भारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा अभ्यास करणाऱ्या एका रसायनशास्त्र संशोधन संस्थेच्या अहवालानुसार शीतपेयांमध्ये शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या अनेक अपायकारक रासायनिक गोष्टी असतात. (उदा. कीटकनाशक अंश, अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी नसलेले रंग, आम्ल व गोडी वाढविणारे पदार्थ). शीतपेयातील घटक
सर्वच शीतपेयांमध्ये सायट्रिक आणि फॉस्फोरिक आम्ल मोठ्या प्रमाणात असतात. त्यांच्या कमी अधिक प्रमाणामुळे ती आंबट लागतात. कुठल्याही रासायनिक पदार्थाची आम्लता ठरवणाऱ्या सामूचा विचार केला, तर या पेयांची आम्लता एक ते तीन एवढी जास्त प्रमाणात असते. विविध शीतपेयांमध्ये गोडी वाढविण्यासाठी ग्लुकोज, सुक्रोज, सुक्रलोस आणि सॅक्रीन इ. विविध प्रकारच्या साखरेचा वापर केला जातो. साधारणतः ३०० मि.ली. शीतपेयामध्ये सुमारे ३५ ग्रॅम म्हणजे आठ-नऊ चमचे साखर असते. शीतपेयाचे अारोग्यावर होणारे दुष्परिणाम
शीतपेयांच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा विचार केला असता शीतपेयांचे सेवन कधीतरी करणे ठीक आहे; परंतु रोजच त्याचं सेवन केल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शीतपेयाचे अधिकचे सेवन मानवी शरीरातील पचनसंस्थेतीसंबंधी तक्रारी निर्माण करतात. शीतपेयातील आम्लांमुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन हाडं ठिसूळ बनत जातात. त्यामुळे कंबर, पाठ, हातपाय दुखणं असे त्रास कमी वयात होऊ शकतात. त्याशिवाय या आम्लांमुळे दातांवर परिणाम होऊन ते कमकुवत बनतात आणि लवकर निकामी होतात. तज्ज्ञांच्या मते शीतपेयाच्या प्रत्येक घोटानं दातांच्या आवरणाची किमान दोन टक्के झीज होऊ शकते. अस्थमा, तरुण स्त्रियांमधील पीसीओएस हा विकार, वंध्यत्व, तसंच फॉस्फोरिक अॅसिडमुळे मूत्रपिंडांवर परिणाम होणं असे विकार उद्भवू शकतात. शीतपेयाची एक बाटली पिली असता १४० ते १५० एवढ्या कॅलरी पोटात जातात. वाढलेल्या कॅलरी वजनवाढीला व मधुमेहाला आमंत्रण देऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पत्रकानुसार शाळकरी आणि तरुण वयातील मुलामुलींच्या अतिरिक्त वजनवाढीचं शीतपेय हे प्रमुख कारण आहे. निरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रस नियमित सेवन करावा. फळांचा रस शक्यतो घरीच बनवण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय नारळ पाणी, उसाचा रस यासारख्या आरोग्यदायी पेयांचा वापर करणे चांगले आहे. ज्यूस बनविण्यासाठी हंगामानुसार मिळणाऱ्या ताज्या फळांचा वापर करावा. रसामध्ये कृत्रिम रंग वापरू नये. संपर्क ः डॉ. अमोल खापरे ः ८०५५२२६४६४ (एमआयटी, अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद)