लसीकरण, जागरूकतेतून टाळा रेबीज रोगाचा प्रादुर्भाव

पाळीव जनावरांचे लसीकरण करून घेणे हा रेबीज रोखण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे.
पाळीव जनावरांचे लसीकरण करून घेणे हा रेबीज रोखण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे.

जागितक आरोग्य संघटनेनुसार आपल्या देशातील 70 टक्के लोकांना रेबीजविषयी माहिती आहे; तरीही बरेच लोक प्राण्यांच्या चावण्यामुळे होणाऱ्या जखमांकडे दुर्लक्ष करतात. संशोधनातून असे निदर्शनास आले की, कुत्रा चावल्यास जखम वाहत्या नळाखाली स्वच्छ पाण्याने धुतल्यास रेबीजचा धोका कमी होतो.   रेबीज हा लायसा नावाच्या विषाणूमार्फत प्रसारित होणारा घातक रोग आहे. रेबीजचे विषाणू कुत्रा व तत्सम उष्णरक्तीय पाळीव किंवा वन्य प्राण्यांमार्फत प्रसारित होतात. हा रोग मुख्यतः प्रादुर्भावीत कुत्रा, मनुष्य किंवा इतर प्राण्यांना चावल्यामुळे होतो. तसे असले तरी

रोग पसरण्याची कारणे ः श्‍वानाच्या (कुत्रा) चाव्यामुळे किंवा प्रादुर्भावीत इतर प्राण्यांपासून हा रोग माणसांमध्ये पसरतो. एखाद्या प्रादुर्भावीत पदार्थ, जसे श्‍वानाची लाळ ही जर मानवी श्‍लेषावरणात किंवा ताज्या जखमेच्या संपर्कात आली तरीही रेबीज होऊ शकतो. माणसापासून माणसाला होणारा प्रसार चाव्यामुळे वैचारिकदृष्ट्या शक्‍य आहे. परंतु निश्‍चितपणे म्हणता येत नाही. विषाणूजन्य हवेच्या श्‍वसनामुळे रेबीज क्वतिचत पसरू शकतो. प्रादुर्भावीत प्राण्यांचे मांस खाल्याने मानवी शरीरात रेबीज पसरू शकत नाही. रेबीजच्या विषाणूंचा कालावधी हा जखमेची जागा आणि त्यापासून मेंदूचे अंतर यांच्या गुणोत्तरावर अवलंबून असते.

रोगाची लक्षणे अ. मनुष्यामध्ये आढळून येणारी लक्षणे साधारणपणे रेबीजच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रत्यक्ष रोगाची सुरवात 1 ते 3 महिन्यानंतर होते. परंतु कधी कधी एक आठवड्यापेक्षा कमी किंवा एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. या रोगाची प्रथम लक्षणे दिसल्यावर 2 ते 10 दिवसांत रोगाच्या प्रादुर्भावीत व्यक्तीचा मृत्यू होतो. जसा जसा विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेत पसरतो तसा तसा मेंदू आणि पाठीच्या कण्याची सूज वाढत जाते. रेबीजची पहिली लक्षणे ही डोकेदुखीचा त्रास, ताप येऊन शरीर आखडणे, पाणी किंवा अन्न गिळताना गळ्यामध्ये फार त्रास जाणवतो. रेबीज प्रादुर्भावीत व्यक्तीला पाणी, आग अथवा मोठ्या आवाजापासून फार त्रास होतो. या रोगामुळे आढळून येणारे मृत्यूंचे प्रमुख कारण श्‍वसनात अडथळा येणे हे असते आणि कालांतराने याच्या झटक्‍याने रोगी दगावतो.

ब. कुत्र्यामध्ये आढळून येणारी लक्षणे कुत्र्यामध्ये साधारणपणे विषाणूंनी प्रवेश केल्यावर लक्षणे आढळून यायला 10 दिवस ते 2 महिने किंवा जास्तही कालावधी लागतो. साधारणपणे कुत्र्यामध्ये दिसून येणारी लक्षणे म्हणजे प्रकाशाची घृणा, काळोखी प्रकाशात लपणे, आवेशपूर्ण असणे, गोल गोल फेऱ्या मारणे, किंचित उठल्यावर अतिशय दचकणे. भूक न लागणे, जखमेच्या भोवती खाजवणे व वेदना, ताप येणे अशीही लक्षणे आढळून येतात. 1-3 दिवसांत लक्षणे वाढतात व कुत्रा अतिशय आक्रमक रुप घेतो. यामुळे माणसावर तसेच निर्जीव वस्तूंवरसुद्धा आक्रमण करतो. गिळण्यासाठी लागणाऱ्या स्नायूंच्या लखव्यामुळे लाळ पडत राहते. याचबरोबर आवाजात बदल, रडणे असेही दिसून येते. शारीरिक आचके येऊन व स्नायूंच्या असमन्वयामुळे कुत्रा असंवेदनशीलतेत जातो. लखवा रुपामध्ये कुत्रा आक्रमक रुपात थोडाच वेळ असतो. सुरवातीला डोके व मानेच्या स्नायूंचा लखवा होतो. त्यामुळे कुत्र्याला त्रास होतो. जसा रोग वाढत जातो तसा पूर्ण शरीरात लखवा पसरतो व एक ते अकरा दिवसांत कुत्रा मरण पावतो.

जनावरांतील रेबीजची लक्षणे रेबीजचा प्रादुर्भाव झालेला कुत्रा व इतर वन्य प्राण्यांच्या चाव्यामुळे बैल, गाय, म्हैस, शेळी/मेंढी या पाळीव प्राण्यांमध्ये खालील लक्षणे आढळून येतात. अस्वस्थपणा, मोठ्याने ओरडणे, गिळण्यास त्रास, लाळ गळणे, काही जनावरांमध्ये अशक्तपणा व अर्धांगवायूसुद्धा आढळून येतो. ही लक्षणे वाढत जाऊन मज्जासंस्थेशी निगडित लक्षणे आढळतात व मृत्यू होतो. शेळी व मेंढ्यांमध्ये वन्य प्राणी, जसे की, लांडगा यांच्या चाव्यामुळे रेबीज होण्याचे प्रमाण जास्त असते. अशा प्रादुर्भावीत प्राण्याच्या लाळेमधून इतर प्राणी व मनुष्यालासुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शको. प्रादुर्भावीत शेळ्या व मेंढ्या हिंसक होतात. मोठ्याने ओरडणे, आक्रमकता व अस्वस्थपणा वाढतो. घोड्यामध्येसुद्धा ही लक्षणे आढळून मज्जासंस्थेशी निगडित अर्धांगवायू होतो.

प्रथमोपचार व रोगाचे नियंत्रण जनावरांना इतर प्राण्यांपासून वेगळे करावे व त्यांना अंधाऱ्या जागी ठेवावे. त्यांच्या लाळेच्या संपर्कात येऊ नये. अशा प्राण्यांच्या संपर्कातील उरलेले अन्न, पाणी यापासून दूर राहावे. कारण मुख्यतः रेबीजचे विषाणू हे लाळेद्वारे पसरतात. अशा जनावरांकडे दुर्लक्ष न करता त्यांची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी. रेबीज प्रादुर्भावीत म्हणून निदान झालेल्या जनावरांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनी रेबीजची लस घेणे फार महत्त्वाचे आहे. जनावरांचे लसीकरण करून घेणे हा रेबीज रोखण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे.

कुत्रा चावल्यानंतरचे उपचार कुत्रा चावल्यानंतर मनुष्याने घ्यावयाची काळजी दंशानंतर त्वरीत झालेल्या जखमेच्या ठिकाणी ताबडतोब स्वच्छता करणे आवश्‍यक आहे. यासाठी साबण किंवा कोणतेही जंतूनाशक द्रव्य वापरून नळाच्या वाहत्या पाण्याखाली किमान दहा मिनिटे जखम धरावी. जखमेवर मलमपट्टी करू नये. जर जखमेची व्याप्ती फारच मोठी असेल आणि टाके घालणे अनिवार्य असेल तर रेबीज प्रतिबंधक लसीच्या द्रवाचा वापर करावा. जखमा चिखळू नये व त्यात जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविकांचा वापर करावा. रेबीजची होऊ नये म्हणून 0,3,7,14,28 व्या दिवशी लसीकरण करावे.   संपर्क ः डॉ. दीपक क्षीरसागर, 9510658407 (संशोधक, पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com