून पान उशिरापर्यंत ओले राहाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये डाउनीचा नवा प्रादुर्भाव वाढू शकतो. ज्या बागांच्यामध्ये जुन्या डाउनीचा प्रादुर्भाव आहे किंवा जवळपासच्या बागेत डाउनीचा प्रादुर्भाव दिसत आहे, अशा बागांच्यामध्ये पुढील ३ ते ४ दिवसांनी पुन्हा डाउनी नियंत्रणासाठी पुन्हा फवारणी घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी वर नमूद केलेली फोसेटील ए एल किंवा पोटॅशिअम सॉल्ट आॅफ फॉस्फरस ॲसिडची फवारणी पुन्हा घ्यावी किंवा सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशकाची ३ ते ३.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. छाटणीनंतरच्या ३५ ते ४० दिवसांनंतर वर नमूद केलेल्या दोन बुरशीनाशकांचा वापर ‘झिरो रेसिड्यू द्राक्ष उत्पादन' तंत्रज्ञानाप्रमाणे वापरणे शक्य आहे. अन्य बुरशीनाशकांचा डाउनी नियंत्रणासाठी उपयोग केल्यास त्याचे उर्वरित अंश काढणीपर्यंत ‘एमआरएल’पेक्षा कमी राहिले तरीही निश्चितपणे तपासणीमध्ये सापडू शकतात. सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब या संयुक्त बुरशीनाशकाचा वापर यापूर्वी झालेला नसल्यास ५५ ते ६० दिवसांपर्यंत वापरणे शक्य आहे. त्यामध्ये उर्वरित अंश राहाणार नाहीत. भुरीच्या प्रादुर्भावाची शक्यता ः ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त वेळ असल्यास अशा ठिकाणी दुपारचे तापमान कमी राहील तर रात्रीचे तापमान अपेक्षापेक्षा जास्त राहाण्याची शक्यता असेल. बागेत रात्रीचे तापमान जास्त राहिल्यास पहाटे किंवा सकाळी दव कमी पडते. सकाळी कमी पडणारे दव व दुपारचे ढगाळ वातावरणातील प्रकाशाची कमी तीव्रता या दोन्ही गोष्टी भुरीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल असतात. असे वातावरण ज्या विभागात राहील ठिकाणी डाउनीच्या नियंत्रणासाठी वर नमूद केलेल्या पहिल्या फवारणीनंतर लगेच भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी घेणे आवश्यक आहे. भुरीच्या नियंत्रणासाठी ३५ ते ५५ दिवसांपर्यंत ट्रायअझोल वर्गातील (हेक्झाकोनॅझोल १ मि.लि.प्रतिलिटर पाणी किंवा मायक्लोब्युटॅनील ०.४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा डायफेनकोनॅझोल ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी किंवा टेट्राकोनॅझोल ०.७५ मि.लि. प्रतिलिटर) किंवा एसडीएचआय ( मेट्राफेनॉन ०.२५ मि.लि.प्रतिलिटर पाणी किंवा फ्लुओपायरम अधिक टेब्युकोनॅझोल ०.५६३ मि.लि. प्रतिलिटर पाणी ) गटातील बुरशीनाशके भुरीच्या नियंत्रणासाठी वापरणे शक्य आहे. झिरो रेसिड्यू द्राक्ष उत्पादन तंत्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या सर्व बुरशीनाशकांचा वापर ५५ दिवसांनंतर एकदा जरी केल्यास काढणीच्यावेळी या बुरशीनाशकांचे उर्वरित अंश एमआरएल्सपेक्षा कमी पण निश्चितपणे सापडतात. सर्वच ठिकाणी कमी जास्त पाऊस पडलेला असल्यामुळे वातावरणामध्ये बऱ्याच प्रमाणात आर्द्रता आहे. अशा आर्द्रतेमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी जैविक नियंत्रणाचा वापर यशस्वीरित्या करता येतो. त्यासाठी ॲंपिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीजन्य घटकांची ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी; परंतु या बागेमध्ये ट्राय अझोल किंवा एसडीएचआय गटातील बुरशीनाशकांची फवारणी केली असल्यास या बुरशीनाशकांच्यामुळे जैविक नियंत्रणासाठी वापरलेली बुरशी (३ ते ४ पीपीएम प्रमाण) कार्यरत राहात नाही. त्यामुळे जैविक नियंत्रण यशस्वी होत नाही. याउलट सल्फर दीड ते दोन ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारल्यास भुरीचे चांगले नियंत्रण मिळू शकते. त्याचबरोबरीने सल्फरची मात्रा जरी १०,००० पीपीएमपर्यंत वाढल्यास ट्रायकोडर्मासारखी जैविक नियंत्रणासाठी वापरलेली बुरशी संपूर्णपणे नष्ट होत नाही. जैविक नियंत्रण यशस्वी करणे सल्फर फवारणीनंतरही साध्य होऊ शकते. या दृष्टिकोनातून विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीमध्ये सल्फर फवारणी करून पाठोपाठ ॲंपिलोमायसीस किंवा ट्रायकोडर्मा फवारल्यास दोन्ही पद्धतीने (रासायनिक आणि जैविक) भुरीचे नियंत्रण यशस्वी होते. याचा विचार करता द्राक्ष बागायतदारांनी ट्रायअझोल गटातील बुरशीनाशक वापरायचे किंवा सल्फर अधिक जैविक नियंत्रण वापरायचे हे स्वतःच्या बागेतील वातावरण पाहून योग्य निर्णय घ्यावा. ०२० -२६९५६००१ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)