प्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला जिंकले आम्ही

हरणगावची उपक्रमशील ग्रामपंचायत शेतीसह हरणगावाने विविध विकासांवर भर दिला आहे. ग्रामस्वच्छता स्पर्धेत गावाने तालुक्‍यात तिसऱ्या क्रमांकाने पारितोषिक पटकावले आहे. कलावंतांचे गाव अशीही हरणगावची ओळख आहे.येथील ग्रामपंचायतीने कचऱ्यापासून गांडूळखत निर्माण करण्यास सुरवात केली आहे. गावात तीन महिला बचतगट व एक शेतकरी गट आहे. ग्रामविकासात शेती हा केंद्रबिंदू ठेवला आहे.
वेलवर्गीय भाजीपाला व उसात सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर हरणगावातील शेतकरी करतात.
वेलवर्गीय भाजीपाला व उसात सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर हरणगावातील शेतकरी करतात.

नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका. भात आणि नागली ही या भागातील पारंपरिक पिके. पावसाळा संपला की उर्वरित काळात रोजगारासाठी स्थलांतर ठरलेलं. याच तालुक्‍यातील हरणगाव मात्र या सर्व बाबींना अपवाद ठरले आहे. डोंगरदऱ्यात, घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या गावाने वेलवर्गीय भाजीपाला उत्पादनाद्वारे नाशिक व गुजरात राज्यातील बाजारपेठांत नाव कमावलं आहे. येथील जिद्दी शेतकऱ्यांनी एकेकाळची "दुष्काळी गाव' ही ओळख मागील वीस वर्षांत पुसून टाकत भोपळा, कारले, टोमॅटो पिकविणारं गाव अशी ओळख तयार केली आहे.  रामायणात श्रीरामांनी सुवर्णमृगाच्या रुपातील मारिच राक्षसाला मारले होते. ते मारिचरुपी हरिण धावत धावत ज्या परिसरात आले व गतप्राण झाले तो परिसर म्हणजे हरिणगाव अशी कथा पुराणात सांगितली जाते. मात्र हरिण हा शब्द गावाच्या नावाला जोडला गेला. पुढे हरिणगाव शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं नामकरण हरणगाव असं झालं. नाशिकपासून सुमारे ५५ किलोमीटरवर पेठ रोड लगत करंजाळी घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. गोळशी फाट्यावरून हरणगाव धरणाला वळसा घालून गावात जाता येते.  धरणानं प्रश्‍न मार्गी लावला  हरणगाव हे गाव पिढ्यानपिढ्या दुष्काळी होते. पावसाळ्यात जोरदार पाऊस. उन्हाळ्यात दूरवर जाऊन विहिरीवरून डोक्‍यावरून पिण्याचं पाणी आणावं लागायचं. सन १९८८ ते ९० या काळात गाव शिवारातील नदीवर धरण बांधण्यात आले. त्यानंतर गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागला. त्या काळात होणारे भात पीक आजही होते. आता ते बागायती पद्धतीने घेतले जाते हाच महत्त्वाचा फरक.  नावीन्यपूर्ण प्रयोगांचा ध्यास  धरणाचा हरणगावासह परिसरातील वडबारी आणि आसडबारी या दोन्ही गावांना लाभ होऊन भागातील बहुतांश क्षेत्र बागायतीखाली आले. पण हरणगावातील शेतकऱ्यांची प्रयोगशीलता, नावीन्यपूर्ण प्रयोग,  आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास काही औरच!.. साधारणपणे एक हजार लोकवस्तीचं हे गाव. आजमितीस एकूण ४०० हेक्‍टर क्षेत्र वेगवेगळ्या पिकांद्वारे वहितीखाली आहे. उसाचं क्षेत्रही लक्षणीय आहे. रब्बीत भोपळा, कारली, टोमॅटो असतो. नागली उत्पन्नाला परवडत नसल्याने ते शेतकऱ्यांनी कमी केले आहे.  आधुनिक तंत्राच्या वापरावर भर  हरणगावने आता जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरवात केली आहे. भात लागवडीसाठी मागील वर्षापासून यंत्राचा वापर केला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे वेळ, श्रम आणि मजुरीत मोठी बचत होत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण योजनेंर्गत अनुदानावर हे यंत्र उपलब्ध करून देण्यास मदत केली. गावातील प्रयोगशील शेतकरी रवी जाधव म्हणाले की या यंत्राच्या वापरामुळे मजूर टंचाई समस्येवर मात करता आलीच. शिवाय लागवड पद्धतीत बदल झाला. दोन रोपे व दोन ओळीत अंतर राखता आले. पूर्ण चुड लावण्याऐवजी मोजून दोन किंवा तीन रोपेच लावण्याची पध्दत वापरता आली. पूर्वी एकरी ३० किलो बियाणे लागायचे. आता अवघ्या १२ किलो बियाण्यात काम होते. पूर्वी २० ते २५ फूटवे यायचे. आता ते ४० ते ५० पर्यंत मिळतात. कमी खर्चात उत्पादनात दीड ते दुपटीने वाढ झाली आहे. भातकापणी आणि मळणीसाठीही यंत्रांचा वापर वाढला आहे. गाव शिवारात सुमारे २० शेतकरी आपल्या आधुनिक ट्रॅक्‍टरच्या साह्याने मशागत करतात.  कांदा बीजोत्पादनात यश  हरणगाव शिवारात राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास संस्था (एचआरडीएफ) च्या साह्याने  कांदा बीजोत्पादन प्रकल्प राबविण्यात आला. या भागात पूर्वी कांद्याचे उत्पादन घेतले जात नसायचे. योग्य व्यवस्थापन, चांगले बियाणे आणि शेतकऱ्यांमुळे या भागात बीजोत्पादन चांगले यशस्वी ठरले.  भाताचे वाण बदलले  ‘एनएचआरडीएफ’च्या मदतीने गाव परिसरात दिल्ली परिसरातील बासमती लागवडीचा प्रयोग घेण्यात आला. यापूर्वी या भागात स्थानिक वाणाचा वापर होत आला आहे. काही तज्ज्ञांनी या भागात बासमतीचे हे वाण येण्याबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे बासमती भात म्हणून त्यास ६० रुपये प्रति किलो दर मिळाला असता. आत्तापर्यंत प्रति किलो साडे सोळा ते साडे सतरा रुपये दरापर्यंत त्यांना समाधान मानावे लागले होते. आता वाणबदलांवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.  भोपळा उत्पादनात आघाडीवर  हरणगावचा माल नाशिक तसेच गुजरात राज्यात नानापोंडा बाजारपेठेत विकला जातो. हरणगावचा भोपळा या नावाने दोन्ही बाजारपेठेत ओळख तयार झाली आहे. हरणगावपासून नाशिक ५५ किलोमीटर तर नानापोंडा ४० किलोमीटरवर आहे. अन्य मालांच्या तुलनेत या भोपळ्याला सरासरीपेक्षा जास्त दर मिळत आला आहे. त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा हेच त्यामागील कारण आहे. मागील चार वर्षांत येथील शेतकऱ्यांनी भोपळा उत्पादनात चांगलीच आघाडी घेतली आहे. जमीन, पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन, किडी-रोगांचा तुलनेने कमी प्रादुर्भाव व कमी फवारण्या यामुळे येथील भोपळा बाजारपेठांमध्ये आघाडी घेतो. पावसाळा संपल्यानंतर दरवर्षी हिवाळ्यात भोपळ्याची लागवड होते.  कमी क्षेत्रात उत्पादनाचे तंत्र  हरणगावचा शेतकरी अत्यल्पभूधारक आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे सरासरी ४० गुंठेच क्षेत्र आहे. मात्र तेवढ्या क्षेत्रातूनही प्रयोगशील शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. पेठ तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, कृषी पर्यवेक्षक सुरेश शेळके, शरद थेटे यांच्याकडून नव्या प्रयोगांसाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.  उसाकडून फळपिकांकडे  हरणगावच्या शेतकऱ्यांनी मागील दशकात उसावर लक्ष केंद्रित केले होते. दिंडोरी तालुक्‍यातील कादवा साखर कारखान्याला ऊस जात असे. कारखान्याच्या दृष्टीने हरणगाव परिसर हा ‘कमांडक्षेत्रा’च्या बाहेर येत होता. या स्थितीत गाव शिवारातील उसाची तोडणी सर्वात उशिरा व्हायची. तोडणी व वाहतूक खर्चही शेतकऱ्यांवर पडायचा. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी हळूहळू ऊस कमी केला. त्याऐवजी टोमॅटो, भोपळा, कारली, वांगी, मिरची, आंबा (केशर व हापूस) आदींची लागवड वाढली.  हरणगावची उपक्रमशील ग्रामपंचायत  शेतीसह हरणगावाने विविध विकासांवर भर दिला आहे. ग्रामस्वच्छता स्पर्धेत गावाने तालुक्‍यात तिसऱ्या क्रमांकाने पारितोषिक पटकावले आहे. कलावंतांचे गाव अशीही हरणगावची ओळख आहे. तमाशा या पारंपरिक लोककलेची जोपासना येथे केली जाते. कलाकारांची नोंदणीकृत संस्थाही येथे आहे. येथील ग्रामपंचायतीने कचऱ्यापासून गांडूळखत निर्माण करण्यास सुरवात केली आहे. गावात तीन महिला बचतगट व एक शेतकरी गट आहे. ग्रामविकासात शेती हा केंद्रबिंदू ठेवला आहे. शेतकरी, ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि शास्त्रज्ञ यांच्यातील समन्वयाने हरणगावचा अधिकाधिक विकास साधण्यास मदत झाली आहे.     संपर्क :  मनमोहन जाधव(सरपंच)- ७५०७५२५११९  वर्षा जेजूरकर( ग्रामसेवक)- ७३५०४८२३३२  सुरेश शेळके( कृषी सहाय्यक)- ९५८८४५६०४३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com