जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम सोय करीत विविध फळबागा, आंतरपिके, खरीप-रब्बी पिके अशी विविधता ठेवत कौटुंबिक अर्थकारण शाश्वत करण्याचा प्रयत्न केला. औरंगाबाद जिल्ह्यातील जयपूर हे सुमारे अडीचशे उंबऱ्याचं गाव. येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंची छत्तीस एकर शेती आहे. पैकी गावच्या दक्षीण भागात असलेल्या डोंगरावर साडेबारा एकर शेती आहे. सन २०११ पर्यंत माळरानावरील शेती खरिपाचीच होती. माळाच्या खालील शिवारात खरिपासह रब्बी हंगामही घेतला जायचा. सन १९९९ मध्ये या कुटुंबाने जवळपास दोन किलोमीटरवरील लाहुकी प्रकल्पाच्या शिवारातील स्वमालकीच्या शेतातून पाइपलाइन आणली. सन २००६-०७ मध्ये दुसरी व २०१०-११ मध्ये माळावरील साडेबारा एकरांसाठी तिसरी पाइपलाइन आणली. सिंचनासह पीकपद्धतीत बदल सिंचन मजबूत करताना पीकपद्धतीतही बदल केला. शेती उत्पादनातून मिळालेले उत्पन्न शेतीच्या विकासासाठीच वापरण्याचे तत्त्व अंगीकारल्याने आजवरची प्रगती शक्य झाल्याचे मते बंधू सांगतात. सर्वांत मोठे बंधू राजू शिक्षक अाहेत. मात्र शेतीची जबाबदारीही तेवढ्याच जबाबदारीने सांभाळतात. सारे कुटुंबच शेतीत कायम व्यस्त असते. पडीक वीस ते बावीस एकर क्षेत्रालाही वहीत करण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. पाण्याची अवघड वाट सन २०१०-११ मध्ये माळरानावरील शेतात सिंचन करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी एवढ्या उंचीवर पाणी नेणे कसे शक्य होईल, याची चाचपणी करण्यात आली. जाणकारांच्या मार्गदर्शनातून घरालगतच्या ८० फूट खोल विहिरीच्या तळातून थेट सव्वाचारशे फूट उंचीवरील डोंगरावरील शेतीत पाणी नेणे त्यामुळे शक्य झाले. लाहुकी प्रकल्प शिवारातील शेतातील विहिरीतून पाणी गावालगतच्या शेतातील विहिरीत अन् तेथून सुमारे सहाहजार फूट अंतरावरील थेट ४२० फूट उंचीच्या माळावरच्या शेतात पोचविले. त्यासाठी २० एचपी क्षमतेचा मोटरपंप व चार प्रेशर व्हॉल्व्हचा वापर केला. माळावर शेततळे माळावर पाइपलाइनद्वारे पाण्याची सोय केली, तरी स्वस्थ न बसता तिथे सामूहिक शेततळे बांधले. त्यातून पाण्याची आणखी सोय झाली. पावसाळ्यात शेततळे भरून ठेवले जाते. त्याचा वापर दरवर्षी मार्च ते जूनपर्यंत होतो. पीकपद्धती (क्षेत्र एकर व सुमारे)
मते यांच्या शेतीची वैशिष्ट्ये
खरीप व रब्बीचा कांदा १९९८ ते २०१५ पर्यंत उन्हाळी कांदा घेणारे मते आता डाळिंब व सीताफळात खरीप व रब्बीचा कांदा (दीड ते दोन एकर) घेतात. एकरी १०० ते ११० क्विंटल उत्पादकता आहे. कांदा बीजोत्पादन रब्बीत केले जाते. उत्पादन व उत्पन्न डाळिंबाचे २०१० पासून उत्पादन सुरू आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा मोसंबीचे उत्पादन मिळाले. पावणेदोन लाख रुपये मिळाले. गेल्या वर्षी पहिल्यांदाच घेतलेल्या द्राक्षाला प्रतिकिलो ३० रुपये दर जागेवरच मिळाला. कपाशी दरवर्षी एकूण क्षेत्रात ९० क्विंटल, तूर ४० ते ४५ क्विंटल, मका १०० ते १२५ क्विंटल, ऊस एकरी ३२ टन, सोयाबीन एकरी ८ क्विंटल, बाजरी एकरी ८ ते १० क्विंटल, रब्बी ज्वारी एकरी १२ क्विंटल तर गव्हाचे एकरी १५ क्विंटल उत्पादन मिळते. राजू दौलतराव मते - ९४२३७४३२२४ बाबासाहेब मते - ९४२१९७९६०७ भाऊसाहेब मते - ७०८३५०१४०७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.