बॅंकेत खाते असणे गरजेचे...

 बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी....
बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी....

ग्रामीण भागात जर कोणाला विचारले की, ‘बँक म्हणजे काय?’ तर साधारणपणे लोकं उत्तर देताकी, ‘बँक म्हणजे पैसे मिळणारी जागा’ पण बँक नक्की काय करते हे मात्र बहुतेकांना माहिती नसते. नाबार्डच्या ‘अॅड-आॅन` योजनेमुळे बचत गट बॅंकांशी जोडले गेले. असे बचत गट बहुतेक महिलांचे होते. त्यामुळे अनेक महिला पहिल्यांदाच बँकेत गेल्या. या निमित्ताने बँकेची जागा त्यांना ओळखीची झाली खरी, पण बँक म्हणजे काय हे मात्र पुरेसे समजले नाही. नव्याने बँकेत जाणाऱ्यांना बँकेत जाऊनही बँक काय करते ते अनेकदा समजतच नाही. अनेकांना माहिती असते ते फक्त बँक कर्ज देते एवढेच. बँकेबद्दल खूप खूप शंका मनात असतात पण उत्तर कोण देणार? कोणाला विचारावे? असं कोणी दिसत नाही.... आणि मनात आलेली शंका विचारली आणि कोणी हसलं तर.... या विचाराने शंका तशीच राहून जाते. अशा मनातल्या शकांना बचत गटात आपोआप उत्तरं मिळतात ....असे काही प्रसंग! ‘बँक ही एक रचना’ आहे असे शिकवणारे बचत गट केंद्र बनले. त्यामुळे बचत गटाच्या बैठकीला नियमित हजर असाणारीला खूप शहाणपण आलं ते यामुळेच!

एकदा असंच झालं, बचत गटाची बैठक बसली होती. बँकेबद्दल चर्चा सुरू होती. गट प्रमुख राधा भागाबाईला सहज म्हणाली, ‘या वेळी मी बँकेत गेले की माझे पण खाते काढणार आहे.... चल तुझे पण काढायचे का आपण खाते?’ भागाबाईला आपल्याला असं कोणीतरी विचारते आहे याचंच खूप बर वाटलं होतं पण आपलं बँकेत खाते? कसं शक्य आहे? असं वाटून म्हणाली, ‘काही पण थट्टा करतेस होय ग माझी ..... मी कुठे तुझ्या सारखी पैसेवाली आहे?’ भागाबाईच्या मनात पक्के होते की बँकेत खाते काढण्यासाठी श्रीमंत असावे लागते. कारण आजपर्यंत तिने ज्यांना ज्यांना बॅंक खाती काढलेले पाहिलं होते ती सगळी मंडळी श्रीमंत होती. राधाने भागाबाईला उलगडून सांगितले की, बँकेत वैयक्तिक खाते काढायला काही श्रीमंत असण्याची गरज नसते, खाते काढण्यापुरते पैसे असले की झाले. तेव्हा कुठे भागाबाईला कळले की बँक सगळ्यांसाठी असते. त्यांच्या या गप्पा शेजारी बसलेली रखमा ऐकत होती. ती म्हणाली, ‘अग त्या सोनाबाईचे खाते आहे की बँकेत! पण ती पिवळं कार्ड वाली आहे ना!’ .... हा दुसरा गैरसमज आहे की श्रीमंत लोक बँकेत खाते काढतात नाहीतर दारिद्र्य रेषेखाली असणारी कुटुंब! दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांना सरकारचे अनुदान मिळण्यासाठी खाते असावे लागते, म्हणून ते खाते काढतात.

‘आपले पैसे सुरक्षित रहावेत म्हणून बँकेत खाते काढायचे असते’ असे कधी कोणी सांगत नाही आणि बँकेच्या कुठल्याही जाहिरातीतही असे कधी लिहिलेले नसते. बँकेत पैसे सुरक्षित रहायला ठेवायचे, कारण नोटा स्वरूपातले पैसे घरात ठेवले तर चोरीला जाऊ शकतात, खराब होऊ शकतात, म्हणून पैसे बँकेत ठेवायचे. आणि खाते काढल्याशिवाय बँक पैसे घेत नाही म्हणून आपले खाते काढून पैसे बँकेत ठेवायचे. असे खाते काढून बँकेत पैसे ठेवले असले तर आपण बँकेत जाऊन पैसे काढले तरच पैसे मिळतात. आपले पैसे इतर कोणी काढू शकत नाही. पैसे बँकेत ठेवले तर त्यावर बँक व्याजही देते. असे सगळे राधा जेव्हा भागाबाईला सांगत होती तेव्हा तिला गम्मतच वाटत होती. सारं समजून ती एकदम म्हणाली, ‘म्हंजे बँक आपले पैसे सांभाळणार आणि वर व्याज पण देणार!.... आजपर्यंत मी तर ऐकलं होतं की बँक व्याज घेते, इथे तर तू सांगते की बँक व्याज देते. मग छानच झालं..... तू म्हणतेस तर काढुयाच माझं खातं!’ भागाबाई असं म्हणाल्यावर राधाला मनापासून आनंद झाला. फायद्याच सांगितलं तरी सगळे ऐकतातच असं नाही!   संपर्क : सुवर्णा गोखले, ९८८१९३७२०६ ( लेखिका ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे कार्यरत आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com