गाव परिसरातील शेतमालाचे उत्पादन लक्षात घेऊन लघू प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. यासाठी तंत्रज्ञान तसेच यंत्रेदेखील विकसित करण्यात आलेली आहेत. सध्याच्या काळात तेलबियांवर प्रक्रिया आणि तेलनिर्मिती करणे शक्य आहे. भुईमूग
शेंगाचे टरफल काढून शेंगदाणे व तुकडे वेगळे करून विकणे हा एक लघू उद्योग होऊ शकतो. मोठी मागणी असेल तर शेंगदाण्याची प्रतवारी करण्याचे यंत्र वापरणे फायदेशीर ठरते. गृह उद्योगासाठी शेंगा फोडणी यंत्र मिळते, त्याची क्षमता ५० ते ६० किलो शेंगा फोडणी प्रति तास असते. आठ तासांत साधारण चार क्विंटल शेंगा फोडल्या जाऊ शकतात. स्त्रियांना सहजपणे शेंगा फोडणी करता यावी म्हणून लहान क्षमतेचे (२५ ते ३० किलो शेंगा प्रति तास) शेंगा फोडणी यंत्र मिळते. शेंगदाणे भाजून ते पॅक करून खाद्योपयोगासाठी विकता येतात. याचबरोबरीने खारे शेंगदाण्यासदेखील मागणी आहे. गुजरात राज्यात फक्त खारे शेंगदाणे तयार करण्याचे लघू उद्योग आहेत. त्याचप्रमाणे बेसन व तिखट, मीठ थोड्या पाण्यात कालवून शेंगदाण्यावर लावून तळल्यास तयार होणारा चविष्ट खमंग पदार्थही चांगला चालतो. भाजलेल्या शेंगदाण्यापासून तयार होणारे गोड पदार्थ म्हणजे गूळ-शेंगदाण्याची चिक्की, गूळ-पापडी तसेच शेंगदाण्याचे लाडू. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी जास्त जागा, भांडवल इ. ची जास्तीची गरज नाही. हे सर्व पदार्थ बाजारात विकले जातात. गावातच चांगली प्रक्रिया पद्धती व यंत्रे वापरून चांगल्या गुणवत्तेचे खाद्यपदार्थ तयार व विक्री करून उत्पन्नाचे साधन तयार होऊ शकते. कच्चामालही गावातच मिळतो. स्वच्छ करून, पॅक करून तसेच सोयाबीन शिजवून उसळीसारखे खाण्यासाठी उपलब्ध केले जाऊ शकते. सोयाबीनमध्ये ४०टक्के चांगल्या गुणवत्तेची प्रथिने असतात. सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ, सोया दूध व सोया पनीर निर्मितीची चांगली संधी आहे. सोयाबीनवर विशिष्ट प्रक्रियाकरून फुटाणे किंवा तळलेले सोयाबीन किंवा सोयाबीनची डाळ ग्राहकांना पसंत आहे. भाजलेल्या किंवा तळलेल्या सोयाबीनवर बेसन, साखर, चॉकलेट इ. चा लेप देवून तळून किंवा शिजवून पदार्थ तयार करता येतो. या पदार्थांना चांगली मागणी असते. जवसाचे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले गुणधर्म लक्षात घेता याच्या पदार्थांना मागणी वाढत आहे. जवस स्वच्छ करून विकता येते. याचबरोबरीने जवस भाजून त्याला थोडेसे मीठ लावले तर तो एक जेवणानंतर खाण्यासाठी चवदार पदार्थ होतो. ब्रेड, बन इ. वर तीळ लावून बेकिंगची प्रक्रिया आहे. तिळाचे सेवनही शरीरासाठी चांगले असते. तीळ स्वच्छ करून पॅकिंगमध्ये विकावा किंवा स्थानिक पातळीवर तिळाची चिक्की,वडी व लाडू यांना मागणी आहे. सूर्यफुलाच्या बिया स्वच्छ करून ते भाजून विकता येतात. यास देश, परदेशात मागणी वाढत आहे. सूर्यफुलाच्या बिया स्वच्छ करून यंत्राच्या साह्याने त्याचे टरफल काढले जाते. त्यानंतर योग्य उष्णतेवर भाजून त्यास मीठ लावून स्नॅक्स म्हणून बाजारात मागणी आहे. रसायनांचा उपयोग न करता तसेच कमी तापमानावर तेलबियांपासून तेल काढून त्याला फक्त गाळून खाद्योपयोगात वापर वाढला आहे. याचा फायदा घेऊन लहान क्षमतेची तेल घाणीच्या सहाय्याने गावामध्ये तेल निर्मिती उद्योग करणे शक्य आहे. शहरातून घाणीवर तयार केलेल्या तेलाला मागणी वाढत आहे.
मोहरीची डाळ लोणची तयार करण्यासाठी वापरली जाते. दाणे लहान असल्यामुळे स्वच्छ करण्यासाठी प्रतवारी यंत्राचा वापर करावा. सध्या बाजारपेठेत कमी क्षमता (५० किलो प्रति तास ) ते जास्त क्षमता (५०० किलो प्रति तास ) अशी यंत्रे उपलब्ध आहेत. ही यंत्रे अन्य धान्यासाठीही वापरली जाऊ शकतात. मोहरीची डाळ तयार करण्याची यंत्रेही बाजारात उपलब्ध आहेत. संपर्क ः डॉ. एस. डी. कुलकर्णी,९७५२२७५३०४ (लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)