पोळ्यातील राणीमाशीने अंडी दिल्यानंतर त्यातून अळ्या बाहेर पडतात. अळ्यांचे रूपांतर मग कोषामध्ये होते अाणि काही दिवसानंतर त्यातून मधमाशा बाहेर पडतात. एकदा अंडी दिल्यानंतर राणीमाशीचा मधमाश्यांच्या वाढीमध्ये कोणताच सहभाग नसतो.
नवजात मधमाश्या स्वतःच कोशातून बाहेर पडतात. नवीन जन्मलेली माशी कोशातून बाहेर अाल्या अाल्या तो कोष प्रथम स्वच्छ करते. हे तिचे प्रथम काम असते. हे काम ती मधमाशी पुढील तीन दिवस करत राहते. पोळ्यावरील इतर घरेही मधमाशी स्वच्छ करते. पुढील तीन दिवसांत ती थोडी मोठी झाल्याने तिचे कामाचे स्वरूप बदलते. ही मधमाशी अाता मोठ्या अळ्यांना अाणि लहान अळ्यांना खाद्याचा पुरवठा करते. नवजात मधमाशीचे हळूहळू तरुण अवस्थेकडे रूपांतर होण्यास सुरवात झाली असल्यामुळे कामाचे स्वरूप बदलते. राणीमाशीचे निरीक्षण केले असता अापल्याला तिच्या भोवती सतत ७ ते ८ मधमाश्यांचे संरक्षण कडे दिसते. राणीमाशीला खाद्याचा पुरवठा करणे अाणि राणीमाशीचे संरक्षण करण्याचे काम या वयातील कामकरी माशा करत असतात. या वयात येईपर्यंत कामकरी मधमाश्यांच्या शरीररचनेत अजून काही बदल झालेला असतो. कामकरी मधमाश्यांच्या पोटाखाली मेण ग्रंथीतून मेणनिर्मिती करण्यासाठी माश्यांचे शरीर तयार झालेले असते. पुढील ६ दिवस या वयातील मधमाश्या स्वतःच्या शरीरातून मेण ग्रंथीची निर्मिती करून त्याचे पोळे बांधण्याचे काम करत असतात. तसेच वसाहतीतील अंतर्गत खाद्याची वाहतूक करण्याचे काम करत असतात. प्रत्यक्ष मकरंद गोळा करण्यास सुरवात
तरुण वयापर्यंत कामकरी मधमाश्या वसाहत सोडून जात नाहीत. जेव्हा वसाहतीबाहेर पडण्याची वेळ येते त्या वेळी एकदम बाहेर न जाता या माश्या सुरवातीला पोळ्याच्या प्रवेशद्वारावर थांबून हवामानाचा अंदाज घेण्याचे अाणि वसाहतीचे संरक्षण करण्याचे काम करतात. दोन ते तीन दिवस हे काम केल्यानंतर मधमाशी मोकळ्या वातावरणात बाहेर पडते. फुलातील मकरंद अाणि पराग गोळा करून पोळ्यामध्ये भरणे, पाणी अाणने अाणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कळत नकळत परागीभवनाची प्रक्रिया पार पाडणे इ. कामे करणे सुरू होते. मधमाश्यांचे हे काम दिवसभर चालूच राहते. जास्त फुललेल्या फुलांतून मकरंद अाणि परागकण गोळा करायला मधमाश्या प्राधान्य देतात. मधमाश्या साधारणतः १० ते २० किलोमीटर प्रतिताशी वेगाने अंतर कापतात. पेटीतून फुलाकडे अाणि फुलाकडून पेटीकडे येण्यासाठी मधमाशीला साधारणतः ५ ते १० मिनिटे वेळ लागतो. एका वेळेस मधमाशी एका फेरीत कमीत कमी १० ते जास्तीत जास्त १०० फुलांना भेटी देते. फुलांना भेटी देत असताना मकरंद किंवा पराग परिपक्व झाला अाहे किंवा नाही याची तपासणी केली जाते, अाणि मगच तो संकलित केला जातो. मधमाशी अापल्या सोंडेने मकरंदाची गुणवत्ता तपासते. योग्य परिपक्वतेचा मकरंद (साखरेचे प्रमाण २० टक्के) फुलातून गोळा केला जातो. मधमाशी एकावेळी फुलातून सुमारे २० ते ३० मिलिग्रॅम मकरंद घेऊन येते. मधमाश्या सतत मकरंद गोळा करत असतात. दिवसा कच्चा माल गोळा करणे परागीभवन घडवून अाणणे अाणि रात्री आणलेल्या कच्च्या मालापासून मधनिर्मिती करणे हा नित्यक्रम चालूच असतो.