अाजाराच्या लक्षणांना प्रारंभ झाल्यावर त्याक्षणी गरम पाण्याने बरे वाटतेच; पण वारंवार लक्षणे दिसत असतील तर योग्य चिकित्सा जरूर करून घ्यावी. जेवण, नाश्ता याद्वारे पुरेपूर काळजी घेताना नेमका कोणता आहार द्यावा, पथ्य काय सांभाळावे याचा विचार प्रथम करावा. या दृष्टीने गरम पाण्याचा उपयोग जरूर लक्षात ठेवावा आणि उत्तम आरोग्य ठेवावे.
शरीराच्या विविध तक्रारींसाठी गरम पाणी उत्तम औषध म्हणून काम करते. विशिष्ट लक्षणांसाठी काही औषधी द्रव्ये घालून पाणी उकलले जाते आणि औषध म्हणून घेतले जाते. हे लक्षात ठेवून उपयोग केला तर लहानसहान तक्रारी कमी होण्यास मदतच होईल.
थंडी, गार वारे अशा वातावरणात खोकला, सर्दी, घसा दुखणे अशा लक्षणांनी किंवा पोटदुखी, पोट बिघडणे, ताप येणे अशा लक्षणांनी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले अधिक प्रमाणात त्रस्त होतात. कारण, वय वाढले म्हणून आणि लहान मुलांचे वय, वाढ कमी म्हणून प्रतिकारशक्ती त्यामानाने कमी असते. गरम पाण्याचे फायदे
घसा दुखत असेल, तर त्वरित गरम पाणी प्यावे. सर्दी, खोकला असेल तर तुळस, गवतीचहा, मिरे ज्येष्ठ मध घालून पाणी उकळावे व हे पाणी गरम स्वरूपात प्यावे. चांगला उपयोग होतो. सर्दी असली की अंगात थोडी कणकण असते. बारीक ताप, अंगदुखी असते. अशावेळी फक्त गरम पाणी उपयोगी पडतेच; पण पाण्यात पारिजातकाची पाने घालून उकळलेले पाणी दिले तर कणकण कमी होते. बऱ्याचदा फ्लूची साथ असते. त्यात सर्दी-खोकला-ताप असतो. डोकेदुखी असते. नागरमोथा, सुंठ, वाळा, चंदन, पित्तपापडा समभाग एकत्र करून अर्धा चमचा पावडर पाण्यात उकळावी आणि हे पाणी पिण्यास द्यावे. त्यामुळे तापात लागणारी तहान जळजळ कमी होते. थंडीच्या दिवसात गरम वडा भाजी खाण्याची इच्छा होणे गैर नाही; पण क्वचित हे सेवन केल्यानंतर त्रास झाला तर पोटदुखी, पित्ताचा त्रास होतो. अशावेळी फक्त गरम पाण्याने चांगला फायदा होतो. जेवताना मधून-मधून गरम पाणी प्यायल्याने पचन सुलभ होते. गॅसेस होत नाहीत. साध्या पाण्यात १ चमचा बडीशेप घालून पाणी उकळावे. हे पाणी गरम स्वरूपात दिल्यास पोटदुखी निश्चित कमी होते. जुलाब, मुरडा येणे या तक्रारी जोडीला असतील, तर बडीशेप आणि सुंठ (पाव चमचा) एकत्र करून पाणी उकळावे व सेवन करावे. सुंठेमुळे अपचन दूर होते. पोटदुखी कमी होते; पण प्रवासात किंवा कुठेही बाहेर असताना पोटदुखी झाल्यास गरम पाणी ओवा खाऊन बरे वाटते. बऱ्याच जणांना भूक उत्तम लागते; पण थोडे खाल्ले की पोट जड होते. अशावेळी जेवणातले पदार्थ पचायला हलके देऊन जेवताना गरम पाणी रोज द्यावे. त्याने पोटाचा जडपणा नक्की कमी होतो. थंडीमध्ये तशी तहान कमी लागते. त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. परिणामी लघवीला जळजळ, युरिन इन्फेक्शन, लघवीच्या ठिकाणी खाज येणे, कोरडेपणा जाणवणे, लघवी करताना प्रमाण कमी होणे अशा तक्रारी दिसतात. विशेषतः ज्येष्ठ महिलांमध्ये अधिक दिसतात. अशावेळी धने पाण्यात उकळून पाणी गार करावे. गाळून घेऊन कोमट करून आवश्यक तेव्हा सेवन करावे. पाण्यात त्रिफळा चूर्ण १ चमचा घालून उकळावे व कोमट झाल्यावर या पाण्याने लघवीची जागा २-३ वेळा धुवावी. त्याने खाज कमी होते. त्रिफळा उत्तम जंतूघ्न आहे (antibiotic) त्यामुळे जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत करते. काही घरगुती कार्यक्रम, मंगलकार्ये यात वेळी-अवेळी जेवण होते आणि तोंडाची चव जाते. भूक लागत नाही, अशावेळीसुद्धा गरम पाण्यात लिंबू पिळून मीठ घालून लिंबूपाणी प्यावे किंवा फक्त गरम पाणी प्यावे. चांगला फायदा होतो. अनेक जण वजन कमी व्हावे, म्हणून गरम पाणी घेतात; पण त्याच्या जोडीला आहार (डाएट) सांभाळणे गरजेचे असते. त्यामुळे याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम! गरम पाणी आणि त्याचे उपयोग आपण पाहिले तरी काही बाबतींत काळजी घेणे आवश्यक ठरते. (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)