अन्नद्रव्यांचे प्रकार, महत्व जाणून करा वापर

उसातील लोहाची कमतरता
उसातील लोहाची कमतरता

पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन, त्यांचा संतुलित पुरवठा केल्यास पिकाच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळू शकते. त्यासाठी त्याच्या कमतरतेची लक्षणे जाऊन नेमकी उपाययोजना करावी.   पिकांचे रासायनिक विश्लेषण केले असता, त्यात सुमारे ९० मूलद्रव्ये आढळतात. मात्र, ती ही सर्वच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात असे नाही. ज्या अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो, अशी १७ मूलद्रव्ये महत्त्वाची मानली जातात. त्यातील मोठ्या प्रमाणात लागणारी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही अन्नद्रव्ये पिकांना हवा व पाण्यातून मिळतात. उर्वरित १४ अन्नद्रव्ये जमिनीतून मिळत असतात. जमिनीचा सामू ७ (उदासीन) च्या दरम्यान असला पाहिजे. अशा स्थितीत रासायनिक आणि जैविक क्रिया चांगल्या होऊन अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जास्त विम्ल किंवा आम्ल परिस्थितीत अन्नद्रव्ये अविद्राव्य होऊन पिकांना उपलब्ध होत नाहीत. पीकवाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये ठरविण्याकरिता महत्त्वाच्या तीन बाबी ः

  • मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांची शाकीय वाढ आणि उत्पादन वाढ पूर्णपणे होत नाही.
  • प्रत्येक मूलद्रव्यांची कमतरतेची लक्षणे ही विशिष्ट प्रकारची असतात.
  • मूलद्रव्यांच्या पिकाच्या वाढीमध्ये घटक अन्नद्रव्य म्हणून प्रत्यक्षपणे सहभाग असला पाहिजे.
  • पिकांच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये आणि त्यांचे स्राेत : हवा आणि पाणी यामधून पुरवठा होणारी अन्नद्रव्ये ः कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जमीन आणि खतांमधून पुरवठा होणारी अन्नद्रव्ये ः

  • मुख्य अन्नद्रव्ये : नत्र, स्फुरद आणि पालाश
  • दुय्यम अन्नद्रव्ये : कॅल्शिअम, मग्नेशिअम आणि गंधक
  • सूक्ष्म अन्नद्रव्ये : लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मोलाब्द, क्लोरीन आणि निकेल
  • अ) मुख्य अन्नद्रव्ये यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद आणि पालाश या सहा अन्नद्रव्यांचा समावेश होतो. ही अन्नद्रव्ये पिकांकडून मोठ्या प्रमाणात शोषली जात असल्याने त्यांना मुख्य अन्नद्रव्ये असे म्हणतात. यापैकी प्राणवायू, हायड्रोजन आणि कर्ब ही अन्नद्रव्ये पिकांना अधिक प्रमाणात लागतात. मात्र, त्यांचा पुरवठाही जमिनीतील पाणी आणि हवा याद्वारे सहजपणे होतो. जैविक क्रियेमध्ये या तिन्ही मूलभूत अन्नद्रव्यांचा फार महत्त्वाचा वाटा आहे. पिकांच्या एकूण वजनापैकी सुमारे ९४ टक्क्याहून जास्त भाग या तीन अन्नद्रव्यांनी व्यापलेला असतो. याव्यतिरिक्त नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात लागतात. जमिनीतील ओलाव्यामध्ये विद्राव्य व मातींच्या कणांवर अधिशोषित असणाऱ्या या अन्नद्रव्यांचा वापर पिकांच्या मुळाद्वारे केला जातो. जमिनीमधून या अन्नद्रव्यांचा होणारा पुरवठा साधारणपणे मध्यम ते कमी प्रमाणात असतो. पिकांची गरज भागविण्यासाठी सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा वापर आवश्यक असतो. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे नत्राची कमतरता सर्वदूर दिसून येते, तर स्फुरद कमी ते मध्यम स्वरूपात आहे. काळ्या खोल जमिनीमध्ये पालाश पुरेशा प्रमाणात आहे. ब) दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शिअम, मग्नेशिअम आणि गंधक या तीन अन्नद्रव्यांना वनस्पतींची दुय्यम अन्नद्रव्ये म्हणतात. यांची गरज मध्यम प्रमाणात असते. तेलबिया पिकांखालील जमिनीमध्ये गंधकाची कमतरता मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. क) सूक्ष्म अन्नद्रव्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मोलाब्द, क्लोरीन आणि निकेल या आठ अन्नद्रव्यांचा समावेश होतो. सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना कमी प्रमाणात लागतात. सुपीक जमिनींमध्ये ही जमिनीतून नैसर्गिकरित्या पुरेशा प्रमाणात मिळत असली काही स्थितीमध्ये कमतरता दिसून आल्यास या अन्नद्रव्यांचा पुरवठा सेंद्रिय/ रासायनिक खतांद्वारे करावा लागतो. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये ३५.४ टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, २५.७ टक्के जमिनीत उपलब्ध लोह व २५.७ टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आली. बहुतांश जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते. संपर्क ः प्रकाश तापकीर, ९४२१८३७१८६ (मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com