ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. त्यानंतर पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत. यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतात. रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यांत द्यावी. सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. त्याच्यानंतर खोडवा घेतल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. ज्या लागवडीचे उत्पादन हेक्टरी १०० टनांपेक्षा जास्त आहे, अशा उसाचा खोडवा ठेवावा. पीक विरळ झाल्यास रोपे लावून नांग्या भराव्यात. खोडवा पीक हे हलक्या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणाऱ्या क्षारपड, चोपण जमिनीत घेऊ नये. शिफारशीत ऊस जातीचा खोडवा ठेवावा. पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानुसार ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. तसेच आडसाली, पूर्वहंगामी व सुरू या हंगामातील लागणीचा ऊस तोडून त्याचा खोडवा ठेवल्यास पूर्वहंगामी उसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते.
पाचटात ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असते. एक हेक्टर क्षेत्रामधून ८ ते १० टन पाचट मिळते. त्यापासून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळले जाते. ऊस तोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर पाचट बाजूला करून बुडखे मोकळे करावेत. यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतात. बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो. फुटव्यांची संख्या वाढते. जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्यावरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात. त्यांचे क्वचितच उसात रुपांतर होते. बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि १० किलो पाचट कुजविणारे जिवाणूसंवर्धक सम प्रमाणात पसरून टाकावे. त्यानंतर पाणी द्यावे. ऊसतोडणी यंत्राने उसाची तोडणी केली असल्यास बुडख्यांवरील पाचट बाजूला करणे किंवा बुडखे छाटणे ही कामे करण्ची गरज नाही. कारण यंत्राने पाचटाचे आपोआप लहान तुकडे होतात. जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा पाचटाचा थर तयार होतो. यंत्राने ऊसतोडणी केल्यास खोडव्याची फूट चांगली येते. खोडव्याला पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या सहाय्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यात द्यावी. (तक्ता क्र. १ पहावा). पहिली खतमात्रा खोडवा ठेवल्यानंतर १५ दिवसांचे आत पूर्ण करावी. पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सें.मी. अंतरावर, १५ ते २० सें.मी. खोल छिद्र घेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दोन छिद्रामधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. प्रतिहेक्टरी ॲझोटोबॅक्टर १.२५ किलो,ॲझोस्पिरीलम १.२५ किलो,ॲसिटोबॅक्टर १.२५ किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक १.२५ किलो या प्रमाणात वापर करावा. ही जिवाणूसंवर्धके २५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून वापरावीत. जिवाणूसंवर्धकांचा वापर केल्यास २५ टक्के नत्र आणि स्फुरद खतांची बचत होते. शिफारशीत नत्र आणि स्फुरदाची खतमात्रा २५ टक्क्यांनी कमी करावी. पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने खते देण्याचे फायदे
खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे खतांचा ऱ्हास फारच कमी प्रमाणात होतो. खत मातीने झाकल्यामुळे वाहून जात नाही. खत तणास न मिळाल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. त्यामुळे खुरपणी खर्चात बचत होते. जास्तीत जास्त खत मुख्य पिकास उपयोगी पडते. रासायनिक खतांची उपलब्धता पिकांच्या गरजेनुसार हळूहळू होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. उसाची वाढ जोमदार होऊन उसाचे भरघोस उत्पादन मिळते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे सर्वत्र एकसारखे पीक येते. उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होते. या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची आंतरमशागत करण्याची गरज नाही. जारवा तोडण्याची किंवा बगला फोडून पिकाला भर देण्याची गरज नाही. पाचटाचे आच्छादन असल्यामुळे आणि खते पहारीच्या साह्याने दिल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. खोडवा पिकातील काणीग्रस्त आणि गवताळ वाढीचे बेटे उपटून काढावीत. संपर्क ः ०२१६९- २६५३३४ (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)