सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी १२९ टन उत्पादनापर्यंत मजल मारत राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे. सांगली हा द्राक्ष, भाजीपाला यांच्याबरोबर उसाचा जिल्हा म्हणूनही प्रसिद्ध आहे. सांगलीपासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर मिरज तालुक्यात सावळवाडी गाव लागते. गावालगत वारणा नदी वाहते. या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गावातील प्रशांत लटपटे यांची दोन एकर दहा गुंठे शेती आहे. जमीन मुरमाड, काळी मध्यम प्रतीची आहे. सातवी उत्तीर्ण असलेल्या प्रशांत यांच्यावरील वडिलांचे छत्र १९८८ मध्ये हरपले. साहजिकच घरची व शेतीची जबाबदारी अंगावर पडली. त्या वेळी आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असायची. मग प्रशांत दुसऱ्याच्या शेतात काम करू लागले. घरची शेती कसणेही सुरू होते. त्यातच मूळ गावठाणातून वारणा नदी गेली असल्याने जागा अधिग्रहित झाली. त्यात घरं गेलं. खरं तर सावळवाडी गावाचंच पुनर्वसन झालं आहे. संघर्षातून शेती प्रशांत मोठ्या जिद्दीचे. जागा गेली तरी जिद्दीने नवे घर बांधले. उसाची शेती सुरू होती. को- ८६०३२ वाण होता. पण शेती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर होत नव्हती. अभ्यास केला तर बदल घडू शकतो असे प्रशांत यांना वाटले. सन २००० मध्ये थेट कृषी विभाग गाठून सुधारीत ऊस लागवड पद्धतीची माहिती घेतली. त्यानुसार व्यवस्थापन सुरू केले. यश मिळू लागले. पुढे आत्मविश्वास वाढला. भावाची एक एकर शेतीदेखील भाडेतत्त्वावर कसायला घेतली. सल्ला ठरला महत्त्वाचा केवळ सल्ला घेऊन उपयोग होत नाही. तो अमलात आणला तरच यशस्वी होता येतं हे वेळीच उमगलं. कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे कृषी संशोधन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात सन २००७ च्या दरम्यान डॉ. धर्मेंद्र फाळके कार्यरत होते. प्रशांत यांची कलिंगडाची शेती पाहण्याचा योग त्यांना आला. त्या वेळी उसाचा पाला जाळू नका असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर पाचट व्यवस्थापन म्हणजे काय? त्याचा फायदा काय हे उमगू लागलं. तेव्हापासून आत्तापर्यंत उसाचा पाला न जाळण्याची पद्धत कायम ठेवली आहे. पूर्वीची ऊस शेती
आजची शेती
व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
उसात कलिंगड उसात कलिंगडाचे आंतरपीक घेतले जाते. यंदा उसानंतर दोन एकरांत घेतलेल्या कलिंगडाचे एकरी ३२ टन उत्पादन मिळाले आहे. कमाल दर ११ रुपये प्रति किलो मिळाला आहे. कलिंगडातून आलेल्या पैशातून उसाचा खर्च कमी होऊन उसाचे येणारे पैसे शिल्लक राहतात. उसाची संख्या प्रशांत म्हणाले की, वरिष्ठ ऊसशास्त्रज्ञ ज्ञानदेव हापसे माझी शेती पाहण्यासाठी आले. फुटवे, गाळपायोग्य ऊस यांची संख्या संतुलित ठेवली पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यानुसार यंदा ४४ गुंठ्यात पाच हजार ६०० डोळे लावले आहेत. एकरी दरवर्षी ३५ ते ३७ हजार ऊससंख्या ठेवण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येकाचे वजन सरासरी ३ किलो व त्याहून अधिक असते. मिळणारे एकरी उत्पादन व उत्पन्न (लागवडीचा ऊस)
तज्ज्ञांची प्रतिक्रिया प्रशांत हे अभ्यासू आणि नवीन तंत्राचा वापर करणारे शेतकरी आहेत. प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सर्वसाधारण शेतीत सेंद्रिय कर्ब ०.३ ते ०.६ टक्के पाहावयास मिळतो. पण प्रशांत यांनी सेंद्रिय घटकांच्या योग्य वापरातून सेंद्रिय कर्ब वाढवला आहे. तोच उसाच्या उत्पादन वाढीचे प्रमुख सूत्र आहे. डॉ. ज्ञानदेव हापसे संपर्क- प्रशांत श्रीधर लटपटे- ९१७५४१२३०७, ८३२९७६०६८६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.